पुणे - पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा वगळता उर्वरित चार जिल्ह्यांमध्ये 11 लाखांहून अधिक नागरिक आणि साडेचार लाख जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. या जिल्ह्यांत 587 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, त्यापैकी सर्वाधिक 345 टॅंकर सोलापूर जिल्ह्यात सुरू आहेत.
पुणे, सातारा जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये पावसाअभावी टॅंकर सुरू आहेत. सांगली जिल्ह्यात महापूर येऊनही जत, आटपाडी आणि तासगाव तालुक्यात पाण्याअभावी नागरिकांचे हाल सुरू आहेत. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. येथे सर्वाधिक 97 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर, खटाव तालुक्यात तीन आणि फलटण तालुक्यात दोन टॅंकर सुरू आहेत.
सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर, बार्शी, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, माढा, करमाळा, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला आणि माळशिरस तालुक्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. |
|