पावसाळा संपतानाच जिल्ह्यात ९ टॅंकर

Water Tanker
Water Tanker

भवानीनगर - मोसमी पावसाने धरणे भरली. मात्र, जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पाणीबाणीची स्थिती उद्‌भवल्याने ही भरलेली धरणे उन्हाळ्यापर्यंत कशी तग धरणार, असा प्रश्‍न आहे. ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात ७ गावांतील सोळा हजार लोकसंख्येला ९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या आणखीही गावे टॅंकरची मागणी करण्याच्या तयारीत आहेत.

जिल्ह्याच्या काही भागांत मोसमीबरोबरच परतीचाही पाऊस कोसळला नाही. दुसरे कालव्यांमधून तळ्यांना पाणी सोडता येत नाही, या नियमावर जलसंपदा विभाग अडून बसलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षांत प्रथमच ऐन पावसाळ्यात ९ टॅंकर सुरू आहेत. बारामती तालुक्‍यात सर्वाधिक १२ हजार लोकसंख्येला ६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या तालुक्‍यातील ५ गावे व ४६ वाड्यांचा यात समावेश आहे. दौंड तालुक्‍यातही १ गाव, ४ वाड्यांसाठी एक टॅंकर, पुरंदर तालुक्‍यात १ गाव, ७ वाड्यांसाठी २ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अर्थात, या महिन्यातच आणखी गावांत टॅंकर सुरू करावे लागतील, अशी स्थिती आहे. 

जून महिन्यात झालेला एक पाऊस व चार दिवसांपूर्वी झालेला भीजपाऊस वगळता या तीन तालुक्‍यांत यंदा मोसमी पावसाने हात दाखविला आहे. त्यामुळे खरिपाची सध्या उभी असलेली पिके तग धरतील, ही आशाही संपुष्टात आली आहे. परतीच्या पावसाने निराशा केल्याने शेतकरी हादरले आहेत. बारामती तालुक्‍यात आतापर्यंत सरासरी १४८ मिमी, तर दौंड तालुक्‍यात सरासरी ११४ मिमी पाऊस झाला आहे. एकूण सरासरीच्या ४० टक्केही पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र, या वर्षी पिण्याच्या पाण्याचीही स्थिती गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. 

बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर तालुक्‍यात तालुक्‍यात उसाचे प्रमुख पीक असल्याने खरिपातील आडसाली लागवडी शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर केल्या. पण, परतीचा पाऊस न झाल्याने उन्हाळ्यात या लागवडी कशा टिकवायच्या, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. त्यातच ऑक्‍टोबर हीटमुळे पिके वेळेआधीच पाण्यावर येऊ लागली आहेत. त्यातून कसा मार्ग काढायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

पेरणी ४० टक्‍क्‍यांवर; पण तीही धोक्‍यात 
बारामतीत खरीप बाजरीची फक्त २० टक्के क्षेत्रावर लागवड झाली होती. ही पिकेही सध्या धोक्‍यात आहेत. या वर्षी तालुक्‍यात ८ हजार हेक्‍टर क्षेत्राऐवजी केवळ १४०० हेक्‍टर क्षेत्रावरच बाजरीची पेरणी झाली. यापैकी जिथे शाश्वत पाणी आहे, तेथीलच पीक हाताशी येईल, असे चित्र आहे. मक्‍याचेही क्षेत्र तालुक्‍यात ४० टक्केच असून, २ हजार हेक्‍टरऐवजी ८०० हेक्‍टर एवढीच मका लागवड झाली होती. यातही जिरायती भागातील मक्‍याला मोठा फटका बसणार आहे. दौंडमध्येही एरवी ३६०० हेक्‍टरवर घेतली जाणारी बाजरी यंदा ८७५ हेक्‍टरपर्यंतच लागवड झाली. एकंदरीत इंदापूर, बारामती, दौंड व पुरंदर या चारही तालुक्‍यांत पावसाच्या आशेवर पेरलेल्या खरिपाचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com