कालव्यातून पाण्याची चोरी (व्हिडिओ)

धायरी - कालव्यातील पाणी बेकायदा वीजपंपाद्वारे उपसून टॅंकर भरले जात आहेत.
धायरी - कालव्यातील पाणी बेकायदा वीजपंपाद्वारे उपसून टॅंकर भरले जात आहेत.

पुणे : उन्हाचा तडाखा वाढल्याने शहरात पाण्याची मागणी वाढत असून, अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने टँकरची मागणीही वाढली आहे.

‘खडकवासला’च्या मुठा उजवा कालव्यातून टँकर लॉबी दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी करून मोठ्या प्रमाणावर माया कमवत आहेत. कालव्यातून वाहणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पाटबंधारे खात्याकडून ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचे ‘सकाळ’च्या वतीने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. 

यंदा धरणात पाणीसाठा कमी असल्याने पुण्याच्या पाण्यात कपात केली आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर नवीन बांधकामे होत असून, त्याठिकाणी राहण्यासाठी आलेल्या नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्याचाच गैरफायदा टँकर लॉबीकडून उठविण्यात येत आहे.

वडगाव, धायरी आणि परिसरात शेतीच्या नावाखाली पाणी पळविण्याचा उद्योग सुरू आहे. धायरी परिसरातून वाहणाऱ्या कालव्यात मोटार आणि पाइपच्या माध्यमातून पाणी शेजारील विहिरीमध्ये घेतले जाते.

त्याचठिकाणी टँकर भरण्याची स्वतंत्र व्यवस्थाही केली आहे. या ठिकाणावरून दररोज २५ ते ३० टँकर भरले जात आहेत. टँकर भरण्याची अशी चार ठिकाणे धायरीत आहेत. या चार ठिकाणांवरून रोज सुमारे शंभर ते सव्वाशे टँकरद्वारे लाखो लिटर पाण्याची चोरी होत असल्याचा हिशेब आहे. 

धायरी हे फक्त एक उदाहरण आहे. खडकवासल्यापासून पुण्याच्या हद्दीबाहेर कालवा जाईपर्यंत ठिकठिकाणी अशा प्रकारची पाणीचोरी होत आहे. एवढे होत असताना पाटबंधारे खात्याने मात्र त्याकडे पूर्णपणे काणाडोळा केला आहे.

पाण्याची चोरी
- कालव्यातून रोज ९० लाख लिटर पाण्याची चोरी
- वीजपंपाच्या साह्याने पाण्याचा उपसा
- विजेचीही चोरी
- सोसायट्यांकडून पाण्याची मागणी
- बेकायदा बांधकामांनाही पुरविले जाते पाणी

सोसायटीमध्ये दररोज टॅकरने पाणी घेतले जाते. त्यासाठी सुमारे अडीच लाख रुपये महिन्याला खर्च करावे लागत आहेत. पिण्यासाठीही पाणी विकत घ्यावे लागत आहे. आमच्या सोसायटीत महापालिकेचे पाणी येत नाही. याबाबत तक्रार करूनही महापालिकेकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे नाइलाजाने आम्हाला विकत पाणी घ्यावे लागते.
- शुभांगी गायकवाड, रहिवासी, ऋतूनगरी अपार्टमेंट, बेनकर वस्ती, धायरी 

महापालिकेचे अपुरे पाणी मिळते. त्यामुळे पाण्याचा टँकर मागवला जातो. मात्र, टँकरचालक भरमसाट पैसे घेतात. 
- सुरेश मालुसरे, सिद्देश अपार्टमेंट 

टँकरमाफियांकडून कालव्यातून पाणीचोरीच्या घटना घडत असतील, तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल. कालव्यातून पाणी चोरी होऊ नये, यासाठी आवश्‍यक उपाययोजना केल्या जातील.
- पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com