रिक्षा चालवून स्वाभिमानाने जगू

रिक्षा चालवून स्वाभिमानाने जगू

पिंपरी - कागद, काच, पत्रा, कचरा वेचून किंवा घरकाम करून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा खर्च भागवला जात नव्हता. आता रिक्षा चालविण्याचा परवाना मिळाल्यामुळे स्वाभिमानाने जीवन जगता येणार आहे. विशेषतः शालेय विद्यार्थिनी आणि महिला प्रवाशांना सुरक्षिततेची खात्री मिळणार आहे, अशा भावना रिक्षा चालविण्याचा परवाना मिळालेल्या महिलांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

धुणी-भांडी, घरकाम करणाऱ्या व कागद-काच-पत्रा, कचरा वेचणाऱ्या कष्टकरी शंभर महिलांना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ३) दुपारी पिंपरीत रिक्षा चालविण्याचा परवाना व रिक्षांचे वितरण होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर संवाद साधला असता, बहुतांश रिक्षाचालक महिलांनी शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वाहतुकीला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. कष्टकरी कामगार पंचायत आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या पुढाकारातून रिक्षाचालक साहेबराव काजळे, हरिभाऊ व व्यावसायिक प्रशिक्षक विनोद वरखडे यांनी कष्टकरी महिलांना रिक्षा चालविण्याचे मोफत प्रशिक्षण दिले. त्यासाठी स्वतःच्या रिक्षांचा वापर केला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील आणि घरकाम महिला सभा संस्थेच्या अध्यक्षा आशा कांबळे यांनी महिलांना प्रोत्साहन देऊन रिक्षा परवाना, रिक्षा चालविण्याचा परवाना व बॅज मिळवून दिले. 

महिला रिक्षाचालक म्हणाल्या...
काळेवाडीतील नसरीन शेख म्हणाल्या, ‘‘रिक्षा चालवून कुटुंबाला मदत होईल. रिक्षाचालक महिला असल्याने विद्यार्थिनींचे पालक चिंतामुक्त होतील.’’ गांधीनगर येथील वंदना येंकुळे म्हणाल्या, ‘‘मी घंटागाडीवर कंत्राटदारातर्फे काम करीत होते. त्या पगारात कुटुंबाचा खर्च भागवला जात नव्हता. आता स्वाभिमानाने जीवन जगता येईल.’’ खराळवाडीतील सुनीता येंकुळे म्हणाल्या, ‘‘शिक्षिका होण्याचे माझे स्वप्न होते. त्यासाठी पतीच्या सहकार्याने एमए 

बीएडपर्यंत शिक्षण घेतले. पण, नोकरी मिळाली नाही. आता स्वतःचा रोजगार मिळणार आहे.’’ काळेवाडीतील प्रीती पवार म्हणाल्या, ‘‘मी बीए पदवीधर आहे. कंपनीत बारा तास काम करून सात-आठ हजार रुपये मिळत होते. रिक्षा चालवायला पतीसह सासू-सासऱ्यांनीही सहकार्य केले आहे.’’

रिक्षा परवाना घेतलेल्या महिला कष्टाळू आहेत. रिक्षा चालवून त्या सन्मानाने जीवन जगतील. स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभ्या राहून स्वाभिमानाने त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतील.
- आशा कांबळे,  अध्यक्षा, घरकाम महिला सभा

शंभर टक्के अर्थसाह्य
रिक्षा घेण्यासाठी एचडीएफसी व स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांनी शंभर टक्के कर्ज उपलब्ध करून दिले आहे. टीव्हीएस कंपनीच्या सीएनजी रिक्षा आहेत. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीतर्फे शंभर महिलांना संगणक संच किंवा ३२ इंच टीव्ही भेट देण्यात येणार आहे. आपली गरज व पसंतीनुसार महिलांनी संगणक वा टीव्ही निवडायचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com