Weather Update Maharashtra : पावसाचा जोर आता ओसरणार

हवामान खात्याचा अंदाज : पुण्यात निरभ्र वातावरणाची शक्यता
Weather Update Maharashtra Rains to subside pune weather forecast
Weather Update Maharashtra Rains to subside pune weather forecastesakal

पुणे : विजांच्या कडकडाटात पडणाऱ्या पावसाचा जोर आता कमी होणार आहे. शहर व परिसरात बरसल्यानंतर पावसाची स्थिती आता निवळण्याची चिन्हे असून पुढील आठवडाभर पुणे व परिसरात निरभ्र वातावरणाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे तापमानात वाढ होत उन्हाचे चटके नागरिकांना अनुभवावे लागणार आहेत.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहर आणि परिसरात दुपारनंतर ढगाळ वातावरणासह पावसाची स्थिती पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरण आणि पावसाच्या स्थितीमुळे शहरातील कमाल तापमानातही सरासरीपेक्षा घट नोंदली जात होती.

सोमवारी (ता. ८) सुद्धा सायंकाळनंतर शहरासह उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाडा व उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. शहरात ९.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर ३६.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते.

हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारपासून (ता. १०) जिल्ह्यात निरभ्र वातावरण राहणार आहे. तसेच कमाल तापमानात वाढ होत उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. शहर व परिसरात या आठवड्याभरात कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे नागरिकांनी विशेषतः सकाळी ११ ते ३.३० या कालावधीत घराबाहेर पडणे टाळावे. उष्माघाताचा धोकाही यामुळे उद्भवण्याची शक्यता असल्याने पुणेकरांनी आवश्‍यक काळजी घ्यावी, असे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे.

वादळी पाऊस राज्यातून निरोप घेत असतानाच आता कमाल तापमानात चांगलीच वाढ होत आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्यावर गेला असून उन्हाचे चटके वाढले आहेत. दरम्यान, ही स्थिती पुढील चार दिवस अशीच कायम राहणार असून मंगळवारी (ता. ९) दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्‍यपी यांनी सांगितले, ‘‘आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून बुधवारपर्यंत (ता. १०) या प्रणालीची तीव्रता वाढत असून त्याचे ‘मोचा’ चक्रीवादळात रुपांतर होण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर ही प्रणाली उत्तरेकडे सरकत बांगलादेश, म्यानमारच्या किनाऱ्याकडे पोहोचण्याचा अंदाज आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यातील आद्रता कमी होत असल्याने पावसाचा जोर कमी झाला आहे. परिणामी, तापमानातही कमालाची वाढ होत आहे.’’

राज्यात सोमवारी (ता. ८) उच्चांकी तापमानाची नोंद अकोला येथे ४२ अंश सेल्सिअस इतकी झाली. तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे असल्याने उन्हाच्या झळा कायम आहेत. किमान तापमानाचा पारा सुद्धा २४ अंशांच्या पुढे असल्याने उकाडा जाणवत आहे.

येथे पारा ४० अंशांच्या दरम्यान...

  • जळगाव ४१

  • अकोला ४२

  • वर्धा ४०

शहर आणि परिसरात झालेला पाऊस (मिमी मध्ये)...

  • पुणे शहर ९.५

  • एनडीए ९

  • तळेगाव ७.५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com