विधानसभा निवडणुकीशिवाय सत्ताधाऱ्यांना काहीही सुचत नाही : पवार

Ajit Pawar in Baramati
Ajit Pawar in Baramati

बारामती : राज्यात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे, उद्योग व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे, सामान्य माणूस हतबल झाला आहे, शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलेला नाही, असे असताना सत्ताधाऱ्यांना मात्र विधानसभेच्या निवडणुकी व्यतिरिक्त इतर काहीही सुचत नाही, अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर केली.

बारामतीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात पवार बोलत होते. पवार म्हणाले, राज्यात सुरू असणाऱ्या घडामोडी पाहता काहीही घडू शकते, स्वतःच्या ताकदीवर सरकार आणण्याची स्वप्ने काही पक्षांना पडू लागली आहेत. त्यामुळे अजून बरीच उलथापालथ पाहायला मिळेल. दुसरीकडे काहीही झाले तरी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी करूनच विधानसभेच्या निवडणुका समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढणार आहे. 

नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेअर बाजारात जी घसरण झाली, त्यामुळे सामान्यांचे सहा लाख कोटी रुपये बुडाले असा आरोप पवार यांनी केला. दरम्यान 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर बारामती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत त्यांनी विधानसभेची निवडणूक ही बॅलेट पेपरवर व्हावी अशा आशयाचे ठराव करून ते निवडणूक आयोगाला पाठवावेत, असे आवाहनही त्यांनी केले. 

कररूपाने जनतेकडून गोळा केलेल्या पैशातून वृत्तपत्रांत सह इलेक्ट्रॉनिक मीडियावर सरकार स्वतःचा उदो उदो करून घेत आहे, कोणताही व्यवहार्य विचार न करता निर्णय घेऊन लोकांना खूष करण्याचे काम केले जात आहे, मात्र यामुळे राज्याचे नुकसानच होणार आहे. सरसकट कर्जमाफी देऊ असा शब्द मुख्यमंत्र्यांनी माझ्या प्रश्नाला उत्तर देतांना दिला होता, मात्र तीन वर्षे उलटूनही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालाच नाही, असा आरोप पवार यांनी केला.

उजनी धरण 30 टक्क्यांच्या पुढे गेले असते आणि आमचे सरकार असते, तर मी तातडीने कालव्याला पाणी सोडायचे निर्देश दिले असते. मात्र, या सरकारला अजूनही जाग येत नाही. उजनी भरून त्याचे पाणी कर्नाटकात निघून जाईल तेव्हा या सरकारला जाग येईल, अशी टीका त्यांनी सरकारवर केली. इतिहास बघून व थोडे धाडस करून असे निर्णय घ्यावे लागतात, असे पवार म्हणाले.

सकारात्मक बाजू अधिक प्रभावीपणे मांडणार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर टीकाटिपणी करून वेळ घालविण्यापेक्षा सकारात्मक बाजू घेऊन लोकांच्या पुढे जाण्याचा मनोदय अजित पवार यांनी आजच्या मेळाव्यात बोलून दाखवला.  

दरम्यान या मेळाव्यात भाजपच्या डॉक्टर अर्चना पाटील यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले. किरण गुजर व त्यांच्या सहका-यांनी प्रकाशित केलेल्या विकासाची वाटचाल या पुस्तिकेचे प्रकाशनही अजित पवार यांनी केले. 

सुरवात बारामतीपासून करायची का?
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांचा उल्लेख पुणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री असा गंमतीने करताना त्यांनी मला या निवडणूकीत नवीन चेह-यांना संधी द्या असा आग्रह केल्याचे अजित पवार यांनी सांगितले, त्या वेळी नव्या चेह-याची सुरवात बारामतीपासूनच करायची का असे मी त्यांना गंमतीने विचारल्याचे सांगताच चांगलीच खसखस पिकली. मात्र बारामती नव्हे तर इतर ठिकाणी नव्या चेह-यांना संधी द्यावी, असे ते म्हणाल्याचा खुलासाही अजित पवारांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com