पुणे - माहेरून हुंडा घेऊन येण्यासाठी विवाहितेचा दीर आणि सासूने गळा दाबून खून केल्याची घटना विश्रांतवाडी येथे उघडकीस आली आहे. शुक्रवारी ही घटना घडली आहे. याप्रकरणी दिरासह तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
कविता चेतन रेड्डी (वय 28, रा. आनंदपार्क, धानोरी) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी दीर सोनू अंजनिया रेड्डी (वय 24) आणि तीन महिलांना अटक केली आहे. यासंदर्भात कविता हिचे वडील करबासप्पा हणमंतराव मळ्ळी (वय 60, रा. कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षापूर्वी कविताचा चेतनबरोबर विवाह झाला होता. कविता ही कर्नाटकातील आहे. ती उच्चशिक्षित आहे. दरम्यान, पती चेतन व त्याचे कुटूंबीय सेंट्रिंगची कामे करतात. आनंद पार्क भागात स्वत:चा बंगला आहे. लग्नानंतर मात्र, सासू, सासूची बहीण, दीर आणि ननंद हे कविता यांना लग्नात काहीच दिले नाही, असे म्हणून टोमणे मारत असे. तसेच, तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. त्यामुळे कविता ही शक्यतो सासूंसोबत बोलत नसे. काम संपवून ती तिच्या खोलीत जात असे. पती आल्यानंतरच पुन्हा खालच्या खोलीत येत असे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी कविता वडिलांना फोन करून बोलत होती. त्या वेळी अचानक सासूने आवाज देऊन बोलाविल्याचे कविताच्या वडिलांनी ऐकले. त्यांनी काही वेळाने परत फोन लावला. मात्र, कविता यांचा फोन लागत नव्हता. त्यामुळे त्यांनी जावई चेतन यांना फोनकरून विचारले. त्या वेळी ते बाहेर असल्याने घरी जाऊन पाहतो, असे सांगितले. दरम्यान दीर व तीन महिलांनी कविता यांना माहेरूवरून हुंडा घेऊन येण्यासाठी वाद घालून त्यांचा गळा दाबून खून केला. चेतन हे घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अधिक तपास विश्रांतवाडी पोलिस करत आहेत.
|