झिनिया सोसायटीला हवाय हक्काचा रस्ता 

PAU19A02939_org.jpg
PAU19A02939_org.jpg

पुणे : सेवारस्ता नसल्याने चांदणी चौकातील झिनीया सोसायटीमधील रहिवाशांचे हाल होत आहेत. रहिवासी हक्काच्या रस्त्यासाठी गेली दहा वर्षे बांधकाम व्यावसायिक, महापालिका व लोकप्रतिनिधींकडे मागणी करत आहेत; परंतु कोणीही त्याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. 

या सोसायटीत जाण्यासाठी चार किलोमीटरचा वेढा मारावा लागतो. त्यामुळे नागरिकांचे विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सोसायटीत दुकान नसल्याने किराणा, दूध, भाजीपाला या सर्वच गोष्टींसाठी रहिवाशांना लांबचा फेरा पडत आहे. 

सभोवताली असलेले एनडीएचे जंगल, बाह्यवळण मार्ग, विकसित झालेले कोथरूड या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही येथे जागा घेतली. सुरवातीला आम्हाला मागच्या बाजूने तात्पुरता रस्ता दिला होता. आता तो तेथील जागामालकाने बंद केला आहे. जागेसाठी महापालिकेकडे पैसे भरले आहेत, असे बांधकाम व्यावसायिकाने सांगितले. त्यावर विश्वास ठेवून आम्ही ही घरे घेतली; पण आता आम्हाला पस्तावा होत आहे. रस्ता नसताना महापालिकेने नवीन इमारती बांधायला परवानगी दिलीच कशी? आम्हाला मुलांना शाळेत सोडायला गाडी मिळत नाही. भरधाव रस्त्यावरून मुलांना ने-आण करणे अवघड होते. चांदणी चौकाच्या कामासाठी खोदकाम सुरू असल्याने आमच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

रस्त्याच्या बाजूला लावलेल्या पत्र्यामुळे बाजूने येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. आमची सुरक्षितता धोक्‍यात आली आहे. अशी व्यथा येथील रहिवासी राजाभाऊ शिंगटे, उर्मिला महाजन, अमित गीरगोसावी, शुभांगी पोतदार, सरला इखार, जयश्री शिंगटे, अनू कस्तुरे, रत्ना आपटे, प्रज्ञा गुप्ता, प्रवीण हेबारे यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. सर्वांनी सांगितले की, आम्हाला रस्ता न मिळाल्यास आम्ही 148 कुटुंबे महामार्गावर बसून आंदोलन करू. 

चांदणी चौकात उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास चार ते पाच वर्षे लागण्याची शक्‍यता आहे. तोपर्यंत रस्ता मिळणे शक्‍य दिसत नाही. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना रस्त्यासाठी हाल काढणे सहन होईल का? याची चिंता येथील ज्येष्ठ नागरिकांना पडली आहे. 

इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही आवश्‍यक असणाऱ्या सेवारस्त्याचे काम झालेले नाही. असे असतानाही अधिकाऱ्यांनी इमारतीसाठी बांधकाम पूर्ण झाल्याचे पत्र दिले आणि त्यामुळे बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅटची विक्री केली. आज आठ वर्षांनंतरही हे काम रखडलेलेच आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळेच नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. प्रथम अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी. 
राधिका टिपरे, रहिवासी 

अधिकाऱ्यांचे एकमेकाकडे बोट 
मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता, "या विषयावर मला माहिती नाही. अमर शिंदे यांच्याशी संपर्क साधा. शिंदे यांनी या विषयावर बोलण्याचे टाळत फोन बंद केला. त्यांच्या या प्रतिक्रियेवर रहिवाशांनी वाघमारे यांना सकाळीच जाऊन दिलेल्या निवेदनाची प्रत दाखवली. या सर्व प्रकारात अधिकारीच एकमेकाकडे बोट दाखविताना दिसले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com