
Mukesh Ambani: मुकेश अंबानींनी 'या' कंपनीच्या जोरावर फेडलं रिलायन्सचं तब्बल 1,61,035 कोटी रुपयांचं कर्ज
Mukesh Ambani Birthday: देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आज 66 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी भारताबाहेर येमेनमध्ये झाला.
आशियातील सर्वात श्रीमंत आणि जगातील अब्जाधीशांच्या यादीत 13 व्या स्थानावर विराजमान असलेले मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूह सतत नवनवीन उद्योगांमध्ये भरारी घेत आहे.
रिलायन्सचे मार्केट कॅप सध्या 15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्यानुसार जगातील सर्वात मौल्यवान 50 कंपन्यांमध्ये तिचा समावेश आहे. वडील धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी यांनी रिलायन्सची सूत्रे हाती घेतली आणि मोठ्या उंचीवर नेले.
अलीकडेच, फोर्ब्सने 2023 ची अब्जाधीशांची यादी जाहीर केली आणि मुकेश अंबानी यांना आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान देण्यात आला.
फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, मुकेश अंबानी 84.1 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील अब्जाधीशांच्या यादीत 13 व्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षीपर्यंत अंबानींचा या यादीत टॉप-10 मध्ये समावेश होता.
मुकेश अंबानींचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास खूप रंजक राहिला आहे. जिथून त्यांचे वडील दिवंगत धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज सोडली होती, तेथून अंबानींनी तिला अशा टप्प्यावर नेले की देश आणि जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये तिचा समावेश झाला.
मध्येच अभ्यास सोडून व्यवसायात उडी :
मुकेश अंबानी यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेशही घेतला, पण अभ्यास मध्येच सोडून त्यांनी वडिलांसोबत व्यवसाय करण्यास सुरुवात केली.
मुकेश अंबानी यांनी 1981 मध्ये वडील धीरूभाई अंबानी यांच्यासोबत रिलायन्स ग्रुपमध्ये एंन्ट्री घेतली. यानंतर, 1985 मध्ये कंपनीचे नाव रिलायन्स टेक्सटाईल इंडस्ट्रीज लिमिटेड बदलून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड करण्यात आले.
आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून मुकेश अंबानी यांनी पेट्रोलियमशिवाय दूरसंचार क्षेत्रातही आपली पावले टाकली आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडची स्थापना केली.
जिओ कंपनीच्या जोरावर रिलायन्स कर्जमुक्त :
मुकेश अंबानींच्या दूरदर्शीपणामुळे, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL LTD) ने अवघ्या 58 दिवसांत Jio प्लॅटफॉर्म्सचा एक चतुर्थांश हिस्सा विकून 1.15 लाख कोटी रुपये उभे केले आणि राइट्स इश्यूद्वारे 52,124.20 कोटी रुपये उभे केले.
यामुळे कंपनी वेळेच्या नऊ महिने आधीच पूर्णपणे कर्जमुक्त झाली. 31 मार्च 2020 अखेर रिलायन्सवर 1,61,035 कोटी रुपयांचे कर्ज होते आणि कंपनीने 31 मार्च 2021 पर्यंत परतफेड करण्याचे लक्ष्य ठेवले होते.
मुकेश अंबानींनी नऊ महिन्या अगोदरच कंपनीला कर्जमुक्त केले आणि त्यात जिओने महत्त्वाची भूमिका बजावली.