SSC Result
SSC Result

दहावीच्या निकालाच्या निमित्ताने...

दहावीच्या परीक्षेचा निकाल यंदा कमी लागल्याने त्याच्या कारणांची चर्चा सध्या सुरू आहे. ही कारणे शोधून त्यावर उपाय करण्याची गरज आहे. 1) गेल्या वर्षीपर्यंत तीन भाषा विषयांत 300 पैकी 105 गुण (35 टक्के) मिळाले व एका भाषा विषयात कमीत कमी 25 गुण मिळाल्यास विद्यार्थी भाषा विषयात उत्तीर्ण होत असे. पण यंदापासून प्रत्येक भाषा विषयात स्वतंत्रपणे 35 टक्के गुण पासिंगसाठी आवश्‍यक केल्यामुळे (अर्थात, ग्रेस गुणांची सवलत आहे.) यावर्षीच्या परीक्षेत बरेच विद्यार्थी इंग्रजी, मराठीसारख्या विषयात नापास झाले आहेत.

2) गणित विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेचा पॅटर्न बदलल्याने गणितातही बरेच विद्यार्थी नापास झाले असतील. 3) उत्तरपत्रिका लिहिताना विद्यार्थ्यांचा लिखाणाचा वेग कमी पडला असेल. त्यामुळे भाषा विषयांचा तीन तासांचा पेपर, पूर्ण 100 गुणांचे प्रश्‍न, विद्यार्थी लिहू शकले नसतील. गणितातही (विशेषतः भाग दोन पेपरात) दोन तासांत 40 गुणांचे प्रश्‍न विद्यार्थी सोडवू शकले नसतील. नववीच्या भागावरील प्रश्‍नातही सरावाअभावी गुण गेले असतील. 4) काही विद्यार्थी सर्व विषयांचा संतुलित अभ्यास करत नाहीत. त्यामुळे आवडत्या विषयात 100 पैकी 60 गुण व गणितात मात्र 100 पैकी 22 गुण मिळाल्याने विद्यार्थी नापास झाले. गणितात 25 गुण मिळाले असते, तर 10 गुणांची (ग्रेस गुण) सवलत मिळून ते पास झाले असते.

दहावीचा निकाल वाढण्यासाठी 2019-2020 च्या शैक्षणिक वर्षात पुढील उपाय करणे गरजेचे आहे. 
1) अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून केले पाहिजे. उदाहरणार्थ गणित भाग दोनची पहिल्या सत्रात सराव 1, 2, 4, 7 अशी चार प्रकरणे व्यवस्थित शिकवावीत. 2) विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्ययनाला वाव दिला पाहिजे. उदाहरणार्थ गणित भाग एक, पान 2 सोडवलेले उदाहरण एक अभ्यासून विद्यार्थी सरावसंच 1.1 मधील प्रश्‍न 2 मधील उपप्रश्‍न 3 सोडवू शकतात. पाठ्यपुस्तकातील सोडवलेली उदाहरणे पाहायला जूनमध्येच विद्यार्थ्यांना सांगितली पाहिजेत. 3) सर्वसाधारण विद्यार्थ्यांना जूनपासूनच सर्व विषयांचा संतुलित अभ्यास करण्यास सांगावे. बोर्डाच्या परीक्षेत गणितात 100 पैकी 22 गुण व आवडत्या विषयात 100 पैकी 60 गुण काय कामाचे? 4) चाचणी परीक्षेचा निकाल लागल्यावर उत्तरपत्रिकेतील चुकांची दुरुस्ती विद्यार्थ्यांकडून वर्गात करून घेतली तरच सहामाही परीक्षेत त्या चुका विद्यार्थी करणार नाहीत. 5) उत्तरपत्रिका लिहिण्याचा सराव जुलैपासूनच होण्यासाठी गृहपाठ देऊन तो काही प्रमाणात तपासला गेला, तरच विद्यार्थ्यांना चुका कळतील व विद्यार्थी घरी अभ्यास करायला लागतील.

विद्यार्थी व पालकांनी सर्व विषयांचा नियमित अभ्यास होईल असे पाहावे. गणिताच्या चाचणी परीक्षेचे गुण, बोर्डाच्या परीक्षेत धरले जातात हे लक्षात ठेवावे. नववीच्या गणित भागाचाही आठवड्यातून एकदा तरी सराव करावा. पालकांनी सण व सुट्या यात पाल्याचा वेळ वाया जात नाही, इकडे लक्ष द्यावे. कोकण विभागाचा निकाल कायम जास्त लागतो. याचा अर्थ तेथील विद्यार्थी व त्यांचे पालक, तसेच शालेय व्यवस्थापन यांनी प्रयत्नात सातत्य राखले आहे, हा धडा आता पुणे, मुंबई, नागपूर विभागातील विद्यार्थी, पालक व शालेय व्यवस्थापनाने घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com