संकल्प आणि सिद्धी

arunmande
arunmande

कोयनेचं धरण पाहून झाल्यावर आम्ही कोल्हापूरच्या दिशेनं निघालो. वाटेत रस्त्याच्या कडेला वडाचं झाड दिसलं. तेथे गर्दी होती. ड्रायव्हरनं गाडी थांबवली. खाली उतरत तो म्हणाला, ‘इथली देवी नवसाला पावते. दर्शन घेऊ.’ आम्ही उतरलो. वडाखाली एक चौथरा होता आणि चौथऱ्यावर शेंदूर लावलेला तांदळा. माझं लक्ष सहज पारंब्यांकडे गेलं. प्रत्येक पारंबीला अक्षरशः शेकडोंनी पितळी घंटा लाल धाग्यानं बांधलेल्या. देवी नवसाला पावली की एक घंटी पारंबीला बांधायची अशी प्रथा होती. म्हणजे एवढ्या लोकांनी नवस केले होते. मोटारीत माझ्या शेजारी बसलेल्या मित्राला म्हणालो, ‘मी माझ्या आयुष्यात कधीच नवस केला नाही आणि समजा नवस केला तर तो कधीच पूर्ण होणार नाही.’ माझ्या मित्रांनं विचारलं. ‘का’? म्हणालो, ‘कारण, नवस केला की तो पूर्ण होतो यावर माझा विश्‍वासच नाही.’ ‘तुझा परमेश्‍वरावर तरी विश्‍वास आहे की नाही’? त्यानं विचारलं. ‘नाही’ मी म्हणालो. ‘आणि स्वतःवर’? त्यानं विचारलं. मी म्हणालो. ‘अर्थातच आहे.’ तो म्हणाला, ‘नाही. तुझा तुझ्यावरसुद्धा विश्‍वास नाही. असता तर ‘नवस पूर्ण होणार नाही.’ असं म्हणाला नसता. एकतर तुमचा परमेश्‍वरावर विश्‍वास हवा, म्हणजे तुमच्या सगळ्या इच्छा परमेश्‍वर पूर्ण करतो; किंवा मग तुमचा स्वतःवर तरी विश्‍वास हवा, म्हणजे तुमची कोणतीही इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता.’

‘पण माझा माझ्यावर विश्‍वास आहे, म्हणूनच मी सांगतोय की मी केलेला नवस पूर्ण होणार नाही.’ मी म्हणालो.

माझा मित्र म्हणाला, ‘स्वतःवर विश्‍वास असणं म्हणजे स्वतःच्या विचारांवर विश्‍वास असणं. तुझा तुझ्या विचारांवर विश्‍वास नाही म्हणूनच तुझा नवस पूर्ण होणार नाही. संकल्प आणि सिद्धी यांच्यामध्ये अडसर असतो तो स्वतःचाच असतो. तू नकारात्मक विचार करतोस. नकारात्मक विचारांनी यश कधीच मिळत नाही. विचार सकारात्मक असतील, तर यश मिळतं. विचारांमध्ये किती सामर्थ्य असतं. याविषयी फ्रॅंक आउटलॉनं फार सुंदर सांगितलंय. तो म्हणतो... 

तुमच्या विचारांवर लक्ष ठेवा, विचारच शब्द बनतात.
शब्दांवर लक्ष ठेवा, कारण तुमचे शब्दच कृती बनतात
कृतीवर लक्ष ठेवा, कारण तुमची कृती सवय बनते.
सवयीवर लक्ष ठेवा, कारण सवय तुमचं चारित्र्य बनतं.
चारित्र्यावर लक्ष ठेवा, कारण चारित्र्य तुमची नियती बनते.’

तो म्हणाला, ‘तुमचा तुमच्या विचारांवर विश्‍वास असेल तर तुम्ही नियती घडवू शकता.’मग मी त्याला विचारलं, ‘वसंतरावांनी संकल्प केला तो पूर्ण का झाला नाही?’तो म्हणाला, ‘संकल्प नेहमी स्पष्ट हवा. वजन ८० किलो असेल, तर ६५ पर्यंत कमी करायचंय असा संकल्प हवा. वजन कशासाठी कमी करायचंय? निरोगीपणासाठी, चांगलं दिसण्यासाठी किंवा चांगलं वाटण्यासाठी. काय व का हवंय हे माहीत असेल, तर योजना आखता येते. त्यात कोणत्या अडचणी आहेत याचा विचार करता येतो. योजना आखली म्हणजे ती पूर्ण करण्याच्या मागे आपण लागतो आणि ध्येय पूर्ण होतेच!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com