आत्मबल

editorial dr shrikant chorghade write article in pahatpawal
editorial dr shrikant chorghade write article in pahatpawal

सगुणाबाई हयात असती, तर तिनं आज शंभरी गाठली असती. आम्ही नव्या घरी राहायला आलो तेव्हापासून ती आमच्या घरी धुणीभांडी करायची. साठ वर्षांपूर्वी तिचा पगार होता अवघा नऊ रुपये. ती अतिशय कष्टाळू, प्रामाणिक होती. धुवायला दिलेल्या कपड्यात चुकून पैसे राहिले, तर आणून द्यायची. मनात यायचं हिच्या आई-वडिलांनी किती समर्पक नाव ठेवलं होतं. बरीच म्हातारी होईपर्यंत ती आमच्याकडे होती. शेवटी काम झेपेना म्हणून तिनं येणं बंद केलं. तेव्हा तिचा पगार वाढत 100 रुपये झाला होता. काम सोडलं तरी कधीमधी घरी यायची. पत्नीशी गप्पा मरायची. पत्नी तिला चहा द्यायची. अशी पहिल्यांदा आली, तेव्हा पत्नीनं तिला दहाची नोट दिली. त्यावर ती म्हणाली, "बाई, मले हरामाचा पैसा नाई पायजे.' त्यानंतर माझी पत्नी काही तरी काम देऊन मग पैसे द्यायची. गरिबीमध्ये राहूनसुद्धा अशी दानत म्हणजे संस्काराचाच भाग. घरची स्थिती यथातथा असूनही पैशाचा मोह नसणे, हे संस्कारातूनच येतं. यासाठी किती मनोनिग्रह लागत असेल, मोहावर विजय मिळवावा लागत असेल. अशी वृत्ती तर पैशाने अनुकूल परिस्थिती असलेल्यांमध्येही दुर्मीळ असते.

एखादा मल्ल व्यायामाने शरीरयष्टी कमावतो व शक्‍ती वाढवतो, तशीच मनाची बलोपासना असते. आपल्या मनाला इच्छेप्रमाणं कृती करायला लावण्यासाठी आत्मबल वाढवणं आवश्‍यक असतं. आत्मबल वाढवायचं आहे, ही ऊर्मी मनात असणं ही आत्मबल कमावण्याची पहिली पायरी. त्यानंतर छोटे-छोटे संकल्प करून ती संकल्पसिद्धी काटेकोरपणे करायची, यामुळे मनावरचा ताबा वाढेल, आत्मविश्‍वास वाढेल. याची सुरवात करताना छोटासा व्यायाम करून बघायचा.

नुकतीच महाशिवरात्र झाली. अनेकांनी उपवास केला असेल. उपवास करताना काही मंडळी खरा उपवास करतात. म्हणजे निराहारी राहतात. काहीच खात नाहीत. काही त्यांच्या समजुतीप्रमाणे उपवासाला चालणारे पदार्थ खातात. यापैकी कुठलाही प्रकार निवडून उपवास करून बघायला हरकत नाही. या 24 तासांच्या काळात मोहाचे क्षण येऊ शकतात. इतर लोक रोजचं जेवण घेताना बघून वासना चाळवत असेल, तरी मनोनिग्रह कायम ठेवणं तुमच्या हाती असतं. कुणी गुरुवारचा, कुणी शुक्रवारचा उपवास करतात. तुम्हीही असा आठवड्यातून एक किंवा दोन उपवासाचा संकल्प करून पाळू शकता. आमची आजी निर्जळी एकादशी करायची म्हणजे अन्न तर नाहीच; पण पाणीही पीत नसे आणि हे व्रत ती कसोशीने पाळायची. वैद्यकीय दृष्टीने हे व्रत उन्हाळ्यात जिवावर बेतू शकतं. पण, असा कठीण प्रयोग करून बघायला हरकत नाही.

पुढचा प्रयोग शब्द पाळण्याचा. उपवास हा शब्द तुम्ही पाळलात, तसाच दुसऱ्याला कबूल केलेला शब्द पाळायचा संकल्प करा. सांगितलेलं काम सांगितलेल्या वेळेत पूर्ण करायचं, दुसऱ्याला दिलेली वेळ पाळायची. शक्‍य वाटत नसलं, तर शब्दच द्यायचा नाही; पण शब्द दिला, तर तो हट्टाग्रहाने पाळायचा. सवयीने हे शक्‍य होतं. हे शक्‍य होतं तेव्हा आत्मविश्‍वास वाढतो. आत्मबल वाढतंच; पण इतरांच्या लेखी आपली विश्वासार्हता वाढते. तुम्ही नोकरीत असा की व्यवसायात, तुमच्या शब्दावर लोकांचा विश्‍वास असला, तर यशस्वी होण्याचा मार्ग सुकर होतो. तुमचा शब्द लाख मोलाचा ठरतो. व्यायाम करणं, फिरायला जाणं, आहारावर नियंत्रण ठेवणं, हेही अशाच प्रकारचे आत्मबल मिळविण्याचे मार्ग आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com