आज गुरूपौर्णिमा! श्री श्री रविशंकर सांगताहेत गुरूपौर्णिमेचं महत्त्व

Gurupaurnima special article by Sri Sri Ravishankar
Gurupaurnima special article by Sri Sri Ravishankar

गुरुपौर्णिमा विशेष 

आध्यात्मिक मार्गावर मार्गक्रमण करीत असताना आपण किती वाईट सवयींना सोडून नवीन चांगल्या गोष्टी शिकलो, याबद्दल अंतर्मुख होऊन पडताळणी करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.

मागील वर्षभरात गुरुकृपेमुळे आपण जे काही साध्य करू शकलो; त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आगामी वर्षांमध्ये आपण जे काही करू इच्छित आहोत, त्याबद्दल संकल्प घेण्याचा हा दिवस. आपणास प्राप्त झालेले आशीर्वाद आणि ज्ञानाबद्दल आभार व्यक्त करणे आणि ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनात कसे परिवर्तन घडवून आणता येईल, हे ठरविण्याचा दिवस असतो. 

प्रत्येकामध्ये काही ना काही अंशी गुरुतत्त्व असतेच. पालकत्व, मातृत्वाप्रमाणेच गुरुतत्त्व असते. कळत-नकळत, तुम्ही कधी ना कधी कोणाचे तरी गुरू झालेले असता. तुम्ही लोकांना सल्ला देता, मार्गदर्शन करता, त्यांची काळजी घेता, त्यांना प्रेमाने जवळ घेता. मात्र, कोणतीही अपेक्षा न करता हे तुम्ही करता, त्या वेळी खऱ्या अर्थाने तुम्ही गुरुतत्त्वाच्या मार्गावर आहात, असे म्हणता येईल. एक साधक, गुरू आणि देवत्व यांच्यातील संबंध म्हणजे एका सरळ रेषेची सुरवात, मध्य आणि शेवट असते. म्हणजेच, सुरवातीला बीज, एक लहान रोप आणि नंतर एक वृक्ष असते. आपल्या शरीरात कितीतरी अब्ज पेशी असतात आणि प्रत्येक पेशीचे एक जीवन असते. प्रत्येक क्षणाला असंख्य पेशी तयार होतात आणि लयास जातात. ज्याप्रमाणे अनेक ग्रह, तारे सूर्याच्या भोवती भ्रमण करीत असतात; त्याचप्रमाणे कितीतरी पेशी तुमच्या शरीरात भ्रमण करीत असतात.

तुम्ही तुमच्या शरीरात संपूर्ण शहराचे व्यवस्थापन करीत असता मधमाश्‍यांच्या पोळ्याप्रमाणे. मधमाश्‍यांच्या पोळ्यामध्ये अनेक मधमाश्‍या असतात. परंतु, राणी माशी एकच असते. राणी माशी तिथून उडून गेल्यास सर्व मधमाश्‍या उडून जातात आणि संपूर्ण पोळे रिकामे होते. अगदी त्याचप्रमाणे आपल्या शरीरात कितीतरी अणू-रेणू असतात आणि त्यातला अगदी सूक्ष्म केंद्रबिंदू आत्मा असतो, जो स्थित असतो. मात्र, सर्वव्यापी असतो आणि तोच राणी माशी असतो. तो आत्मा म्हणजेच तुम्ही, देवत्व, गुरुतत्त्व. आत्मा, देवत्व, गुरुतत्त्व यात कोणताही फरक नसतो. हे सर्व एकच असतात ः राणी माशी. 

गुरू बुद्धीचे, ज्ञानाचे एक मूर्त स्वरूप आहे आणि विद्यार्थी एका आध्यात्मिक साधकाच्या रूपाने ज्ञानाच्या जवळ येण्यास उत्सुक असतो. संस्कृतमध्ये उपनिषदाचा अर्थ होतो गुरूंच्या सानिध्यात असणे; केवळ शरीरानेच नव्हे, तर बुद्धीनेही. म्हणजेच मर्याद, अमर्यादेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न, व्यक्त, अव्यक्तपर्यंत पोचण्याचा मार्ग याचे सूचक असते. गुरू आणि शिष्य यांच्यातील सानिध्य, संभाषण हे कालातीत आहे. विश्‍वामध्ये संघर्षाचे अनेक स्तर आहेत.

इतके संघर्ष असताना मग बौद्धिक स्तरावर जवळीक कशी निर्माण होईल? तर, सर्वप्रथम आपण शांततेचे आव्हान करतो. कारण, शांती असतानाच बौद्धिक स्तरावर जवळीक निर्माण होते. ज्या ठिकाणी अविश्‍वास असतो, संशय असतो; त्या ठिकाणी ज्ञानाचे आदान-प्रदान किंवा ज्ञानार्जन होऊ शकत नाही. म्हणून, सर्वच उपनिषदांची सुरवात "ओम शांती, शांती, शांती...' या प्रार्थनेने होते. शारीरिक, वैचारिक, भावनिक आणि शेवटी आत्मिक स्तरावर शांती असूद्या. देवत्व आपले संरक्षण करूद्या आणि चांगली बुद्धी देऊद्या. आपण एक-दुसऱ्यांचा द्वेष न करता शांततेने सर्वजण एकत्र होऊया. उपनिषदामध्ये साधकांकरिता दैवत्वाचे चार स्तर सांगितले आहेत.

सामिप्य ः म्हणजे देवत्वाची जवळीक जाणवणे, सानिध्य ः म्हणजे देवत्वाची उपस्थिती जाणवणे, सारूप्य ः म्हणजे देवत्व जे करीत आहे ते आपण करणे; दैवी अनुकरण करणे आणि सायुज्य ः म्हणजे देवत्वविलीन होणे. 

एक साधक, भक्त हा देवापेक्षाही उच्च असतो. खरेतर गुरू आणि साधक हे दोघेही देवच असतात. भक्तांचा स्तर उच्च करण्याकरिता आणि त्यांच्या महिम्याचे वर्णन करण्याकरिता भगवान स्वतःच तल्लीन होत असतात. वडील आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन मिरवतात त्याप्रमाणेच भक्त आणि देवाचे हे नाते असे. हनुमान श्रीरामापेक्षा बलवान नसता, तर त्याने श्रीरामाची मदत कशी केली असती, हे त्याप्रमाणे आहे जो माझ्यापेक्षाही बलवान असेल तोच माझ्या सुटकेसच ओझे वाहू शकेल. हनुमानाने श्रीरामाची मदत केली. परंतु, त्याला त्याचा कधीच गर्व वाटला नाही. हनुमानाला हे माहीत होते, की असे विचार केवळ भ्रमित करणारे आहेत आणि श्रीरामाची मदत करण्याचे भाग्य त्यांना लाभले. अगदी त्याचप्रमाणे देवत्वालासुद्धा तुमच्या मदतीची गरज आहे. म्हणून, आपण सर्व समाजाचे हित करण्यासाठी कार्य केले पाहिजे.

जो समाजहिताचे कार्य करतो, देवत्वाचे कार्य करतो देव स्वतःच त्याचे रक्षण करतो. देवत्वाचे कार्य करणे, समाजहिताचे कार्य करणे म्हणजेच तुमच्यात देवत्व उमलत आहे, याचे द्योतक असते. तुम्हाला जीवनात प्राप्त झाले आहे त्याबद्दलची जाणीव ठेवून, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याचा उत्सव साजरा करणे आणि हे ज्ञान ज्या गुरुपरंपरेमुळे संरक्षित आहे त्या सर्व गुरूंना अभिवादन करणे म्हणजेच गुरुपौर्णिमा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com