कर्नाटक : सर्वपक्षीयांची प्रतिष्ठा पणाला

kumaraswamy-and-yeddyurappa
kumaraswamy-and-yeddyurappa

कर्नाटकातील पोटनिवडणूक जेवढी भाजपसाठी महत्त्वाची आहे तेवढीच ती काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलासाठी (जेडीएस) प्रतिष्ठेची आहे. भाजपला सत्तेवरील मांड भक्कम करावयाची आहे. काँग्रेसला आणखी मजबूत बनायचे आहे, तर जास्तीत जास्त जागा मिळवून ‘जेडीएस’ला बार्गेनिंग पॉवर वाढवायची आहे. जो जास्त जागा जिंकेल, तो कर्नाटकातील सत्तेच्या केंद्रस्थानी येणार, हे नक्की. सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलातून फुटून निघालेल्या आमदारांना अपात्र ठरविले आणि त्याच वेळी त्यांना पोटनिवडणूक लढविण्यासही मुभा दिली.

पोटनिवडणूक लढविण्यास हिरवा कंदील मिळताच या आमदारांचा तातडीने भाजपप्रवेश करण्यात आला आणि त्यांना उमेदवारीही बहाल करण्यात आली. ५ डिसेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आता प्रचाराचा धुरळा उडेल.
गेल्या वर्षी मे महिन्यात निवडणुका होऊन येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सर्वाधिक जागा मिळवून (१०४) राज्यातील क्रमांक एकचा पक्ष बनला.

मात्र, त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी हे संख्याबळ पुरेसे नव्हते. त्यांनी सरकार स्थापन केले खरे; पण ते विश्‍वासदर्शक ठरावावेळीच गुंडाळण्यात आले. याचा फायदा उठवत मग सिद्धरामय्या यांची काँग्रेस आणि कुमारस्वामी यांचे धर्मनिरपेक्ष जनता दल एकत्र आले. जास्त जागा असतानाही काँग्रेसने कुमारस्वामींना मुख्यमंत्री केले आणि सरकार स्थापन झाले. मात्र, त्यांच्यातील कुरबुरी सुरूच राहिल्या. दुसरीकडे, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेल्या दुखावलेल्या भाजपने ‘ऑपरेशन कमळ’ हाती घेतले आणि काँग्रेस आणि ‘जेडीएस’चे १६ आमदार फोडून सरकार अल्पमतात आणले. यथावकाश सरकार कोसळले आणि भाजपने पुन्हा सत्तेची खुर्ची पटकावली. सोळा आमदारांच्या अनुपस्थितीत सरकारने आपले काठावरचे का असेना बहुमत सिद्ध केले. आता प्रश्‍न होता ज्यांच्यामुळे भाजप सरकार सत्तेत आले, त्या १६ आमदारांच्या पुनर्वसनाचा. त्यासाठीची न्यायालयीन लढाई लढण्यात आली आणि अपात्र ठरलेल्या आमदारांना निवडणूक लढण्याची संधी उपलब्ध झाली.

सद्यःस्थितीत विधानसभेत बहुमतासाठी ११३ ही मॅजिक फिगर गाठणे भाजपसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून आणणे, ही भाजपची जबाबदारी आहे. अन्यथा हे सरकार अल्पमतात जाऊन पुन्हा निवडणुकांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. सद्यःस्थितीत भाजपला ते नकोच आहे. या पंधरा जागांतील जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी ‘जेडीएस’ प्रयत्नशील आहे. समजा येथे जास्तीत जास्त जागा मिळाल्या, तर उद्या काँग्रेससोबत जाताना त्यांचे बळ वाढलेले असणार आहे आणि वेगळा विचार करीत त्यांनी भाजपसोबत जाण्याचे ठरविले; तरी संख्याबळ वाढल्याने त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढलेली असेल. दुसरीकडे, काँग्रेसनेही कंबर कसली आहे. एकतर भाजपने आमदार फोडल्यामुळे दुखावलेल्या काँग्रेसला त्याचा बदला घ्यावयाचा आहे. त्यामुळे जरी १५ जागांसाठी ही पोटनिवडणूक होत असली, तरी भाजप सरकारचे भवितव्य निकालावर ठरेल. त्यामुळेच संपूर्ण राज्याचे लक्ष या पंधरा मतदारसंघांवर लागलेले आहे, हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com