शेतकऱ्यांनो थांबा, घाई करु नका; पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी नकोच; कृषी विभागाचं आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sowing

शेतकऱ्यांनो थांबा, घाई करु नका; पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी नकोच

जलालखेडा (जि. नागपूर) : अनेक भागात मान्सूनपूर्व (Pre monsoon rain) पाऊस पडतो व त्याच पावसावर शेतकरी पिकांची पेरणी (Sowing of crops) करतात. पण अनेक वेळा पाऊस निघून जातो व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सध्या हवामान खात्याने मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे पाऊस आलाच तर पेरणीची घाई न करता ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून (Agriculture department) करण्यात आले आहे. (Agriculture department appeal to farmers about sowing of crops)

कृषी विभागाने प्रसिद्ध पत्रात म्हटले आहे की, हवामान खात्याने जरी पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी तो मॉन्सूनपूर्व आहे. यामुळे पेरणीची घाई धोकादायक ठरू शकते. शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई न करता सोयाबीन, तूर, भुईमूग व मका या पिकांच्या नियोजनाकरिता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत.

खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड, पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वखराच्या पाळ्या देऊन तयारी करावी. शेतकऱ्यांनी किमान ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.

अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व पावसाचा खंड जरी पडला तरी पीक धरू शकते व शेतकऱ्यांना होणारे नुकसान टाळता येते. त्यामुळे पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन नरखेडचे तालुका कृषी अधिकारी डॉ. योगीराज जुमडे, भारसिंगी येथील मंडळ कृषी अधिकारी कुणाल ठाकूर यांनी केले आहे.

(Agriculture department appeal to farmers about sowing of crops)

टॅग्स :Nagpur