लोकपाल आणि बहाणेबाजी! (मर्म)

लोकपाल आणि बहाणेबाजी! (मर्म)

लोकपाल नियुक्‍तीस सरकार करत असलेल्या अक्षम्य विलंबामुळे महात्मा गांधी पुण्यतिथीपासून पुन्हा उपोषण सुरू करण्याचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिलेला इशारा आणि त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने लोकपाल नियुक्‍तीसाठी दिलेली फेब्रुवारीअखेरची मुदत, या पार्श्‍वभूमीवर येत्या निवडणुकीत हा विषय पुन्हा अजेंड्यावर येण्याची चिन्हे आहेत. खरे तर गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत हजारे यांनी केलेल्या उपोषणाला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि त्यातून उभ्या राहिलेल्या ‘यूपीए’ सरकारच्या विरोधातील वातावरणाचा फायदा घेत भाजपने केंद्रातील सत्ता हस्तगत केली. त्यामुळे मोदी पंतप्रधान होताच, लोकपालांची नियुक्‍ती तातडीने होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, गुजरातचे मुख्यमंत्री असताना लोकायुक्‍तांच्या निवडीबाबत टाळाटाळ करणाऱ्या मोदींनी पंतप्रधान झाल्यावर त्याच मार्गाने जायचे ठरवल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळेच अखेर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करून, लोकपालपदासाठी नावे निश्‍चित करण्यासाठी मुदत घालून दिली आहे.

खरे तर हजारे यांच्या उपोषणानंतर मनमोहनसिंग सरकारला या संदर्भात संसदेत विधेयक आणणे भाग पडले आणि मोठ्या वादळानंतर अखेर संसदेने हा कायदा मंजूरही केला. त्यानंतर जानेवारी २०१४ मध्येच त्याच्या अंमलबजावणीची तयारी सुरू झाली होती. या कायद्यानुसार ‘लोकपाल’ संस्थेचे प्रमुख आणि अन्य आठ सदस्यांच्या नियुक्‍तीसाठी जानेवारी २०१४ मध्ये अर्जही मागवण्यात आले. त्यांची निवड करणारी समितीही स्थापन करण्यात आली. मात्र, त्या समितीवर सदस्यांची नियुक्‍ती काही झाली नाही.

पुढे सत्तांतर झाले आणि मोदी यांच्या हातात देशाची सूत्रे आली. मात्र, त्यानंतर काही हालचाल न झाल्यामुळे अखेर काही स्वयंसेवी संस्थांनी न्यायालयात धाव घेतली. अखेर सप्टेंबर २०१८ मध्ये निवड समितीवर नियुक्‍त्या झाल्या आणि आता सर्वोच्च न्यायालयाने या समितीला लोकपाल संस्थेत कोणाची निवड करावी, त्यांचे पॅनेल जाहीर करण्यासाठी फेब्रुवारीअखेरची मुदत दिली आहे. मात्र, अंतिम निवड समितीत लोकसभेतील विरोधी पक्षनेता असणे आवश्‍यक असून आजमितीला लोकसभेत अधिकृत विरोधी नेताच नाही! त्यामुळे ही निवड लांबणीवर पडत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. हजारे यांनी नेमक्‍या याच बाबीवर बोट ठेवले असून, ‘ही निव्वळ बहाणेबाजी आहे!’ अशा शब्दांत सरकारवर टीका केली आहे. त्यामुळेच आता सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर तरी येत्या निवडणुकीपूर्वी देशाला लोकपाल मिळेल, अशी आशा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com