प्रदूषित धुक्‍यातून स्थायी विकासाकडे

sunita-narayan
sunita-narayan

शहरांचे पर्यावरण राखणे व सुनियोजित व्यवस्थापन करणे यांची प्राथमिक जबाबदारी नगरपालिका, महापालिका यांच्यावर असते. ती गांभीर्याने पार पडली, तर अनेक शहरे ‘स्मार्ट सिटी‘च्या दिशेने प्रवास करू लागतील. परंतु ती झटकण्याची, एकमेकांना दोष देण्याची प्रवृती बळावते आहे. महापालिकांच्या निवडणुकांपूर्वी राजकीय पक्ष आश्‍वासनांचा पाऊस पाडतात. पण सत्ता हाती आली, की सत्ताधारी पक्ष व नगरसेवक त्याकडे दुर्लक्ष करतात. हे आता नित्याचे झाले आहे. नगर व्यवस्थापनात दिल्लीचा क्रमांक अलीकडेपर्यंत बराच वरचा होता. परंतु गेल्या काही दिवसांत पूर्व व उत्तर दिल्लीच्या महापालिकांची स्थिती इतकी दयनीय झाली आहे, की जणू काही नागरिकांना कोणी वाली उरलेला नाही. रस्त्यारस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच महाराष्ट्रात होत असलेल्या महापालिकांच्या निवडणुकांबाबत मतदारांनी अधिक जागरूक राहिले पाहिजे. विकास हवा; पण तो कोणत्या दिशेने याविषयीदेखील जागरूकता आवश्‍यक आहे. 

काही दिवसांपूर्वी केलेल्या उपाययोजना आजघडीला निरर्थक वाटू लागतात, हे आपण समजूनच घेत नाही. या ठिकाणी दिल्ली महानगराचे उदाहरण पाहू. आज दिल्लीतील हवा प्रदूषणाच्या समस्येची सरकारला जाणीव नाही, असे म्हणता येणार नाही. गेल्या वर्षी इंधन आणि धूर प्रमाणके (स्टॅंडर्डस) उचावण्यात आली. त्याचबरोबर, कोळशावर चालणारी औष्णिक विद्युत केंद्रे बंद पाडण्यात आली, शहरात येणारे ट्रक, कचरा जाळणे, रस्ते आणि बांधकामावरील धूळ यावर निर्बंध आणत अशा इतर माध्यमांतून होणारे हवाप्रदूषण आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र हवामानबदलामुळे निर्माण होणाऱ्या दाट धुक्‍यापुढे असे प्रयत्न परिणामशून्य ठरत आहेत, हेही तितकंच स्पष्ट आहे. 

अगदी आताही, मी लिहायला बसले आहे त्या खिडकीच्या बाहेर पांढरट धूसरपणा आहे, धुरासारखे काहीतरी दिसत आहे. सॅटेलाइट इमेजमध्ये संपूर्ण उत्तर भारतावर बर्फाच्या लादीसारखा वजनदार ढग दाखवला जातोय. हवामान खात्याच्या वतीने हे ‘अनियमित’ असल्याचे सांगितले जाते. पण त्याचा संबंध बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या जास्त दाबाच्या पट्ट्याशी जोडला जातो. ते सांगतात, ‘या वेळी, पूर्वेकडून येणारे वारे संथ असले तरी पूर्वेकडून येणारे दमट वारे पश्‍चिमेच्या वाऱ्यांना घालवत आहेत, त्यामुळे थंडी पडली आहे; पण हवामान कोरडे आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणून दाट धुके तयार होत आहे.’

दमट हवेत प्रदूषकांचे कण मिसळल्यास धुक्‍याचे रूपांतर ‘स्मॉग’मध्ये होते. वाऱ्याशिवाय हे ‘स्मॉग’ पांगणे शक्‍य नाही. त्यामुळे दिल्लीकरांना खोकला, दमा आणि हृदयविकार अशा आजारांना तोंड द्यावे लागत आहे. यावर मात करण्यासाठी हाती घेतलेले कृतिकार्यक्रम पुरेसे ठरणार नाहीत. प्रदूषणाच्या पातळीने आता उच्चांक (ग्रेड १ ते ग्रेड ४) जी आता ‘सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून ओळखली जाते, गाठला आहे. त्यामुळे त्याची उकल करणे अधिक गंभीर होऊन बसते. सर्वोच्च न्यायालयानेही या सर्व गोष्टींचे निरीक्षण केल्यानंतर हे उपाय पुरेसे ठरू शकणार नसल्याचं म्हटलंय. कदाचित आपल्याला शहर ‘बंद’ करावं लागेल. निसर्ग आपल्याला आळशीपणा करण्याची, नेहमीसारखं कामात राहण्याची मोकळीक देण्याच्या मनःस्थितीत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याकडे गोष्टी सुधारण्यासाठी खूप कमी वेळ असल्याचं निसर्ग सांगत आहे. आता आपल्याला काहीतरी प्रभावी उपाययोजना हाती घेतलीच पाहिजे.

आपल्याला सुरक्षित जीवन, आरोग्य हवं असेल तर पर्यावरणीय बदलांना डावलून चालणार नाही, विकासाची नवी वाट धुंडाळावी लागेल.ही केवळ दिल्लीला नव्हे तर सर्व महानगरांना लागू होणारी बाब आहे. किंबहुना हीच २०१६ ची शिकवण असेल. आपण वेगाने तापमानवाढ होत असलेल्या ग्रहावर राहत आहोत; म्हणूनच आपण जे काही करू ते अत्यंत वेगाने करण्याची आवश्‍यकता आहे. भविष्यकाळाबद्दल फार वेळ चर्वितचवण करण्यात वेळ घालवणे योग्य नाही. आता कृतीची गरज आहे.

(अनुवाद - सोनाली बोराटे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com