वर्दीतील मारेकरी (मर्म)

वर्दीतील मारेकरी (मर्म)

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या दीड वर्षात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याच्या नावाखाली खऱ्या- खोट्या चकमकीत अनेक गुन्हेगार मारले गेल्यामुळे पोलिसांना सातत्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या विश्‍वासार्हतेची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. हे कमी होते म्हणून की काय उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवारी पहाटे ऍपल कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात "पोलिस राज' आहे की "गुंडा राज' असा प्रश्‍न निर्माण झाला असून, पोलिस दलाची प्रतिमा आणखी काळीकुट्ट करण्याचे काम वर्दीतील मारेकऱ्यांनी केले आहे.

ऍपल कंपनीचे एरिया मॅनेजर विवेक तिवारी हे रात्री उशिरा गाडीने जात असताना दोन पोलिसांनी त्यांना हटकले. पण तिवारी यांनी गाडी न थांबविल्याने पोलिसांनी त्यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या आणि हे प्रकरण अंगावर शेकू नये म्हणून गाडीला अपघात झाल्यामुळे तिवारींचा मृत्यू झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर तिवारी यांनी आपल्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, इथपासून त्यांचे चारित्र्यहनन करण्यापर्यंत पोलिसांची मजल गेली. पण तिवारी यांच्या पत्नीने पोलिसांच्या माहितीविषयी शंका घेतल्यानंतर खरा प्रकार समोर आला आणि त्या पोलिसांना खुनाच्या आरोपाखाली अटक झाली. मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि राज्याच्या पोलिस प्रमुखांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत, ही चकमक नाही, तर हा सरळसरळ खून असल्याची कबुली दिली ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. पण गुन्हेगारांना चकमकीत संपविण्याचे समर्थन करणाऱ्या राज्य सरकारला, तसेच पोलिस दलाला एका निरपराध नागरिकाच्या हत्येची जबाबदारी टाळता येणार नाही. 

अट्टल गुन्हेगार आणि सर्वसामान्य नागरिक यांना एकाच मापाने मोजण्याच्या आणि हाती आहे म्हणून बंदूक चालविण्याच्या पोलिसांच्या मानसिकेतवरही या घटनेमुळे प्रकाश पडला आहे. मात्र अशा एखाद्या घटनेसाठी संपूर्ण पोलिस दलाला दोषी ठरविणे योग्य नसले, तरी अशा घटनेमुळे त्यांच्या अनेक चांगल्या कामगिरीवर पाणी पडते, हेही लक्षात घेतले पाहिजे. पोलिस हे जनतेचे मित्र, कायद्याचे रक्षक आहेत हे त्यांच्या वागण्यातून दिसले पाहिजे. कारण त्यावरच पोलिसांची विश्‍वासार्हता अवलंबून असते.

पोलिसांचा दरारा जरूर हवा, पण दहशत असू नये. त्यातही गुन्हेगारांना पोलिसांचा धाक असायलाच हवा. पण निरपराधांना पोलिसांचा जाच होऊ लागला आणि ज्यांनी कायद्याच्या राज्याचे रक्षण करायचे, ते पोलिसच भक्षक होऊ लागले, तर सर्वसामान्यांनी कोणाकडे पाहायचे? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com