ढिंग टांग : तीळगूळ खा आणि... काळजीही घ्या!

ढिंग टांग : तीळगूळ खा आणि... काळजीही घ्या!

सर्व सहकारी आणि (माझ्या) महाराष्ट्राच्या तमाम महाआघाडीवीरांना मकरसंक्रांतीच्या अनेकानेक गोडगोड शुभेच्छा! यंदा लांबूनच शुभेच्छा देत आहे. देणारच. का नको देऊ? किंबहुना शुभेच्छा दिल्याशिवाय राहणार नाही. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. पण कशा देणार शुभेच्छा? कोणे एके काळी, म्हंजे फार्फार पूर्वी आपण एकमेकांना भेटून तीळगूळ वाटत असू. मला वाटतं, ‘गोड बोला’ असंही हसत हसत सांगत असू. नेमकं आठवत नाही, पण पूर्वी संक्रांतीला ‘गोड बोला’ असं म्हणायची पद्धत होती. हल्ली सगळं विसरायला झालं आहे. संक्रांतीला आपट्याची पानं वाटायची असतात की काय, अशी शंका येत होती. पण मग थोडा अभ्यास केला. तीळगूळच वाटतात!! असो. पण आता तीळगूळ वाटण्याची तशी सोयच उरली नाही. काय करणार? संकट अजून पुरतं टळलेलं नाही. काळजी घ्यायला हवी. मास्क लावलेल्या अवस्थेत तीळगूळ खाणार तरी कसा? तेव्हा तीळगुळाऐवजी आपण एकमेकांच्या तळहातावर सॅनिटायझरचे दोन थेंब टाकणं केव्हाही श्रेयस्कर! तोच यंदाचा तीळगूळ समजायचा. यंदा संक्रांतीला शक्‍यतो भेटणं टाळू या! मुख्य म्हणजे सुसंवादही टाळू या! त्यानंच आपल्यातील परस्पर सौहार्द वाढेल, (आणि आघाडी टिकेल,) असा मला विश्वास वाटतो. असो.

हल्लीच्या राजकारणात कमीत कमी तोंड उघडलेलं बरं असतं. तोंड उघडलं की खेळ खलास होतो. मग ते बोलण्यासाठी उघडा किंवा तीळगूळ खाण्यासाठी. जाऊ दे. काय बोलू? बोलण्यासारखं खूप काही आहे, पण कुठून सुरवात करु? आजच्या दिवशी गोड बोलण्याची प्रथा आहे. काय गोड बोलायचं, कसं बोलायचं? हे गोड बोलण्याचे दिवस नाहीत. गोड बोलण्याची आमची परंपराही नाही, आणि स्वभावही. आपला स्वभाव म्हंजे एक घाव दोन तुकडे! (आघाडीचा प्रयोग लक्षात घेता एक घाव तीन तुकडे असंच म्हणावं लागेल. पण त्याबद्दल नंतर कधीतरी! संक्रांतीच्या दिवशी तरी नको!!) शिवाय गोड खाणं प्रकृतीला वाईट हे मघाशी सांगितलंच. पुन्हा काय तेच तेच सांगायचं? आत्ता गोड बोललं की नंतर गुढी पाडव्याला कडूलिंबाचा पाला खायची पाळी येते! कडूलिंब खायची वेळ येऊ नये, म्हणून गोड टाळावं. म्हणूनच मी शक्‍यतो गोड (बोलणं) टाळतो.

मला माझ्या आघाडीवीरांची काळजी आहे. एकमेकांशी सहकार्य करण्याची भाषा करताना गोड बोलणं भाग पडणार. पण गोड बोलण्यानं त्यांच्या रक्तातली साखर वाढेल, अशी भीती वाटते. साहजिकच आहे. शास्त्र असतं ते! गोडावर जोर दिला की साखर वाढणार! साखर वाढली की सहकार चळवळ मागोमाग येतेच...जाऊ दे. नको तिथे सहकार हवा कशाला? उगीच विषाची परीक्षा घेण्यापेक्षा या सगळ्यापासून दूर राहिलेलं बरं. सध्याचे दिवस बरे नाहीत. रोज काही ना काही संकटं उद्भवत आहेत. त्यात आपल्या आघाडीमध्ये सुसंवाद नाही, असंही लोक बोलू लागले आहेत. हवा कशाला तो सुसंवाद? सुसंवाद म्हणजे गोड बोलणं. आपल्या महाविकास आघाडीला दीर्घ आयुरारोग्य लाभो हीच सदिच्छा. आपली आघाडी अशीच गुळाला तीळ (किंवा तीळाला गूळ) चिकटून राहावा, आणि टणक लाडवासारखी टिकावी, असं मनोमन वाटतं. त्यामुळे आपण एकजुटीने राहू, आणि विरोधकांचे दात पाडू! तीळगूळ खा, आणि काळजीही घ्या! पुन्हा शुभेच्छा. जय महाराष्ट्र.

टिप : वरील मजकूर लिहिलेला चुरगळलेला कागद आम्हाला बांदऱ्याच्या सिग्नलपाशी सांपडला. ओळखा पाहू?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com