ढिंग टांग : कारशेड हवी कशाला?

ढिंग टांग : कारशेड हवी कशाला?

माझ्या तमाम बंधूंनो, भगिनीन्नो आणि मातान्नो, बरंच काही बोलायचं आहे. बोलणारच आहे. का नाही बोलायचं? किंबहुना आज बोलल्याशिवाय राहणारच नाही. पण काय बोलू? कुठून सुरवात करु? हे थोडंसं त्या मेट्रो रेल्वेसारखं होतंय...सुरु तर करायची आहे, पण कुठून सुरु करायची? कारशेडच नाही! कारशेड सुरु करण्याबाबत सध्या जो काही खेळ चालला आहे, तो मुंबईकरांच्या हिताचा नाही. हो, खेळच तो! ‘काही लोक’  त्याला पोरखेळ म्हणतात पण तसं नाही! हा पोरखेळ नाहीच मुळी! पोरं कुठे ‘मेट्रो मेट्रो’ खेळ खेळतात? 

याबाबत आडवाआडवीचं राजकारण चालू आहे. तुम्ही आम्हाला अडवा, आम्ही तुम्हाला अडवतो...असं! अशा अडवाअडवीला कोणी ‘आरे’ला ‘कारे’ केलं की लागलीच काही लोक उडवाउडवीची उत्तरं देऊ लागतात. आधी पाडवापाडवी झाली, मग आडवाआडवी सुरु आहे, आणि आता उडवाउडवी सुरु झाली आहे! उद्या पाडवापाडवी सुरु होईल!! हे कुठवर चालणार? ही चिडचाचिडवी आहे, बाकी काही नाही. 

आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा

माझं ‘काही लोकां’ना असं सांगणं आहे की बाबांनो, तुम्ही बऱ्या बोलानं आमच्याकडे या, नाक घासा, आणि समन्वयानं मार्ग काढा! यात अहंकार कुठे आला? होय, मुंबईकरांसाठी मी अहंकारी आहेच! आहेच मी अहंकारी! का नको असू? माझ्या मुंबईकरांसाठी मी अहंकारी होतो, आहे आणि राहीन! त्या अहंकारातूनच मी प्रश्न विचारतो : मेट्रोची कारशेड आरेमध्ये करायची की कांजूरला करायची की आणखी कुठे? एक काय ते सांगा! माझ्या तर डोक्‍यात वेगळीच शक्कल आली आहे. पण ती ‘काही लोकां’ना पटणार नाही. नाहीच पटणार! कशी पटेल? पटवून घेण्यासाठी पटवापटवी करावी लागते. पटवापटवी आधी अहंकार सोडावा लागेल!

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माझा, माझ्या मुंबईकरांवर आणि माझ्या महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे, आणि त्यांचंही माझ्यावर अलोट प्रेम आहे. उगीच नाही मला लोक ‘लाडके कारभारी’ म्हणत! (खुलासा : हे लोक वेगळे हं! ‘काही लोक’ वेगळे!! असो.) माझी शक्कल त्यांना पटेल. शक्कल अशी की, मेट्रो कारशेड बांधायचीच नाही! नकोच ती कटकट! 

हवी कशाला कारशेड? तिचा काय उपयोग आहे? कारशेडमध्ये मेट्रोगाड्यांची देखभाल आणि दुरुस्ती होणार आहे. म्हणजेच मेट्रोगाड्यांचं हे ग्यारेज आहे. ग्यारेजची गरज काय? मेट्रोगाड्या जागेवरच किंवा धावत्या अवस्थेत दुरुस्त करता येणार नाहीत का? येतील, नक्कीच येतील! माझा मुंबईकर तेवढा समर्थ नक्कीच आहे. चालता चालता वडापाव खाणारा मुंबईकर एक धावती गाडी दुरुस्त नाही करु शकणार? नक्कीच करु शकेल. किंवा ही कारशेड मुंबईत कुठेही न करता, माझ्या कोकणात केली तर? नाणारचा प्रकल्प होण्याची शक्‍यता नाहीच, मग त्या जागी मेट्रो कारशेड केली तर? बंद पडलेली मेट्रोगाडी बैलगाडीने माझ्या कोकणात न्यायची, दुरुस्त करुन बैलगाडीनेच परत ओढत आणायची. ही कल्पना काय वाईट आहे? तुम्हीच सांगा!

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मेट्रो कारशेडसाठी जमिनी शोधत बसण्याने हा प्रश्न सुटणार नाही. आरेमधली जमीन आम्हाला नको, कांजूरची जमीन तुम्हाला नको! एवढा थयथयाट एका ग्यारेज करता करायचा? हे मुंबईकरांच्या हिताचं नाही. नक्कीच नाही. किंबहुना मुंबईकरांच्या मुळावर येणारं आहे. तेव्हा या काही लोकांना माझं नम्र आवाहन आहे की, अहंकार सोडा, आणि आम्हाला शरण  या! जय महाराष्ट्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com