ऑन एअर - गरम पाणी आणि प्रतिकारक शक्ती...

On-Air
On-Air

स्वास्थ्य, आरोग्य आणि उपचार हा विषय कोरोनामुळे ऐरणीवर आलाय. इतकी वर्ष आपण या विषयवार मोघम चर्चा करायचो, कारण परिणाम लगेच दिसत नव्हते. आता मात्र मृत्यूचं तांडव रोज दिसायला लागल्यावर पारंपरिक चमत्कार सांगणारी बरीचशी मंडळी थंड पडली आहेत, तर काही ‘कोमट’ झाली आहेत! स्वच्छता, नियमित व्यायाम, चांगला आहार आणि पुरेशी विश्रांती यांमुळं आपलं आरोग्य चांगलं राहतं व प्रतिकारशक्ती वाढते हे आपण लहानपणापासून ऐकतोय. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या घेतल्या की कोरोना होत नाही, असंही आपल्याला वाटत असतं. आपल्याला सगळ्यात जास्त विश्वास आहे गरम पाण्यावर.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मला गरम पाणी आवडत नाही किंवा मी त्याच्या विरोधात आहे, असं नाही. प्रतिकारशक्ती चार दिवस गोळ्या घेतल्यामुळं वाढत नाही. आठवडाभर व्यायाम करून किंवा चांगला आहार घेऊन, पुरेशी झोप घेऊनही वाढत नाही. या सगळ्या गोष्टी नियमित, सातत्यानं केल्यानं, जीवनशैलीचा भाग बनवल्याशिवाय त्याचा उपयोग होत नाही. 

काहीतरी चमत्कार व्हावा असं मनुष्य सोडून कुठल्याच प्राण्याला वाटत नाही. आधुनिक माणसाच्या व्यक्तिमत्त्वात प्रामुख्यानं दोन प्रकारची ‘व्यक्तिमत्त्वं’ असतात. एक जो आधुनिक जगात वावरतो, गाडी चालवतो, कॉम्प्यूटरवर काम करतो, मोबाईल फोन वापरतो, आधुनिक आरोग्यशास्त्राचा फायदा घेतो. त्यातच एक पारंपरिक माणूस असतो जो जादू, चमत्कार यांवर विश्वास ठेवतो. सहसा ही माणसं एकमेकांच्या कामात लुडबुड करत नाही.

कितीही पूजा-अर्चा, प्रार्थना, यज्ञ, हवन, उपास, दानधर्म केले, तरी त्याचा त्यांच्या कॉम्प्यूटर चालण्यावर, ऑफिसचं कुरिअर वेळेत पोचण्यावर, घरचा फ्रिज चालण्यावर, गाडीचं मायलेज वाढण्यावर, पॅरासिटोमोलनं ताप कमी होण्यावर काहीही फरक पडत नाही. मनुष्य प्राण्यासारख्या, ब्रह्मांडातील सगळ्यात कॉम्प्लेक्स सिस्टिमचा, आरोग्याचा प्रश्‍न येतो, तेव्हा मात्र आपल्यातील पारंपरिक व्यक्ती खडबडून जागी होते. अहो, मनुष्याचा सोडा, कुठल्याही पाळीव प्राण्याला आपण गरम पाणी (किंवा काढा) देत नाही, किंबहुना ते पितच नाहीत. खरं तर हे वरचं सगळं माझ्या डॉक्टर मित्रांनी माझ्याकडून जबरदस्ती लिहून घेतलं, अगदी खुर्चीत बांधून माझ्या डोक्यावर इंजेक्शन ताणून. तसा मी गरम पाण्याचा मोठा भक्त आहे. गरम पाण्यानं आपल्या शरीरातील सगळ्या व्याधी, सगळे व्हॉयरस, सगळे प्रॉब्लेम एकदाचे दूर होऊ शकतात. त्यासाठी पुढीलप्रमाणं ते घ्यावं लागंल. ग्लासभर स्वच्छ साधं (गरम नाही) पाणी घ्या, ते प्या, गॅस पेटवा आणि त्यावर बसा, पाणी चांगलं उकळेपर्यंत. तुमचे सगळे प्रॉब्लेम एकदाचे दूर नाही झाले तर पैसे परत!!! 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com