‘टर्म इन्शुरन्स’ः का, कशासाठी? (अरविंद परांजपे)

arvind paranjpe write article in saptarang
arvind paranjpe write article in saptarang

जोखीम संरक्षणासाठी अतिशय नेमका ठरणारा विम्याचा प्रकार म्हणजे ‘टर्म इन्शुरन्स.’ इतर आनुषंगिक लाभ न देणाऱ्या या प्रकारात ‘कव्हर’ होणारी रक्कम जास्त असते आणि हप्ता तुलनेनं खूपच कमी असतो. या ‘टर्म इन्शुरन्स’बाबतची माहिती.

देशाच्या शहरी आणि निमशहरी भागात आता आयुर्विम्याची बऱ्यापैकी ओळख झालेली दिसते. विशेषतः खासगी विमा कंपन्यांच्या प्रवेशानंतर हा प्रसार अधिक वाढलेला आहे. एकही विमा पॉलिसी घेतलेली नाही, अशा व्यक्ती कमी दिसतात; परंतु पॉलिसी घेण्यापूर्वी पुरेसा गृहपाठ झालेला नसतो, असं अनुभवायला येतं. ‘भारतात विमा विकायला लागतो, तो घेतला जात नाही,’ हे निरीक्षण फार बोलकं आहे. विशेषतः ज्या कारणासाठी ‘आयुर्विमा’ घ्यायचा, त्या मूळ कारणाचा विसर पडलेला दिसतो. आपण घेतलेल्या पॉलिसीचा प्रकार काय आहे, त्यात जोखीम संरक्षण किती आहे, याचा अनेकांना पत्ता नसतो व फक्त आपण ‘अमुक एवढा’ हप्ता भरतो, इतकंच ते सांगू शकतात.

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?
टर्म इन्शुरन्स म्हणजे विशिष्ट मुदतीत जोखीमसंरक्षण देणारा मुदत विमा. या प्रकारात विमेदार, पॉलिसीच्या मुदतीमध्ये विम्याचे हप्ते भरून संरक्षण मिळवतो. या कालावधीत विमेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जोखीम रक्कम मिळते; मात्र मुदतीनंतर विमेदार हयात असल्यास कुठलीही रक्कम परत मिळत नाही. म्हणजे ज्या कारणासाठी ‘विमा’ या संकल्पनेचा जन्म झाला, तो विमा शुद्ध स्वरूपात या प्रकारच्या पॉलिसीत विमेदाराला संरक्षण देऊ शकतो. सर्वसाधारण विम्यामध्ये (जनरल इन्शुरन्स) हीच संकल्पना असते; परंतु दुर्दैवानं असं आढळतं, की या प्रकारच्या विम्याची बहुतेक पॉलिसीधारकांना माहितीच नसते; कारण त्यांच्यापर्यंत विमा कंपनी अथवा तिचे प्रतिनिधी ही माहिती पोचवायची तसदी घेत नाहीत. इतर प्रकारच्या विम्यांमध्ये जे आनुषंगिक लाभ मिळतात ते यात मिळत नाहीत; मात्र त्यात ‘कव्हर’ केलेली रक्कम जास्त असते. इतर विम्यांच्या तुलनेत टर्म इन्शुरन्सचा हप्ता कमी असतो.

उदाहरणार्थ, तीस वर्षं वयाच्या व्यक्तीला २५ वर्षांसाठी दहा लाख रुपये एवढं जोखीम संरक्षण केवळ ३१०० रुपये इतका वार्षिक हप्ता भरून मिळू शकतं. (म्हणजे दिवसाला दहा रुपयांपेक्षा कमी!) एवढं संरक्षण दुसऱ्या प्रकारच्या म्हणजे लाभासहच्या पॉलिसीमध्ये हवं असल्यास साधारणपणे तीस हजार रुपये एवढा हप्ता भरावा लागतो. ‘आयुर्विमा ही गुंतवणूक आहे,’ असं मानणारा मोठा वर्ग आपल्याकडे आहे, त्यामुळं आणि ‘टर्म इन्शुरन्स’ची माहितीच नसल्यानं बहुतेकांचा ओढा विम्यातून लाभ मिळण्याकडं असतो.

गृहकर्ज वा अन्य कर्ज देणाऱ्या कंपन्या कर्जदारासाठी या ‘टर्म इन्शुरन्स’ची पॉलिसी नक्कीच देतात, ज्यायोगे कर्जाच्या रकमेच्या परतफेडीची तरतूद कर्जदाराच्या अकाली मृत्यू झाल्यासही होऊ शकते.

पॉलिसी घेण्यापूर्वी ः
आयुर्विम्याची कोणतीही पॉलिसी घेण्यापूर्वी पुढील प्रश्‍नांची उत्तरं आपण दिल्यास आपल्याला योग्य तो निर्णय घेता येईल.

  •   आपल्याला (किंवा आपण ज्या व्यक्तीसाठी घेतो त्या व्यक्तीला) आयुर्विम्याची गरज आहे का? ः साधारणपणे २५ वर्षांच्या खालच्या व्यक्ती आणि साठ वर्षांच्या पुढील व्यक्ती- ज्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या कोणी अवलंबून नसेल, तर त्यांनी आयुर्विमा खरेदी करण्याची फारशी गरज नसते.
  •   किती रकमेचा विमा (जोखीम संरक्षण) घ्यावं? ः ज्या व्यक्तीचा आयुर्विमा उतरवायाचा आहे, त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींची भविष्यकाळाची आर्थिक गरज किती रकमेची असणार आहे, याचा अंदाज करून त्या रकमेएवढं विमा संरक्षण घेणं आवश्‍यक असतं. तसं करताना किती वर्षांसाठी हे संरक्षण हवं आहे हे ठरवावं. कारण त्यानुसार त्या कालावधीतल्या गरजा कमी-जास्त होऊ शकतात. ही रक्कम जेवढी असेल, त्या रकमेचं आजचं निव्वळ मूल्य किती असेल, तेवढंच विमा संरक्षण घ्यावं. उदाहरणार्थ, एक लाख रुपयांएवढी रक्कम पुढची २५ वर्षं दर वर्षी लागणार असेल, तर एकूण रकमेची गरज २५ लाख रुपये एवढी होईल; पण आज १२.८ लाख रुपयेइतकीच उपलब्ध रक्कम सहा टक्के व्याजदरानं गुंतवल्यास पुढची २५ वर्षं दर वर्षी एक लाख रुपयांएवढी रक्कम उपलब्ध होऊ शकेल. (मुदतीनंतर रक्कम शून्य होईल.) म्हणजे विमा संरक्षणाची रक्कम १२.८ लाख रुपये ही आहे, ज्यातून पुढच्या २५ वर्षांची तरतूद होऊ शकेल.
  •   कुठल्या प्रकारची पॉलिसी घ्यावी? ः ज्या पॉलिसीमध्ये अपेक्षित जोखीम संरक्षण कमीत कमी हप्ता भरून होईल, ती पॉलिसी घ्यावी आणि तशी पॉलिसी ज्या प्रकारची असते, ती म्हणजेच ‘शुद्ध विमा’ किंवा टर्म इन्शुरन्स.’ यात खर्च कमीत कमी आणि फायदा जास्त असतो.

प्राप्तिकर सवलतीसाठी विमा नको ः
‘विमा’ हे जोखीम संरक्षणासाठीचं प्रभावी हत्यार आहे. ‘प्राप्तिकर बचत’ अथवा गुंतवणुकीसाठी ते अगदी बोथट असतं. त्यामुळं त्यासाठी म्युच्युअल फंडांचा आधार घेणं अधिक लाभदायी ठरतं. ‘इक्विटी योजने’तला नियमित (मासिक) भरला गेलेला हप्ता (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हा विमा कंपनीतल्या गुंतवणुकीच्या परताव्यापेक्षा अधिक लाभ देऊ शकतो. त्यामुळं ‘जोखीम संरक्षण’इतकंच मुख्य उद्दिष्ट ठेवून आयुर्विमा कंपनीकडून कमीत कमी हप्ता भरून ‘टर्म इन्शुरन्स’द्वारे आपली अपेक्षित रक्कम सुरक्षित करून, उर्वरित रक्कम म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनेत गुंतवल्यास अधिक आर्थिक लाभ मिळू शकतील. दीर्घ काळ (दहा वर्षं आणि अधिक) इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक असल्यास रक्कम कमी व्हायची शक्‍यता नसते आणि लाभ पदरात पडू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com