ध्वजांच्या डिझाइनविषयी थोडंसं... (आश्विनी देशपांडे)

ashwini deshpande write article in saptarang
ashwini deshpande write article in saptarang

देशाच्या ध्वजाचं डिझाईन करण्यासाठी काही तत्त्वं लक्षात घ्यावी लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे डिझाइन अतिशय साधं आणि लहान मुलांनाही रेखाटता येईल इतकं सोपं असावं. ध्वज सहजपणे तयार करता यावा, यासाठी त्यावर दोन-तीनपेक्षा जास्त रंग नसावेत. शब्दांचा वापरही टाळला जावा. कारण, ध्वजारोहण झालेलं असताना शब्द दुरून वाचता येण्याजोगे नसतात. शिवाय, भाषेचा/लिपीचा अडथळाही येऊ शकतो. शेवटी, जी चिन्हं किंवा रंग वापरले जातील, ते त्या देशाच्या इतिहासासाठी आणि संस्कृतीसाठी अर्थपूर्ण असावेत.

ज्या तिरंग्याला आपण राष्ट्रध्वज म्हणून प्रणाम करतो त्या ध्वजाच्या डिझाईनमागचा विचार आणि प्रवास खास जाणून घेण्यासारखा आहे.
स्वातंत्र्याचा लढा लढताना एकसंध भारत देशाचा म्हणून एक ध्वज असायला हवा, असा विचार सन 1921 मध्ये महात्मा गांधीजींच्या मनात आला. तो विचार त्यांनी "यंग इंडिया' साप्ताहिकातून सविस्तरपणे मांडला. हिंदू आणि मुस्लिम धर्माचं प्रतिनिधित्व म्हणून लाल आणि हिरव्या रंगांचे पट्टे आणि त्यावर स्वदेशीचं, स्वावलंबनाचं चिन्ह असलेला चरखा अशी गांधीजींची कल्पना होती. गांधीजींनी स्वातंत्र्यसैनिक पिंगळा वेंकय्या यांच्याकडून त्या कल्पनेचं रूपांतर प्रत्यक्ष ध्वजात करून घेतलं.

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या (इंडियन नॅशनल कॉंग्रेस) सन 1921 मधल्या सत्रात हा ध्वज सादर करावा अशी गांधीजींची इच्छा होती. काही कारणामुळे हा ध्वज वेळेवर पोचू शकला नाही. कालांतरानं गांधीजींच्या विचारांत काही बदल झाले. धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टिकोनातून केवळ दोनच धर्मांचं प्रतिनिधित्व योग्य ठरणार नाही. शिवाय, चरखा हा त्या वेळी एका राजकीय पक्षाचं चिन्ह म्हणून वापरला जात होता. ही कारणं लक्षात घेतली गेली आणि संपूर्ण भारतात धर्मनिरपेक्ष ठरेल, प्रत्येक राजकीय विचारसरणीतर्फे स्वीकारला जाईल असा ध्वज तयार करण्यावर नंतर भर देण्यात आला. जून 1947 मध्ये स्वतंत्र भारताचा ध्वज निश्‍चित करण्यासाठी राजेंद्रप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली निर्णायक चर्चा झाल्या. धैर्य आणि त्यागाचं प्रतीक असलेला भगवा, त्याखाली शांततेचं आणि सत्याचं प्रतीक म्हणून श्वेत, त्यावर धर्माचं आणि मूल्यांचं द्योतक असलेलं निळ्या रंगाचं अशोकचक्र आणि शेवटी समृद्धीचं प्रतीक असलेला हिरवा पट्टा असा तिरंगा तयार करण्यात आला. त्या वेळी प्रशासकीय सेवेत उच्चाधिकारी असलेले बद्रुद्दीन तय्यबजी आणि त्यांच्या पत्नी सुरैया यांचाही या प्रक्रियेत सहभाग होता, असं काही ठिकाणी मानतात.

देशांची व्याख्या भौगोलिक सीमा, भाषा, संस्कृती यांनुसार केली जाते. ध्वज हा केवळ एक रंगीबेरंगी कापडाचा तुकडा नसतो, तर ते विभिन्न प्रकारच्या लोकांना एकसमान ध्येयाशी बांधून ठेवण्याचं एक अतिशय प्रभावी असं साधन असतं. त्यात कोट्यवधी लोकांचा देशावरचा किंवा विचारसरणीवरचा असीम विश्वास आणि अभिमान सामावलेला असतो.

देशाच्या ध्वजाचं डिझाईन करण्यासाठी काही तत्त्वं लक्षात घ्यावी लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे डिझाइन अतिशय साधं आणि लहान मुलांनाही रेखाटता येईल इतकं सोपं असावं. ध्वज सहजपणे तयार करता यावा, यासाठी त्यावर दोन-तीनपेक्षा जास्त रंग नसावेत. शब्दांचा वापरही टाळला जावा. कारण, ध्वजारोहण झालेलं असताना शब्द दुरून वाचता येण्याजोगे नसतात. शिवाय, भाषेचा/लिपीचा अडथळाही येऊ शकतो. शेवटी, जी चिन्हं किंवा रंग वापरले जातील, ते त्या देशाच्या इतिहासासाठी आणि संस्कृतीसाठी अर्थपूर्ण असावेत. जगातल्या 195 देशांनी स्वतःची वेगळी ओळख आणि अभिमान स्थापित करण्यासाठी बहुतांश ही सगळी तत्त्वं वापरून ध्वजाचं डिझाईन केलेलं आहे.

देशांचे ध्वज सर्वमान्य असतातच; शिवाय विशिष्ट प्रकारची विचारसरणी किंवा संकेत स्पष्ट करण्यासाठीही ध्वजाचा प्रभावीपणे उपयोग केला गेलेला आढळतो.
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी तह आणि समेट यांचा संकेत देण्यासाठी पांढऱ्या ध्वजाचा वापर झाल्याचे उल्लेख इतिहासात आहेत. पांढरा ध्वज हा शरणागती, शांतता, शस्त्रसंयम असे संदेश देण्यासाठी वापरला जातो. सन 1950 च्या दशकात ब्रिटनमधल्या अणुशक्तीविरोधाच्या चळवळीचं प्रतीक म्हणून जेराल्ड हॉल्टम नावाच्या डिझायनरनं एका चिन्हाचा प्रस्ताव मांडला. ते चिन्ह सांकेतिक भाषेतल्या N D (Nuclear Disarmament) या अक्षरांवर आधारित होतं. हताश होऊन, हात पसरून विचारणा करणाऱ्या मनुष्याकृतीसारखं दिसणारं हे चिन्ह जगभर स्वीकारलं गेलं आहे. हे चिन्ह कधीही पेटंट अथवा रजिस्टर करण्यात आलं नाही; पण आजही शांततेचा संकेत म्हणून त्याचा वापर सर्रास होतो.

सन 1970 च्या दशकात अनेक पाश्‍चात्य देशांत LGBT म्हणजेच समलिंगी आणि उभयलिंगी व्यक्तींना समाजात समान दर्जा, हक्क आणि आदर मिळावा यासाठी चळवळी सुरू झाल्या. अमेरिकेतल्या चळवळीचा भाग असलेल्या गिल्बर्ट बेकर यांनी सॅन फ्रान्सिस्कोत 1978 मध्ये होणाऱ्या "गे परेड'ला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून एक ध्वज डिझाईन केला. इंद्रधनुषी रंग असलेला हा ध्वज सर्वसमावेशक तत्त्वावर आधारित होता. भिन्न रंग, भाषा आणि आवडी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला समानस्वीकृती मिळावी, कारण शेवटी आपण सगळे एकाच म्हणजे मानवजातीचे आहोत, असा या ध्वजामागचा विचार होता. मूळ डिझाईनमध्ये थोडेफार बदल होऊन हा इंद्रधनुषी ध्वज आजही या चळवळीचं प्रतीक म्हणून जगभर मान्यता पावलेला आहे. डिझाईनचं पेटंट नसूनही जागतिक ओळख निर्माण केलेल्या ध्वजाचं हे अजून एक उदाहरण.

सन 2016 मध्ये झालेल्या ऑलिंपिक्‍समध्ये एका आगळ्यावेगळ्या संघानं पदार्पण केलेलं आठवत असेल. या संघातले सगळे खेळाडू मूळ देशांतलं असुरक्षित वातावरण सोडून दुसऱ्या देशाचा सहारा घेण्यासाठी बाहेर पडलेले असे होते. त्यांनी स्वतःच्या संघाला Refugee Nation म्हणजेच "निर्वासितांचा संघ' असं घोषित केलं होतं. असुरक्षित अशा राजकीय आणि सामाजिक वातावरणातून स्वतःची सुटका करून मैत्रीपूर्ण देशात पलायन करताना बहुतेक वेळा समुद्रमार्गांचा वापर केला जातो. त्यामुळे जीवरक्षक जॅकेटचं केशरी कापड आणि काळे चाप यांपासून प्रेरणा घेऊन यारा सईद या स्वतः विस्थापित झालेल्या डिझायनरनं या संघासाठी एका ध्वजाचा प्रस्ताव ठेवला होता.

ऐक्‍य आणि आशा यांचा संदेश देणाऱ्या या ध्वजापासून स्फूर्ती घेऊन "ऍम्नेस्टी इंटरनॅशनल' या जागतिक पातळीवर सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेनं जगभर पसरलेल्या निर्वासितांसाठी विशेष कार्यक्रम राबवायला सुरवात केली आहे. कदाचित पुढच्या ऑलिंपिक्‍समध्ये हा ध्वज जास्त उंच फडकलेला दिसेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com