आत्मविश्‍वासाने व्यवसाय करा (व्हिडिओ)

Gayatri-Tambe
Gayatri-Tambe

बिझनेस वुमन - गायत्री तांबे, संस्थापक-संचालक, माविन अडेसिव्हज प्रा. लि.
उद्योग किंवा व्यवसायाचा विचार केल्यावर डोळ्यासमोर खूप मोठा डोलारा उभा राहतो. एखाद्या क्षेत्राशी किंवा त्या व्यवसायाशी काहीही संबंध नसताना त्यात यश मिळविणे आणि स्थान टिकवून ठेवणे अवघड असते. मात्र, गायत्री तांबे यांनी ते शक्य करून दाखविले आहे. गायत्री यांनी फायबर ग्लासपासून विविध उत्पादने तयार करण्याचा व्यवसाय अगदी यशस्वीपणे उभा केला. ‘माविन अडेसिव्हज’ची स्थापना करीत नवनवीन प्रयोगांच्या माध्यमातून महाराष्ट्राबाहेर आपल्या कार्याचा झेंडा रोवला आहे.

गायत्री म्हणतात, ‘‘फायबर ग्लासच्या व्यवसायाशी माझा काहीही संबंध नव्हता. शालेय शिक्षण पुण्यातील अहिल्यादेवी शाळेतून पूर्ण केल्यानंतर एस. पी. महाविद्यालयातून कला शाखेत बीएची पदवी घेतली. मात्र, त्याचवेळी आयुष्यात नोकरी करायची नाही, हे मनाशी निश्चित केले. आयुष्यात काहीतरी वेगळा मार्ग निवडायचा याच विचाराने मग एलएलबी केले. वडिलांनी खूप मोठी साथ दिली आणि सांगितले, आयुष्यात तुला पाहिजे ते कर आणि यशस्वी हो!’’

माविन अडेसिव्हज गेल्या ३० वर्षांपासून फायबर ग्लासची विविध उत्पादने तयार करत आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यात बहुतांश रिक्षांवरील फायबर ग्लासची बॉडी ही ‘माविन’ची असायची. ती त्या काळी सर्वाधिक लोकप्रिय ठरली. आता मात्र ‘ट्रेंड’ बदलला आणि  फायबर ग्लासच्या बॉडीची जागा इतर उत्पादनांनी घेतली आहे. रिक्षांवरील फायबर ग्लासच्या बॉडीचा वापर कमी होत गेल्यावर इतर नवीन कोणत्या गोष्टी बनविता येतील आणि त्या लोकप्रिय कशा होतील, याचा अभ्यास गायत्री यांनी सतत सुरू ठेवला. यातील प्राथमिक शिक्षण नसले, तरी अनुभवाच्या जोरावर या क्षेत्रात आज अनेक फायबर ग्लासच्या वस्तू  ‘माविन’च्याच असतात. वॉचमन केबिन, साइट ऑफिस ते जागोजागी दिसणाऱ्या व फायबर ग्लासपासून बनविण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहांना विशेष मागणी आहे.

गायत्री यांनी या क्षेत्रात आता फायबर ग्लासच्या घराची निर्मिती करण्यास सुरवात केली आहे. परदेशात अनेक ठिकाणी फिरती घरे असतात.

भारतातदेखील आता ट्रेंड येतो आहे. मोठ्या शहरांमध्ये किंवा शेतात लोक घरे बांधतात, मात्र बऱ्याच ठिकाणी बांधकामाची देखरेख करण्यासाठी वेळ नसतो किंवा दुर्गम भागात बांधकाम साहित्य नेऊन घर बांधणे शक्य नसते. त्या वेळी गायत्री त्यांच्या कंपनीतच ग्राहकाच्या गरजेनुसार घराची निर्मिती करतात आणि त्या जागेवर ते घर नेऊन पोचवतात. त्यामुळे मालकाला भविष्यात ते घर नको असेल किंवा जागेवरून पुन्हा दुसरीकडे न्यायचे असल्यास ते सहज शक्य होते.

गायत्री यांनी सांगितले, ‘‘व्यवसाय यशस्वी करण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या म्हणजे डोके शांत ठेवून काम केले पाहिजे. यासाठी कायम डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडीसाखर ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे कष्टाला पर्याय नाही आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःविषयी आत्मविश्वास बाळगा.’’
(शब्दांकन - गौरव मुठे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com