गोकुळाष्टमी :
गोविंदा आला रे आला, मटकी संभाल ब्रिजबाला...
श्रावण महिन्याचे आगमन आणि सणांची रेलचेल हे समीकरण जणू ठरलेलेच! पावसाचा जोर काहीसा ओसरलेला! वातावणातील मंदधुंद मस्तीमध्ये धरित्रीच्या हिरव्यागार दुलईवर अलगद अवतरणाऱ्या सणांपैकी गोकुळाष्टमी हा सण म्हणजे दे धम्माल!
गोकुळाष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. त्याच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला, म्हणजेच दहीहंडी फोडण्याचा उत्सव! श्रीकृष्णाला दही, दूध, लोणी, ताक अतिशय प्रिय! त्याचीच आठवण म्हणून दूध, दही, लोणी, ताक यांचे मिश्रण एका मातीच्या मडक्यात भरून ती दहीहंडी उंचावर बांधली जाते. सर्व बालगोपाळांची सेना एकावर एक मानवनिर्मित मनोरे रचून ती दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करते. याच बालगोपाळांना गोविंदा असे संबोधले जाते.
या गोपाळकाल्याची खऱ्या अर्थाने मजा लुटायची असेल, तर मुंबईसारखे दुसरे ठिकाण नाही! मुंबईत उंच इमारतींची कमतरता नाहीच. या दिवशी जवळ जवळ प्रत्येक इमातरीवर दहीहंडी बांधली जाते. ही दहीहंडी फोडण्यासाठी सर्व गोविंदा पथके सज्ज झालेली असतात. ढोल-ताशांच्या गजरात गोविंदा आला रे आऽऽला, जरा मटकी संभाल र्जिबाला..चे सूर घुमत असतात. प्रत्येक गल्ली गल्लीची किंवा गटागटाची बालगोपाळ सेना आपल्या साथींसमवेत दहीहंडी फोडायला निघालेली असते. एखादी दहीहंडी दृष्टिक्षेपात आल्यावर आपल्या चमूला ती फोडण्यात यश येईल का याचा अंदाज बांधला जातो. बालगोपाळांचे एकावर एक थर रचले जातात. जे शरीराने मजबूत, हट्टेकट्टे आहेत, त्यांचा सर्वप्रथम गोल रचला जातो. त्यांच्यावर एकावर एक असे थर रचले जातात. सर्वांत शेवटी एखाद्या चुणचुणीत मुलाला दही हंडी फोडण्यासाठी वर पाठविले जाते. हे सर्व घडत असतानाच आजूबाजूच्या वातावरणात गोविंदा रे, गोपाळाचा एकच जल्लोष असतो. गोविंदाच्या पथकातील प्रत्येक गोविंदाने गोविंदा आला रे आला....च्या गीतावर ताल धरलेला असतो. प्रत्येकाच्या मनात आनंद, उत्साह दुथडी भरून वाहत असतो. ढोल, ताशांच्या आवाजाने वातावरणात एक प्रकारचा ताल, गती निर्माण झालेली असते. घराघरातून गोविंदाच्या अंगावर पाण्याचा वर्षाव केला जातो. छोटी मुले पाण्याने भरलेले फुगे एकमेकांवर मारून आनंदाचे क्षण लुटतात. आबालवृध्द, स्त्रिया सर्वजण यात उत्साहाने सामील झालेले दिसतात. प्रत्येकाच्या नसानसातून उत्साह, आनंद सळसळत असतो.
जेव्हा दहीहंडी फोडली जाते, तेव्हा तर आनंदाची सीमा पार होते. ढोल, ताशांच मोठा गजर होतो. तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा, एक दोन तीन चार, राजूदादाची पोरे हुशार ....च्या तालावर जल्लोषात सगळे सामील होतात. घराघरांतून एकमेकांवर पाण्याचा वर्षाव केला जातो. क्षणभर असे वाटते की हे सर्वजण एकमेकांवर पाण्याचा नव्हे, तर आनंदाचा, उत्साहाचा वर्षाव करीत आहेत आणि प्रत्येकजण यात अगदी नखशिखान्त भिजून गेलाय. यावेळी दु:ख, निराशा, द्वेष, मत्सर या विनाशकारी अवगुणांना अजिबात थारा नसतो! ही सर्व मजा लुटण्यासाठी आपणही यावेळी दहीहंडी बांधायची ना?
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.