'श्रद्धास्थानांची बदनामी करुन काय मिळणार'

'श्रद्धास्थानांची बदनामी करुन काय मिळणार'

काही दिवसापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसचे नेते जेव्हा इंग्रजांच्या विरोधात लढत होते तेव्हा वीर सावरकर इंग्रजासमोर हात जोडून माफी मागत होते, असे वक्तव्य छत्तीसगड येथील एका प्रचारसभेदरम्यान केले होते. ही घटना ताजी आहे तोवरच औरंगाबादमधील सिडको चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर या उड्डाणपुलावर माफीवीर सावरकर असा हॅशटॅग लिहण्यात आल्याची घटना समोर आली. हे सर्व काही सहज झालेले नाही. भारतीय जनता पक्षाच्या पंतप्रधानांनी म्हणा किंवा अन्य नेत्यांनी सातत्याने काँग्रेस पक्ष श्रद्धास्थान मानत आलेल्या नेत्यांची बदनामीच करण्याचा जोरकस प्रयत्न केलेला दिसून येतो आणि त्याच द्वेशभावनेतून अशा बदनामी करण्याच्या घटना घडत जातात, हे वेगेळे सांगायलाल नको!

गेल्या 60-70 वर्षात काहीच कसं घडलं नाही हे सांगितलं जातंच. इथं एका कोणाचे तरी गुणगान करताना नेहरूंवर, पर्यायानं त्यांचा वारसा सांगणाऱ्या गांधी कुटुंबावर नेहमीच शरसंधान साधले जाते. एका कुटुंबासाठी नेताजी, पटेल, डॉ. आंबेडकरांचं स्थान डावललं गेल्याचा युक्तिवाद भाजपकडून आणि पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याकडून जोरकसपणे मांडला जातो. निवडणुका तोंडावर असताना जमेल त्या कार्यक्रमाचा राजकारणासाठी वापर स्वाभाविकच; मात्र यातून नेहरू आणि नेताजी किंवा गांधी सावरकर नाहीतर सरदार पटेल आणि पंडीत नेहरू एकमेकांचे शत्रू असल्यासारखी मांडणी करण्याचा प्रयत्न इतिहासातल्या वास्तवाशी विसंगत म्हणूच दखलपात्र ठरतो. ज्यांचा वारसा सांगावा त्यांचं स्वातंत्र्यलढ्यातलं योगदान काय या प्रश्‍नावर बोलता येत नाही. एकूणच काय तर प्रत्येक राजकिय पक्षाने म्हणा किंवा समाजाने आपल्या हितासाठी इतिहासातील काही लोकांना आपले श्रद्धास्थान बनवण्याचा केलेला प्रयत्न दिसून येतो. मग आपले श्रद्धास्थान कसे भारी होते हे दाखवण्याचा देखील प्रयत्न करण्यात येतो. यातून मग आपले श्रद्धास्थान मोठे होते हे दाखवण्यासाठी समोरच्याच्या श्रद्धास्थानांना खिजवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. समोरच्यांच्या श्रद्धास्थानांची बदनामी सुरु होते.

मुळात, व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे अनेक लोक पुढे येत आहे त्याचे स्वागत आहे. पण, ज्या गोष्टीला ठोस पुरावा नाही. त्या गोष्टी रंगवून सांगायच्या. मांडायच्या तरी कशासाठी? व्यक्तिस्वातंत्र्यांचा पुरस्कार निश्‍चितपणे केला जावा. मात्र दुसरीकडे हीन मनोवृत्तीचं दर्शन जर कोणी घडविणार असेल तर ते सहन करणे खरंच गरजेचे आहे का प्रश्न पडतो. असे म्हणतात की, इतिहासापासून आपण शिकायला हवे पण, आपण ते कधीच करताना दिसत नाही. अशा वादग्रस्त मुद्यांवरून किंवा विधानांवरून यापूर्वीही अनेकवेळा रामायण घडले होते याचे भान खरेतर काहीही बोलताना जबाबदार व्यक्तींना असायला हवे. एक जबाबदार व्यक्ती म्हणून ते नेहमीच बाळगायला हवे. पण ते कधीच आणि कोणाकडूनच होताना दिसत नाही. यापूर्वी वक्तव्यांबरोबरच वादग्रस्त लिखाणांवरूनही अनेक मुद्दे उपस्थित झालेले आपल्याला पहायला मिळाले आहेत. परंतु अशा प्रकरणातून आपण काहीच शिकत नाही.

थोर पुरुष किंवा ज्यांना समासुधारक म्हटले गेले आहे मग ते कोणत्याही पक्षाचे किंवा समाजाचे असोत. त्यांच्याविषयी बोलताना थोडं डोकं ठिकाणावर ठेवूनच बोलायला पाहिजे. आपल्याला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, म्हणून काहीही बोलून चालणार नाही आणि जे बोलले आहे ते योग्य आहे. त्यात चुकीचे काही नाही. ठोस पुरावा असेल तर घाबरण्याचेही कारण नाही, असे जरी म्हणायला सोपे दिसत असले तरी तसे होत नसते, कारण आपण ज्या व्यक्तीविषयी बोलतो त्या व्यक्तीविषयी थोड्याफार तरी लोकांना आस्था असतेच की, आणि तिचा मुळात विचार करायलाच हवा.

वादग्रस्त बोलण्यामुळे समाजात संघर्ष उभा राहतो. जातिधर्मांत तेढ निर्माण होते. लोकांच्या भावनांना ठेच लागते. याचा विचार बोलतांना जबाबदार व्यक्तींनी करतानाच समाज कसा गुण्यागोविंदाने नांदेल हे पाहिले पाहिजे. समाज जागृती आणि प्रबोधनावर त्यांनी भर द्यायला हवा. लोकांची जी काही श्रद्धास्थाने आहेत त्यांची जाणीवपूर्वक बदनामी केली जाते हा समज त्यांच्यासाठी होऊ नये यासाठी खबरदारी घेतलीच पाहिजे. शेवटी एकमेकांच्या श्रद्धास्थानांची बदनामी करून मिळणार तरी काय हा प्रश्न उरतोच. ती दोन्ही बाजूंकडून टाळायला हवी. अन् इतिहासाकडून वेगळे काय ते शिकायला पाहिजे. शेवटी आपण पेराल तेच उगवणार आहे हेही लक्षात घ्यायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com