
गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे स्मार्टफोन्स आले. सोशल मीडियाचा वापर वाढला. सारेच व्हाट्सॲप आणि फेसबुकवर आले.
समाज माध्यम आरोग्यदायी व्हावं
- डॉ. अविनाश सुपे
गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे स्मार्टफोन्स आले. सोशल मीडियाचा वापर वाढला. सारेच व्हाट्सॲप आणि फेसबुकवर आले. जगामध्ये २०२२ मध्ये जवळजवळ ५२६ कोटी लोक मोबाईल आणि ४५५ कोटी लोक हे कुठला तरी सोशल मीडिया वापरत होते. ही संख्या पुढच्या २०२७ पर्यंत अजून वाढण्याची शक्यता आहे. वयस्कर आज फेसबुक तर तरुणाई इन्स्टाग्राम, यूट्युब, ट्विटर यासारखी विविध समाजमाध्यमं वापरते. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे गांभीर्याने समजून घेणे गरजेचे आहे.
स्मार्ट फोन आपल्याकडे आले तेव्हा सोशल मीडियावर तासन् तास घालवणे सुरू केले. व्हाट्सॲपने तर आपल्या सर्वांचे आयुष्यच बदलले. आपण फेसबुकवर एखादी पोस्ट टाकली, की तिला किती लाईक्स आहेत हे बघण्यासाठी दर पंधरा मिनिटांनी ते बघायला लागलो. यामुळे आपल्या डोळ्यांची चुरचुर, जळजळ वाढली. बऱ्याच वेळा मोबाईलचा स्क्रीन अतिप्रखर (ब्राईट) असतो आणि सारखा मोबाईल बघून डोळे कोरडे होतात. त्यामुळे आपला स्क्रीन टाईम मर्यादित असणे आवश्यक आहे. मोबाईलचा ब्राईटनेस जास्त असेल, डोळे आणि मोबाईलमधील अंतरात ताळमेळ नसेल तर त्याचा वाईट परिणाम डोळ्यांवर होतो.
मोबाईलवर आपण पटापट टाईप करून-करूनही छोट्या-छोट्या सांध्यांची दुखणी सुरू होतात. एखादा मेसेज पाठवला की मेसेज गेल्याची पहिली टिक दिसते. दोन टिक मेसेज पोहोचला आणि ब्ल्यू टिक म्हणजे तो मेसेज वाचला गेला. या टप्प्यापर्यंत बऱ्याच वेळा आपला संयम नसतो. त्याचं काय उत्तर येतंय हे बघण्यासाठी आपण वारंवार तो मोबाईल उघडून पुनःपुन्हा त्याच्यात आपला पासवर्ड टाईप करून मेसेजेस बघत असतो. या सगळ्या प्रक्रियेत आपण इतके गुंतून गेलेलो आहोत, की इतर गोष्टींचा आनंद विसरतो की काय असं वाटायला लागतं. हे सगळं करण्यामध्ये आपण प्रचंड तणाव घेतो. बऱ्याचदा चित्रपटामध्ये किंवा जंगलात वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करताना किंवा संगीताच्या कार्यक्रमाला आपण गेलो तर ते भाषण रेकॉर्ड करणे, फोटो किंवा सेल्फी काढण्यातच गुंतून जातो. खरा मनमुराद आनंद घ्यायचा आहे तोच आपण विसरून जातो.
व्हाट्सॲपमुळे अजून एक त्रास व तणाव आपल्याला होतो. बऱ्याच वेळा आपण परिषदांना जातो, छोट्या पार्ट्या आयोजित करतो, एखादा कार्यक्रम करतो तेव्हा काही ग्रुप्स केले जातात. सुरुवातीला एक निमंत्रण येतं. त्यानंतर कॉन्फरन्समध्ये कसे येणार, कुठून येणार, कोण तुम्हाला उतरवून घेणार आणि परिषदस्थळी आणणार, राहण्याची व्यवस्था काय केली आहे आदी मेसेजेस येतात. तुम्ही कुठल्या ट्रेनने/ विमानाने येणार, हे सगळे जण त्याच्यामध्ये टाकत असतात. तुमच्या एक मेसेजऐवजी तुम्हाला पन्नास लोकांचे निरर्थक मेसेज बघावे लागतात. त्यानंतर कॉन्फरन्समध्ये छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये सांगितल्या जातात.
तिथे लेक्चर देतानाचा फोटो, सेल्फी, स्मृतिचिन्ह देतानाचा फोटो आणि कॉन्फरन्स संपल्यानंतरही ती कशी चांगली झाली, याबद्दलचे अभिनंदन. हे संदेश शंभर दीडशे असतात. लग्न व इतर समारंभांचेसुद्धा असेच असते. तुम्हाला चारशे-पाचशे निरर्थक संदेश बघायला लागतात. या सर्व ताणाचा आणि वेळेच्या अपव्ययाचा आपण विचार करायला पाहिजे. खरोखरच याची आपल्याला गरज आहे का? होळीच्या दिवशी किंवा इतर सणांना आपण इतके मेसेजेस बघतो, त्यातले आपुलकीने पाठवलेले किती आणि फॉरवर्ड केलेले किती याचा प्रश्न पडतो. त्यामुळे तणाव येतो. ॲसिडिटी व बाकीचे आजार होतात. रात्र रात्र जागून ओटीटीवर सिनेमे पाहिल्यामुळे झालेला त्रास वेगळा. विमानामध्ये मोबाईलवर चित्रपट बघताना आवाज मोठा ठेवतात व त्याचा शेजाऱ्यांना किती त्रास होतो, याबद्दल त्यांना काहीही काळजी नसते.
खरं तर व्हाट्सॲपचा चांगला फायदाही करून घेता येतो. परवाच माझ्याकडे एक रुग्ण व त्याची बायको आली होती. त्याला गेल्या तीन वर्षांपासून त्रास होता. मी त्याला विचारलं, तुला गेल्या दोन वर्षांपासूनच त्रास आहे, काही तुझे जुने रिपोर्टस आहेत का? त्यावर त्याने पाच मिनिटं फोनवर शोधण्याचा प्रयत्न केला. ते काही मिळाले नाहीत. मी त्याला सांगितलं, की तू तुझा आणि तुझ्या बायकोचा एक छोटासा व्हाट्सॲप ग्रुप कर आणि त्याला ‘कुटुंबाचे आरोग्य’ असं असं नाव ठेव. पुढचे तुझे सगळे जे रिपोर्टस आहेत, ते त्या ग्रुपमध्ये टाक. म्हणजे ते शोधायला तुला सोपं जाईल. अशा छोट्या छोट्या ग्रुप्समध्ये आपली महत्त्वाची कागदपत्रे, आरोग्याचे अहवाल, ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीचे पेपर्स, इन्शुरन्स असे ठेवले तर ते त्या क्षणी शोधायला खूप सोपं होतं. आपल्याला फोटो गॅलरीमधल्या हजारो फोटोंमध्ये शोधण्यापेक्षा व्हाट्सॲपचा चांगला उपयोग करता येतो.
फोन किंवा व्हिडीओ कॉल सर्व जण खूप करतातच; पण आपल्या चांगल्या आरोग्यासाठी व्हाट्सॲपवर आपण नियंत्रण ठेवून त्यामध्ये काही आपल्यासाठी नियम राखून घेतले पाहिजेत. १. दर पाच मिनिटांनी व्हाट्सॲप बघण्यापेक्षा काही विशिष्ट काळानंतरच थोड्या वेळासाठी बघायचं. २. निरर्थक मेसेजेसवर फार लक्ष देऊ नका. ३. तुमचे डोळे अगदी चुरचुरण्यापर्यंत मोबाईल बघू नका. ४. तुमच्या हाताची बोटं, मानेच्या नसा दुखेपर्यंत किंवा तुम्हाला अगदी तणाव येईपर्यंत व्हाट्सॲपमध्ये बुडून जाऊ नका. ५. मेसेजमध्ये दिलेली माहिती बरोबर आहे की नाही किंवा मेसेजचा स्रोत माहीत नसेल तर ते मेसेज फॉरवर्ड करू नका. ६. अनोळखी संपर्कांना ब्लॉक करा. ७. व्हाट्सॲप त्याच्या वापरकर्त्यांना दुहेरी पडताळणी वैशिष्ट्यासह अतिरिक्त सुरक्षा प्रदान करते. यासाठी व्हाट्सॲप अकाऊंट रीसेट आणि ऑथेंटिक करण्यासाठी ६ अंकी पिन आवश्यक आहे. सिमकार्ड चोरी झाल्यास ही सुविधा उपयुक्त ठरते.
आधुनिक शोधांचा उपयोग आपल्या उपयोगासाठी केला पाहिजे. त्याचबरोबर फोनच्या माहिती सुरक्षिततेची (डेटा सेक्युरिटी) खात्री केली पाहिजे. आनंददायी आणि आरोग्यपूर्ण आयुष्य हे व्हाट्सॲपपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे आणि व्हाट्सॲपच्या बाहेरचं आयुष्यसुद्धा सुंदर आहे, याची जाणीव होणे आवश्यक आहे.
(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले असून त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)