गुजरातमध्ये राहुल गांधीनी सभांचे युद्ध जिंकले; पण मोदींशी डावपेचांची लढाई हरले!

Narendra Modi and Rahul Gandhi
Narendra Modi and Rahul Gandhi

नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर सभांचे युद्ध जिंकले. लोकांची मनेही जिंकली पण डावपेचांच्या लढाईत राहुल गांधींचा पराभव झाला. भाजपने भक्कम संघटन आणि डावपेचांच्या जोरावर हातातून निसटलेला विजय खेचून आणला. 

गुजरात विधानसभेच्या 182 पैकी 60 जागांवर पाच टक्‍क्‍यांपेक्षा कमी मतफरकाने उमेदवार जिंकले आहेत. पाच हजार मतांपेक्षा कमी मतांच्या फरकाने 35 जागांचे निकाल लागले. यापैकी 16 जागांवर तर दोनशे ते दोन हजार मतांच्या फरकाने जय-पराजयाचे गणित ठरले. 

भाजपने गोध्रा (258), पोरबंदर (1855), राजकोट ग्रामीण (2179), प्रांतिज (2551), विजापूर (1164), हिंमतनगर (1712), फतेपुरा (2711), बोटाड (906), ढोलका (327), उमरेठ (1883), वीसनगर (2869), गारियाधर (1876), खंबाट (2318), मातर ( 2046), दाभोई (2839) आणि वागरा (2370) या सोळा जागा अटीतटीच्या लढतीत अत्यंत कमी मत फरकाने जिंकल्या. 

या सर्व सोळा निकालांचे वैशिट्य असे की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपाच्या उमेदवारांना मिळालेली मते मतफरकापेक्षा कितीतरी अधिक आहेत. काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपाला जागावाटपात सामावून घेतले असते तर केवळ या सोळा जागाच नाही तर गुजरात राज्याची सत्ता काँग्रेसकडे चालून आली असती. 

राहुल गांधी यांनी हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर हे तरुण तुर्क जोडून घेताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपाला विचारात घेतले नाही. डावपेचातील हा आडाखा चुकल्याने काँग्रेस पक्षाला गुजरातमध्ये मोठी किंमत मोजावी लागली. 

नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांनी जीएसटीमुळे गुजरातसारख्या व्यापारप्रधान राज्यात भाजपला फटका बसू शकतो हे अचूकपणे हेरले आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी जीएसटी कलमामध्ये अनेक सवलती जाहीर करून टाकल्या. त्याचा परिणाम सुरत, अहमदाबादसारख्या मोठ्या शहरांमध्ये दिसून आला. शहरी भागामध्ये भाजपला आघाडी घेता आली. 

राहुल गांधी यांच्या सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद जागोजागी मिळत होता. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील लढाईचा निकाल जाहीर सभांना होणाऱ्या गर्दीवरून ठरला असता तर काँग्रेसचे पारडे जड झाले असते. पण तसे झाले नाही, याचे कारण राहुल गांधीच्या सभांना होणारी गर्दी मतपेटीत परावर्तित करण्यात काँग्रेस संघटन कमी पडले. 

बाहेरराज्यातून काँग्रेसने नेते आणि कार्यकर्ते बोलावले. त्यांना जबाबदाऱ्या आणि कामे वाटून दिली. पण या बाहेरच्या नेत्यांना मतदारसंघ आणि माणसे कळण्यापूर्वीच मतदानाची वेळ आली होती. अंतर्गत कलह आणि गटबाजीच्या राजकारणाने गेली वीस-पंचवीस वर्षे गुजरातमध्ये काँग्रेस संघटन खिळखिळे झालेले होते. 

राहुल गांधी यांनी लोकसभेचे निकाल लागल्यानंतर आपल्या पक्षाची ताकद ओळखून समविचारी पक्षांना जोडून घेण्याची मोहीम हाती घेतली असती अन्‌ संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला असता तर बरे झाले असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com