बॅटन लहान, संदेश महान

Article in Saptranga about Commonwealth Games and design
Article in Saptranga about Commonwealth Games and design

कॉमनवेल्थ गेम्स होऊन गेल्यावरही पुणे शहरात काही शोभिवंत आणि अभिमान वाटावा अशा खुणा राहाव्यात, असं टीमचं स्वप्न होतं. सकारात्मक, भव्य, व्यापक प्रमाणावर राबवता येतील अशा कल्पना करणं ही केवळ सुरवात असते; पण त्या प्रत्यक्षात आणणं म्हणजे एक प्रकारचं दिव्यच असतं; पण चिकाटीनं, जिद्दीनं आमच्या टीमनं हे काम करून दाखविलं. शिवाय एका अडीच फुटी वस्तूद्वारे (कॉमनवेल्थ यूथ बॅटन) ७१ देशांना एकत्र आणून लाखो लोकांपर्यंत सकारात्मक संदेश पाठवण्याचं सामर्थ्य निर्माण करता येतं, हेही टीमनं सिद्ध केलं.

क्रीडासंघ आणि क्रीडास्पर्धांच्या ब्रॅंडिंगबद्दल चर्चा गेल्या वेळच्या लेखात झाली, त्याचबरोबर क्रीडास्पर्धा अविस्मरणीय व्हाव्यात, यासाठी स्मृतिचिन्ह, विजयचिन्ह, विजयचषक, पदकं आणि क्रीडाचैतन्य पसरवणाऱ्या मशाली, बॅटन यांचंही अतिशय खास प्रकारे डिझाइन केलं जातं. पदकं आणि चषक हे विजयाची आठवण म्हणून क्रीडापटूंसोबत कायमस्वरूपी राहत असतात, तसंच खेळाडूंसोबत फिरणारी मशाल हासुद्धा ऑलिम्पिकसारख्या जगप्रसिद्ध क्रीडास्पर्धांचा महत्त्वाचा वारसा समजला जातो.

कॉमनवेल्थ गेम्ससाठी राजेशाही संदेश घेऊन एक बॅटन देशोदेशी फिरवलं जाण्याची परंपरा होती. या स्पर्धांविषयी सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावी आणि एकंदरीत खिलाडू वृत्तीचा प्रसार व्हावा, हा यामागचा उद्देश. २००८ पर्यंत दोन वेळा कॉमनवेल्थ यूथ गेम्स आयोजित करण्यात आले होते. स्कॉटलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही ठिकाणी बॅटनची पद्धत सुरू झालेली नव्हती. मात्र, हे गेम्स पुण्यात होणार हे ठरल्यापासूनच काहीतरी नावीन्यपूर्ण कल्पना वापरून या गेम्सचा प्रचार व्हावा, असा प्रस्ताव आमच्या टीमनं मांडला. 

Green Games म्हणजे पर्यावरणाशी संबंधित आणि या स्पर्धांशी निगडित अशा संदेशाचा प्रसार देशभरातच नव्हे, तर जगभरात करण्यासाठी ही मोठी संधी होती.  २००६ च्या गणनेनुसार भारतातल्या वाघांची संख्या  त्या वेळी १५०० पेक्षाही कमी झाली होती आणि या गेम्सचा मॅस्कॉट ‘जिगर’ नावाचा वाघाचा बच्चाच होता. त्यामुळं Save the Tiger अर्थात ‘वाघ वाचवू या’ असा साजेसा संदेश निवडण्यात आला.

कॉमनवेल्थ यूथ बॅटन भारताच्या सगळ्या प्रकारच्या भूप्रदेशांमधून सुप्रसिद्ध व्यक्ती, क्रीडापटू, लहान मुलं, लष्करातले जवान या सगळ्यांच्या माध्यमातून फिरावं आणि खेळांबरोबर इतरही सकारात्मक संदेशांचा मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार व्हावा, असा विचार होता. 

ऊन्ह, पाऊस, वारा, वादळ या सगळ्या प्रकारच्या हवामानात सुमारे १०० दिवस हे बॅटन दिल्ली ते पुणे प्रवास करेल, असं निश्‍चित करण्यात आलं. आता प्रत्यक्ष डिझाइनचा विचार सुरू झाला. नेहमीप्रमाणेच आमच्या टीमनं स्थानिक कला आणि संस्कृती यांमधून काही स्फूर्ती घेण्याच्या प्रयत्न केला. महाराष्ट्रात महत्त्वाच्या व्यक्तींचं खास पारंपरिक स्वागत तुतारी वाजवून केलं जातं, मग आपल्याकडं तर ७१ देशांमधून पाहुणे येणार होते. तेव्हा तुतारीची प्रेरणा अगदी चपखल ठरली. बॅटनचा आकार तुतारीच्या आकारातून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आला. पर्यावरणापासून पानांचा आकार घेण्यात आला.

विशेष म्हणजे पुण्यातल्या प्रसिद्ध अशा तांबट आळीत तयार होणाऱ्या तांब्याच्या धातूच्या कलाकुसरीनं ही पानं तयार करण्यात आली. अगदी स्थानिक कारागिरांनीच ती बनवली. ही सुबक, चमकदार पानं बॅटनच्या वरच्या भागात जणू ज्योतच असल्यासारखी लखलखावीत अशी योजना होती.

पुणं म्हणजे नव्या-जुन्याच संगम; त्यामुळं तांब्याच्या धातूची पानं जरी पारंपरिक कलेनुसार तयार केली गेली होती, तरी मुख्य बॅटन २००८ मध्ये अतिशय अद्ययावत आणि क्रांतिकारक अशा Rapid Prototyping तंत्राद्वारे तयार केलं गेलं. बॅटनची पकड, उंची आणि वजन अतिशय काळजीपूर्वक योजण्यात आलं होतं. कारण, वेगवेगळ्या देहयष्टीच्या आणि वेगवेगळ्या वयाच्या व्यक्तींना ते बॅटन पकडून धावायचा अनुभव सुखकर होणं आवश्‍यक होतं.

सुमारे १० राज्यांतल्या २०० हून अधिक गावांत सहा हजारच्या आसपास व्यक्ती हे बॅटन हाताळणार होत्या. ऑलिम्पिकची मशाल जेव्हा उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात पोचते, तेव्हा एक मोठी ज्योत नामवंत क्रीडापटूंकडून उजळली जाते. कॉमनवेल्थ यूथ बॅटन केवळ गावागावातून नुसती फिरण्यापेक्षा त्यातून काही अर्थपूर्ण कामही करता यावं, अशी आमच्या टीमची इच्छा होती. अनेक कल्पनांवर चर्चा होऊन असं ठरलं, की बॅटनच्या आतल्या भागात पाण्याची एक छोटीशी कुपी ठेवून तीत प्रत्येक गावचं पाणी भरून पुण्याच्या स्टेडियमकडं परत आणावं. ‘पाण्यासारखी दुर्मिळ होत असलेली नैसर्गिक संपत्ती जपून वापरणं आवश्‍यक आहे,’ हा संदेशही यातून आपोआपच दिला जाणार होता.

२०० गावांचं पाणी एकत्र करून उद्‌घाटनाच्या दिवशी स्टेडियमवर युवा शक्तीचं प्रतीक असलेलं एक भव्य कारंजं सुरू करण्याची कल्पना विचारात घेण्यात आली. शिवाय, सहभागी होणाऱ्या प्रत्येक देशाला एक छोटं रोपटं घेऊन यायला सुचवण्यात आलं. युवा-कारंज्याच्या भोवती देशोदेशीच्या या ७१ रोपट्यांची बागही तयार होईल, अशीही विशेष कल्पना त्यातून उभी राहिली. त्यामुळं गेम्स होऊन गेल्यावरही पुणे शहरात काही शोभिवंत आणि अभिमान वाटावा अशा खुणा राहाव्यात, असं टीमचं स्वप्न होतं. सकारात्मक, भव्य, व्यापक प्रमाणावर राबवता येतील अशा कल्पना करणं ही केवळ सुरवात असते; पण त्या प्रत्यक्षात आणणं म्हणजे एक प्रकारचं दिव्यच असतं. मात्र, अतिशय चिकाटीनं, जिद्दीनं आणि कुठंही तडजोड न करता ही अभूतपूर्व योजना आमच्या टीमनं साकारली.

हे बॅटन सुमारे नऊ हजार किलोमीटरचा समुद्र-खाडी-वाळवंट-महामार्ग आणि चक्क हवाई असा वेगवेगळ्या प्रकारचा प्रवास करून तब्बल ७४ दिवसांनी दिल्लीहून पुण्याला सुखरूप पोचलं. भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषा, साईना नेहवाल, पुलेला गोपीचंद, धनराज पिल्ले, सुशीलकुमार, विजेंदर सिंग यांसारखे क्रीडापटू बॅटन घेऊन धावले. २००८ च्या बिजिंग ऑलिम्पिक्‍समध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या नेमबाज अभिनव बिंद्रानं या कार्यक्रमाची सांगता केली होती आणि Fountain of Youth हे कारंजंही त्याच्याच हस्ते सुरू करण्यात आलं. 

१२ ते १८ ऑक्‍टोबर २००८ दरम्यान झालेल्या या जागतिक पातळीवरच्या क्रीडास्पर्धांमुळं पुणे शहराला भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. यूथ बॅटन आणि त्याच्या अनुषंगानं योजले गेलेले कार्यक्रम यांमुळं या स्पर्धा एका वेगळ्या पातळीवर गेल्या हे नक्कीच. एका अडीच फुटी वस्तूद्वारे (बॅटन) ७१ देशांना एकत्र आणून लाखो लोकांपर्यंत संदेश पाठवण्याचं सामर्थ्य निर्माण करता येतं, हेच आमच्या डिझाइन टीमनं सिद्ध केलं.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com