भाजपच्या भगवीकरणाला 'बुआ-बबुआ'चे थेट आव्हान

Mayawati and Akhilesh Yadav joins hands to defeat BJP and Narendra Modi in Lok Sabha 2019
Mayawati and Akhilesh Yadav joins hands to defeat BJP and Narendra Modi in Lok Sabha 2019

नव्या वर्षाच्या पहिल्या पंधरवड्यातच लोकसभा निवडणुकीचे नगारे वाजण्यासाठी सगळे सज्ज होऊ लागले आहेत.. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेमध्ये आर्थिक निकषावर आरक्षणाची घोषणा करत नेहमीप्रमाणे विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी डावपेच टाकत आहेत; तर 'राफेल'वरून रोज नवनवे आरोप करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारविरोधातील मोहीम सुरू केली आहे.. या सगळ्या गडबडीत आज मायावती आणि अखिलेश यादव यांनी काँग्रेस आणि भाजपला धक्का देण्यासाठी आघाडीची घोषणा केली. 

मायावती-अखिलेश एकत्र येणे ही भाजपविरोधातील 'महागठबंधन'ला एक झटकाच आहे. कारण, या दोघांनी त्यांच्या आघाडीमध्ये काँग्रेसला गृहीतही धरलेले नाही. गेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपने दिलेल्या दणक्‍यातून आताशी विरोधी पक्ष सावरत आहेत. लोकसभेच्या 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात गेल्या निवडणुकीत भाजपने मित्रपक्षासह 73 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसकडून सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे दोनच उमेदवार उत्तर प्रदेशमध्ये जिंकू शकले होते आणि आताही मायावती-अखिलेश यांनी निवडणूकपूर्व आघाडी करताना काँग्रेससाठी याच दोन जागा सोडल्या आहेत. 

कुमारस्वामी यांच्या शपथविधीसाठी झाडून सगळे भाजपविरोधी नेते त्या मंचावर एकत्र आले होते. त्याच छायाचित्रातील दोन नेते-मायावती आणि अखिलेश यांनी काँग्रेसला नाकारून स्वत:ची वाटचाल सुरू केली आहे. 

आजच्या पत्रकार परिषदेतून दोन गोष्टी समोर आल्या. एक म्हणजे अखिलेश यादव यांचा राजकीय धोरणीपणा आणि दुसरी म्हणजे काँग्रेससमोरील खडतर आव्हान! 'उत्तर प्रदेशातून यापूर्वीही पंतप्रधान झाले आहेत आणि पुढचा पंतप्रधानही येथूनच जावा', असे वक्तव्य करत अखिलेश यांनी पंतप्रधानपदासाठी मायावती यांना पाठिंबा दिला. यापूर्वीची कट्टर भांडणं विसरून एकत्र येताना अखिलेश यांनी मायावतींना मोठेपणा देत त्यांना राष्ट्रीय पातळीवर पाठिंबा देऊ केला आहे आणि राज्यात मात्र स्वत: 'मोठा भाऊ' असल्याचंही भासवलं. 

मायावती-अखिलेश एकत्र येणे ही भाजपविरोधातील 'महागठबंधन'ला एक झटकाच आहे. कारण, या दोघांनी त्यांच्या आघाडीमध्ये काँग्रेसला गृहीतही धरलेले नाही.

हे दोन पक्ष एकत्र आल्यामुळे राज्यातील योगी आदित्यनाथ यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत, हे निश्‍चित! एकतर योगी आदित्यनाथ यांचे सरकार प्रत्यक्ष कामापेक्षा वाचाळ नेत्यांची बडबड आणि हिंसाचाराच्या काही घटनांमुळेच जास्त चर्चेत आले आहे. त्यामुळे 'पब्लिक पर्सेप्शन' बदलण्यासाठी योगी आदित्यनाथ यांना राजकीय कसरत करावी लागत आहेच; त्यात आता या जोडीचे आव्हानही त्यांना पेलावे लागणार आहे. 

भाजपविरोधात मायावती-अखिलेश एकत्र आले असले, तरीही त्यातून काँग्रेसला लगेच दिलासा मिळण्यासारखीही परिस्थिती नाही. 'काँग्रेसच्या धोरणांमुळेच आमच्यासारखे पक्ष अस्तित्त्वात आले आहेत. सत्तेत आल्यानंतर भाजप आणि काँग्रेस सारखेच असतात. दोघेही भ्रष्टाचाराला उत्तेजन देतात आणि म्हणूनच आमच्या युतीत त्यांचा समावेश नाही', असे मायावती यांनी आज स्पष्ट सांगितले आहे. शिवाय, पंतप्रधानपदाची त्यांनी कधीही लपवून ठेवलेली नाही. त्यामुळे राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या मार्गात अडचण निर्माण करणाऱ्या मायावती काँग्रेसलाही खटकणाऱ्याच आहेत. 

दोन्ही नेते एकत्र आले असले, तरीही वर्षानुवर्षे एकमेकांविरोधात लढणे आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याची सवय लवकर जाणं अवघड आहे.

काही महिन्यांपूर्वीचा प्रसंग आठवा! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची विजयी घोडदौड कर्नाटकमध्ये रोखण्यात काँग्रेसला यश आले. धर्मनिरपेक्ष जनता दलाला मुख्यमंत्रीपद देत काँग्रेसने भाजपविरोधातील महाआघाडीचा पाया रचल्याची कौतुकाची वर्णनंही अनेक ठिकाणी वाचली होती. कुमारस्वामी यांच्या शपथविधीसाठी झाडून सगळे भाजपविरोधी नेते त्या मंचावर एकत्र आले होते. त्याच छायाचित्रातील दोन नेते-मायावती आणि अखिलेश यांनी काँग्रेसला नाकारून स्वत:ची वाटचाल सुरू केली आहे. 

ही युती म्हणजे तिघांसमोरही आव्हान आहे. भाजपला आव्हान म्हणजे, पुन्हा सत्तेत यायचे असेल तर उत्तर प्रदेशात चांगली कामगिरी करावीच लागणार आहे. मायावती-अखिलेश युती या मार्गातील मोठा अडथळा असेल. काँग्रेसला आव्हान म्हणजे, जवळपास सगळीकडे सत्ता मिळविलेल्या भाजपला रोखण्याची डोकेदुखी असताना आता उत्तर प्रदेशात स्वबळावर लढणं आणि दोन विरोधकांचा सामना करणं ही समस्याच असेल. तिसरा आणि सर्वांत मोठा अडथळा म्हणजे खुद्द मायावती आणि अखिलेश यांचाच आहे. दोन्ही नेते एकत्र आले असले, तरीही वर्षानुवर्षे एकमेकांविरोधात लढणे आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याची सवय लवकर जाणं अवघड आहे. त्यामुळेच कदाचित 'मायावतींचा अपमान म्हणजे माझा अपमान', अशा शब्दांत अखिलेश यांनी भाजपसह स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे. 

उत्तर प्रदेशातील निवडणूक आता किमान तिरंगी झाली आहे, हे निश्‍चित! यावर आता काँग्रेस आणि भाजपकडून काय डावपेच आखले जात आहेत, हे येत्या काही दिवसांत कळेलच..!! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com