लांडगे आणि लंगडे... (रवि आमले)

terriost
terriost

गेल्या काही दिवसांतील दहशतवादी हल्ले हे जेवढे भयानक होते, तेवढ्याच त्यांवर भारतात आणि प्रामुख्यानं मुंबईत उमटलेल्या कट्टरतावाद्यांच्या प्रतिक्रिया चिंताजनक होत्या. त्यातून देशातल्या धार्मिक विद्वेषाच्या प्रदूषणात वाढच झाली. या अशा वातावरणातून ‘लोन वूल्फ’ दहशतवादी निर्माण होऊ लागले आहेत. तसं निदान आपल्याकडं तरी होऊ नये, यासाठी इथल्या लोकशाहीवादी शक्तींना आता ‘लंगडणं’ सोडून द्यावं लागेल...

फ्रान्समध्ये गेल्या महिन्यात दोन दहशतवादी हल्ले झाले. त्यातली एक घटना नाइसमधील नोत्र दाम चर्च नजीकची. त्यात मुस्लिम दहशतवाद्यानं चाकूचे वार करून तिघांना ठार केलं. तिघांपैकी एका महिलेचा त्यानं थेट शिरच्छेदच केला. हा तालिबानी ‘शिक्षे’चा प्रकार. या घटना ताज्या असतानाच गेल्या सोमवारी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नात दहशतवाद्यानं थैमान घातलं. त्यानं सहा ठिकाणी गोळीबार केला. त्यात चारजण मृत्युमुखी पडले, २२ जण जखमी झाले. आपल्याकडच्या काही वावदूक वृत्तवाहिन्यांनी या हल्ल्याची तुलना थेट मुंबई हल्ल्याशी करून सगळंच फिल्मी करून टाकलं, तो भाग वेगळा. अर्थात, ही बाब आता आपल्या वृत्तचॅनेलीय पत्रकारितेचं अविभाज्य अंग बनलेली आहे. युरोपात हे सुरू असताना इकडं अफगाणिस्तानमधल्या काबूलमध्ये दहशतवाद्यांनी किमान १९ जणांचा प्राण घेतला. हा हल्ला झाला ते ठिकाण लक्षणीय आहे. तो करण्यात आला विद्यापीठात, तिथं सुरू असलेल्या पुस्तक जत्रेत. त्या हल्ल्याला शिया विरुद्ध सुन्नी संघर्षाची पार्श्वभूमी होती; पण अतिरेकी प्रवृत्तींना एकंदरच पुस्तकं, विद्वत्ता, बुद्धिमंत, अभ्यासक यांविषयी जे ‘प्रेम’ असतं, तेही त्यातून दिसलं.

आता असे हल्ले आपल्याला काही नवीन नाहीत. काश्मीरमध्ये तर ते रोजच्या जीवनाचा भाग बनलेले आहेत. त्यामुळं दहशतवादी आपल्या गावात जोवर बॉम्ब फोडत नाहीत, तोवर आपल्याला त्याबाबत फारसं काही वाटेनासं झालेलं आहे. आपल्याला म्हणजे आपणा सर्वसामान्य, पापभीरू, कायदाप्रेमी जनतेला. अखेर रोज मरे त्यास कोण रडे? किंबहुना त्यामुळंच दहशतवादी गट हे प्रत्येक हल्ल्यात काही तरी वेगळेपणा, थरारकता, नाट्यमयता आणण्याचा प्रयत्न करीत असतात. तो त्यांच्या कार्यप्रणालीचा एक भाग असतो. आपलं, सर्वसामान्य जनतेचं लक्ष हे त्यांचं लक्ष्य असतं. ते वेधण्यात हे हल्ले - आपल्यापुरतं बोलायचं झाल्यास - अयशस्वी ठरले, ही वस्तुस्थिती आहे. मग त्या घटनांबाबत का बोलायचं? त्याबाबत बोलायचं याचं कारण, या हल्ल्यांनंतर आपल्याकडील कट्टरतावाद्यांमध्ये उमटलेल्या प्रतिक्रिया. त्यांचं स्वरूप आणि परिणाम पाहता त्या अत्यंत चिंताजनक आहेत आणि म्हणूनच त्यांची दखल घेणं आवश्यक ठरतं.

कट्टरतावादी हे कोणत्याही धर्माचे, जात वा पंथाचे असोत, त्यांना मानवी जीवनाबद्दल एकूणच अंगभूत द्वेष असतो, तो विखार त्यांच्या उक्ती आणि कृतीतून सतत ओघळत असतो. मुंबईतल्या भेंडीबाजारात हे स्पष्टपणानं दिसलं. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची छायाचित्रं तिथं रस्त्यावर चिकटवण्यात आली होती. म्हणजे त्यावरून सगळ्यांनी जावं, त्यांना तुडवावं. हा मॅक्रॉन यांच्या निषेधाचा एक मार्ग होता. निषेध का, तर फ्रान्समध्ये प्रेषित हजरत पैगंबर यांची व्यंग्यचित्रं काढली जातात. हा मुस्लिमांच्या लेखी ईश्वरनिंदेचा आणि म्हणून वध करण्यायोग्य गुन्हा. पण, तो करणाऱ्यांना फ्रेंच सरकार मात्र पाठीशी घालतं. त्यांना हे माहीत नसावं, की फ्रान्समध्ये ईश्वरनिंदा हा गुन्हा नाही. भावनांची दुखरी गळवं ही तिथल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मर्यादा ठरवीत नसतात. किंबहुना तिथं धर्माची चिकित्सा हा मानवी संस्कृतीच्या प्रगतीचा सोपान मानला गेलेला आहे. धर्म आणि ईश्वरनिंदेला कायद्याचीच संमती आहे. हा देशाचा कायदा झाला. अडचण ही आहे, की तिथल्या काही मुस्लिमांना तो मान्य नाही. धार्मिक मुस्लिमांपुढं जेव्हा राष्ट्राचा कायदा आणि धर्माचा कायदा असं द्वंद्व उभं राहतं, तेव्हा ते धर्माच्या बाजूनं उभं राहतात, हा त्यांच्यावरच्या आक्षेपाचा एक मोठा मुद्दा आहे. थोर विचारवंत नरहर कुरुंदकर, सत्यशोधक मुस्लिम हमीद दलवाई यांच्यापासून अनेकांचं असं म्हणणं आहे. फ्रान्समध्ये तेच दिसलं.

दुसरी बाब म्हणजे, त्या हल्ल्यांनंतर मॅक्रॉन सरकारनं मुस्लिम कट्टरतावाद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली. ती अन्याय्य असल्याचं मुस्लिम कट्टरतावाद्यांचं म्हणणं. आमच्या धर्मभावना तुम्ही दुखावता, आम्हाला भडकावता आणि मग आमच्यातल्या कोणी हिंसक प्रकार केले की आम्हालाच लक्ष्य करता हे काही बरं नाही, असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. मलेशियाचे अध्यक्ष महातीर मोहम्मद हे मुस्लिम जगतातलं एक प्रतिष्ठित नाव. त्यांनी एका ब्लॉगपोस्टद्वारे हीच भूमिका मांडली. ‘यापूर्वी झालेल्या कत्तलींचा बदला म्हणून रागावण्याचा, लाखो फ्रेंचांना ठार मारण्याचा मुस्लिमांना अधिकारच आहे. पण साधारणतः मुस्लिमांनी कधीही तो ‘आँख के बदले आँख, कायदा अमलात आणला नाही,’ हे त्यांचं विधान होतं. वरवर पाहता कोणास ही भूमिका रास्त वाटू शकेल. किंबहुना हाच युक्तिवाद अन्य धर्मांतील कट्टरतावादीही करीत असतात, की इतिहासात आमच्या धर्मबांधवांचं तुम्ही शिरकाण केलं, तेव्हा त्याचा बदला घेण्याचा आता आम्हाला अधिकार आहे; परंतु तो आपादमस्तक अयोग्य आहे, अनैतिक आहे. महात्मा गांधींनी यास छान उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते, "हे असं ‘आँख के बदले आँख’ करीत बसलं, तर अखेर सगळं जगच आंधळं होईल." कट्टरतावाद्यांना अर्थातच हा आंधळेपणाच हवा आहे. धार्मिक मुस्लिमांनी मात्र याचा जरूर विचार करायला हवा. धर्मचिकित्सा म्हणजे ‘कुफ्र’ वा पाखंड, ही भूमिका त्यांनी त्यागली पाहिजे. कारण तीच काळाशी सुसंगत अशी आहे, त्यातच प्रागतिकता आहे, हे हिंदूंनी, ख्रिश्चनांनी कृतीतून दाखवून दिलेलं आहे. या धर्मांतील सुधारकांचा इतिहास त्यास साक्षी आहे. ही प्रागतिकता मुस्लिमांच्या अलीकडच्या धर्मेतिहासात मौलाना अबुल कलाम आझादांनी दाखविली होती. त्यांना धार्मिक मुस्लिमांनी स्वीकारलं नाही यात मुस्लिमांचाच तोटा झाला, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भेंडीबाजारात पायदळी तुडवण्यात आलेली मॅक्रॉन यांची छायाचित्रं काय, किंवा जगभरात ठिकठिकाणी फ्रेंच दूतावासांसमोर सुरू असलेली निदर्शनं काय, यांतून जो लोकानुबोध समोर आला, तो दहशतवादास मुस्लिमांचा पाठिंबा आहे हाच. यातून मुस्लिमांविषयीचं वातावरण अधिक विखारी होतं आणि त्यातून बळ मिळतं ते हिंदू कट्टरतावाद्यांना. धार्मिक कट्टरतावाद्यांचं हे वैशिष्ट्यच आहे, की ते ज्या धर्माच्या विरोधात उभे असतात, त्यांनाच ते पूरकही असतात. ते जणू काही एकमेकांचे आदर्श असतात. ईश्वरनिंदेबाबतच्या मुस्लिमांच्या मतांचा, त्यातून घडणाऱ्या हिंसेचा हिंदू कट्टरतावादी निषेध करतात, हे खरं. पण त्याचवेळी त्यांचं हे म्हणणं असतं, की पाहा ते मुस्लिम, ते कसे कट्टर असतात, नाही तर आपण. आपल्यालाही आता तसंच वागायला हवं. दुसरीकडं मुस्लिम कट्टरतावादीही हिंदू कट्टरतावादावर अशाच प्रतिक्रिया देत असतात. अशा दोन्हीकडच्या प्रतिक्रियावादातून अखेर समाजात निर्माण होतं ते हिंसक विद्वेषाचं वातावरण. असं तयार झालेलं वातावरण, हे सत्ताकांक्षी कट्टरतावादी वगळता, कुणाच्याही फायद्याचं नसतं, अगदी राष्ट्राच्याही.

दोन्ही धर्मांतील अतिरेकी प्रवृत्तींचा हा निषेधाचा क्रिया-प्रतिक्रियेचा खेळ सुरू असताना, इथल्या उदारमतवादी, लोकशाहीवादी शक्तीही मैदानात उतरल्या, ही त्यातल्या त्यात जमेची बाब. त्यांच्यात मुस्लिमांतील डाव्यांचाही समावेश होता. त्यांनी मिळून दहशतवादी हल्ल्यांचा निषेध तर केलाच; परंतु भेंडीबाजारसारख्या घटनांनाही विरोध दर्शवला. इथल्या उदारमतवाद्यांवर सतत एक आरोप होत असतो - अल्पसंख्याकांच्या अनुनयाचा. वस्तुतः कोणाही अन्यायग्रस्ताच्या बाजूनं उभं राहण्याला अनुनय म्हणत नाहीत; पण आपल्या ‘राष्ट्रीयत्वात’ ही व्याख्या नच्छ मानतात. त्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे एकजात सर्व कट्टरतावाद्यांच्या विरोधात सातत्यानं उभं राहणं, त्यात कोणतेही किंतु-परंतु न आणणं; आणि निषेधाच्या आवाजाचे ‘डेसिबल’ समान ठेवणं.

हे यासाठी आवश्यक, की - क्रिया-प्रतिक्रियावादातून आणि त्यातून आपला धर्म ‘खतरे में’ अशी जी भ्रमभावना निर्माण होते, त्यातून दहशतवाद्यांची एक नवी जात जन्माला आलेली आहे. तिचा मुकाबला करणं ही सुरक्षा यंत्रणांच्याही हातातली गोष्ट राहिलेली नाही. फ्रान्स, ऑस्ट्रियातल्या हल्ल्यांनी ते दाखवून दिलं आहे. ही जात म्हणजे एकल लांडग्यांची - लोन वुल्फची. कोणत्याही संघटनेशी थेट संबंध नसलेले, विद्वेषाने भारलेले असे हे दहशतवादी. ते भारतात, इथल्या कोणत्याही धर्मात निर्माण होऊ नयेत, यासाठी तमाम अतिरेकाविरोधात सर्वांनाच उभं राहावं लागेल. तिथं कोणत्याही बाजूनं ‘सिलेक्टिव्ह’ राहणं, लंगडत राहणं हे परवडणारं नाही. इथल्या दोन्हीकडच्या कट्टरतावाद्यांच्या ताज्या प्रतिक्रियांनी त्याची मोठी तातडी निर्माण केली आहे. तेव्हा, लोकशाहीवाद्यांना आता ठामपणे ‘दोन्ही'' पायांवर उभं राहावं लागेल. लांडग्यांना रोखण्यासाठी वैचारिक लंगड्यांची फौज कामाला येणार नाही, हे लक्षात ठेवावं लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com