पृथ्वीतत्त्‍वाचं प्रतीक एकाम्रेश्वर मंदिर

भाविक हिंदूंच्या मते कांचीपुरमच्या या भागात, वेगवती नदीच्या किनारी शिवांचं हे मंदिर अनादीकाळापासून अस्तित्वात होतं.
Ekambareswarar Temple
Ekambareswarar TempleSakal

सुईच्या अग्रावर एका पायावर उभं राहून शिवासाठी घोर तपःश्चर्या करणाऱ्या कांचीपुरमची अधिष्ठात्री देवी कामाक्षीदेवीच्या मंदिराची ओळख गेल्या आठवड्यात आपण करून घेतली. ज्याच्यासाठी तिनं हा सगळा खटाटोप केला त्या कल्याणसुंदर शिव एकाम्रेश्वराच्या मंदिराचं दर्शन आज घेऊ या. कांचीपुरममधल्या ज्या प्रमुख तीन मंदिरांना मिळून ‘मूनमूर्तिवासम’ म्हणजे ‘त्रिमूर्तिवास’ अशी संज्ञा दिली जाते त्यातलं हे तिसरं मंदिर. शिवकांचीचं हृदय म्हणजे एकाम्रेश्वराचं हे अतिभव्य मंदिर. पल्लव, चोळ/चोल, पांड्य, नायक आणि विजयनगरचे राजे या दक्षिणेतल्या सर्वच प्रमुख साम्राज्यांनी या मंदिराला दाने दिली, वेळोवेळी मंदिराची वास्तू वाढवली, गरज पडली तेव्हा मंदिराच्या काही भागाचा जीर्णोद्धार केला. इथल्या शिलालेखांमध्ये हा १५०० वर्षांचा उज्ज्वल इतिहास नोंदवलेला आहे.

भाविक हिंदूंच्या मते कांचीपुरमच्या या भागात, वेगवती नदीच्या किनारी शिवांचं हे मंदिर अनादीकाळापासून अस्तित्वात होतं. इथल्या गाभाऱ्यातलं शिवलिंग नदीकाठच्या वाळूमिश्रित मातीपासून तयार केलं गेलेलं असून इतर शिवमंदिरांत होतो तसा इथं शिवलिंगावर नित्य अभिषेक होत नाही, तसंच ते वाळूपासून तयार केलं गेलेलं असल्यामुळे हे शिवलिंग पाषाणी शिवलिंगाप्रमाणे वरून गोलाकार नसून निमुळत्या शंकूच्या आकाराचं आहे. याबाबतची आख्यायिका मला इथल्या अर्चकांकडून ऐकायला मिळाली ती अशी : ‘एकदा देवी पार्वतीनं खेळकरपणे शिवांचे डोळे झाकले आणि पूर्ण विश्व अंधकारमय झालं. रागावून शिवांनी पार्वतीला पृथ्वीवर पाठवलं. ती कामाक्षी बनून कांचीपुरमला वेगवतीच्या किनारी आली आणि तिथल्याच वाळूचं शिवलिंग तयार करून त्याची पूजा करू लागली. तिची परीक्षा पाहण्यासाठी म्हणून भगवान शिवांनी नदीला पूर आणला. नदीच्या वाढत्या पाण्यात शिवलिंग वाहून जाऊ नये म्हणून देवी कामाक्षीनं ते आपल्या कवेत घेतलं आणि ती तशीच बसून राहिली. तिच्या भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या शिवांनी आपलं खरं स्वरूप प्रकट केलं आणि नदीकिनारी असलेल्या एका आम्रवृक्षाखाली देवी कामाक्षीशी विवाह केला. पुढं याच शिवलिंगाभोवती मंदिर बांधण्यात आलं आणि ज्या एका आम्रवृक्षाखाली शंकर-कामाक्षीचा विवाह झाला त्या वृक्षामुळे हे मंदिर ‘एकाम्रेश्वर’ या नावानं ओळखलं जाऊ लागलं.’

अगदी आजही हा आम्रवृक्ष मंदिराच्या प्रांगणात उभा आहे. हे झाड किमान साडेतीन हजार वर्षं जुनं आहे असा भाविकांचा विश्वास आहे! झाडाच्या चार फांद्या चार वेगवेगळ्या प्रकारचे आंबे देतात. या चार फांद्या म्हणजे चार वेदांचं प्रतीक आहे असं मानण्यात येतं. या मंदिराचा स्थळवृक्ष म्हणजे हा आंबा!

आता आपण बघू मंदिराची आज उभी असलेली वास्तू.

एकाम्रेश्वराचं हे मंदिर अतिशय भव्य असून, मंदिराची वास्तू जवळजवळ २५ एकर परिसरात आहे. मंदिराचा सर्वात पुरातन भाग हा चौथ्या पल्लवाच्या काळचा आहे. त्यानंतरच्या काळात नवव्या शतकात चोळ राजांनी मोठ्या प्रमाणात मंदिराचा विस्तार आणि जीर्णोद्धार केला; पण इथं पल्लवांच्या आधीदेखील शिवमंदिर अस्तित्वात होतं. पाचव्या शतकात लिहिल्या गेलेल्या ‘मणिमेगलाई’ या तमिळ संगमसाहित्यातल्या महाकाव्यात या मंदिराचा उल्लेख आहे.

पुढं विजयनगर साम्राज्याच्या काळात मंदिराला चारी दिशांनी भव्य रायगोपुरे बांधण्यात आली. एकाम्रेश्वर मंदिराचं प्रमुख रायगोपूर अकरामजली असून, जवळजवळ दोनशे फूट उंच आहे. सर्वच गोपुरांवर अप्रतिम संदला-शिल्पनकाम किंवा स्टको वर्क आहे. विजयनगरच्या सम्राटांनी बांधून घेतलेला अयिरम कालमंडपम् म्हणजे सहस्रस्तंभी मंडप ही या मंदिराची शान आहे. ग्रॅनाईट पाषाणातून कोरलेल्या या मंडपातल्या स्तंभांवर अप्रतिम कोरीव काम आहे.

एकाम्रेश्वर मंदिरात एकात एक असे चार प्राकार आहेत. सहस्रस्तंभ मंडप रायगोपुरानंतरच्या पहिल्याच प्राकारात आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्राकारात अनेक छोटी मंदिरं आहेत, ज्यांमध्ये नटराजांचं स्वतंत्र मंदिर आहे, तसंच विनायक, शरभेश आणि भद्रकालीची छोटी छोटी मंदिरं आहेत.

विशेष म्हणजे, या शिवमंदिराच्या प्राकारात श्रीविष्णूंचं एक ‘दिव्यदेसम्’ मंदिरही आहे, जिथं श्रीविष्णूंची वामनस्वरूपात पूजा केली जाते. या मंदिराचं तमिळ नाव आहे ‘नीलथिंगल थुंडम पेरूमल मंदिर’. मंदिराच्या चौथ्या प्राकारात मुख्य गर्भगृह आहे व त्याभोवती जी ओवरी आहे तीत अनेक शिवलिंगे स्थापित केलेली आहेत. एका बाजूला ६३ नायनमारांच्या म्हणजे तामिळ शैव संतकवींच्या मूर्ती आहेत. या नायनमार संतकवींपैकी अप्पर, थिरुज्ञानसंबंदर, सुंदरार आणि माणिकवासगर या चार प्रमुख शैव संतांनी या मंदिराच्या वैभवाचं गायन केलं आहे. म्हणून या मंदिराला ‘पाडल पेट्र स्थलम्’ असं नाव आहे.

एकाम्रेश्वर मंदिर हे तामिळनाडूमधल्या अतिभव्य शिवमंदिरांपैकी एक आहे. मंदिराच्या ध्वजस्तंभाच्या प्राकारातील जी ओवरी आहे तिचे खांब अतिशय सुंदर कोरीव कामानं नटलेले आहेत. भव्य रायगोपुरे, एकाहून एक सरस असे अप्रतिम मंडप, देखणं गर्भगृह आणि वर उत्तुंग शिखर इत्यादी द्रविड स्थापत्यशैलीची सर्व वैशिष्ट्यं असलेलं हे मंदिर म्हणजे खरोखरच मंदिरनगरी कांचीपुरमचं भूषण आहे.

या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, इथलं शिवलिंग हे पंचमहाभूतांमधील पृथ्वीतत्त्वाचं प्रतीक मानलं जातं. दक्षिण भारतात पंचमहाभूतांचं प्रतीक असलेली प्रमुख पाच शिवमंदिरं आहेत. ही मंदिरं पृथ्वी, आकाश, अग्नी, जल आणि वायू या पाच तत्त्वांचं प्रतिनिधित्व करतात. एकाम्रेश्वर मंदिरातील शिवलिंग नदीकाठच्या वाळूपासून तयार केलं गेलेलं आहे म्हणून ते पृथ्वीस्वरूप आहे. इतर पंचभूत मंदिरं पुढीलप्रमाणे आहेत. आपण आधी बघितलेलं चिदंबरमचं नटराजमंदिर आकाशाचं प्रतिनिधित्व करतं. तिरुवनकावलमधील जांबुकेश्वरमंदिर जलस्वरूप आहे. तिरुवन्नामलाई येथील अरुणाचलेश्वर मंदिरातील लिंग अग्निस्वरूप आहे, तर आंध्र प्रदेशामधील तिरुपतीजवळील श्रीकालाहस्ती मंदिरातलं शिवलिंग वायुस्वरूप आहे. किती सुंदर आणि उदात्त संकल्पना आहे ना ही, शिवांचं पंचमहाभूतस्वरूपात पूजन करण्याची?

कांचीपुरमची ही प्रमुख चार-पाच मंदिरं जरी बघायची म्हटली तरी आपल्याला कमीत कमी दोन पूर्ण दिवस तरी लागतील. चेन्नईहून कांचीपुरमला दोन तासांत स्वतःच्या वाहनानं जाता येतं. बसेस वगैरेही खूप आहेत. वेगवेगळ्या बजेटला परवडतील अशी हॉटेलंही आहेत. मंदिरनगरी कांची खरोखरच सुंदर आणि मुद्दाम जाऊन बघण्यासारखीच आहे.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com