कथा केळदीची

वीरभद्रमंदिराच्या छतावरची गंडभेरुंडाची प्रतिमा.
वीरभद्रमंदिराच्या छतावरची गंडभेरुंडाची प्रतिमा.

महाराष्ट्राच्या शेजारच्याच कर्नाटक राज्याला मंदिरनर्मितीची आणि मंदिरस्थापत्याची मोठी परंपरा आहे. वातापीच्या पराक्रमी चालुक्य राजांनी अनेक भव्य हिंदुमंदिरं बांधली. आजही ती मंदिरं बदामी, ऐहोळे आणि पट्टडक्कल या ठिकाणी आपण पाहू शकतो. चालुक्यांची मंदिर-उभारणीची परंपरा पुढं होयसळ राजवंशानं आणि त्यानंतर विजयनगरच्या रायांनी अजूनच भरभराटीला आणली. पुढं दक्षिणेतल्या सर्व मुसलमान सल्तनतींनी एकत्र लढून तालीकोटाच्या लढाईत विजयनगरच्या रामदेवरायाचा पराभव केला आणि विजयनगर साम्राज्य धुळीला मिळालं. तिथली मंदिरं लुटली गेली, मूर्ती खंडित केल्या गेल्या; पण नवीन मंदिरनिर्मिती थांबली नाही. 

विजयनगरच्या साम्राज्याच्या अस्तानंतर विजयनगरच्या काही पराक्रमी सेनापतींनी आपापली छोटी राज्ये कर्नाटकात ठिकठिकाणी निर्माण केली आणि आपल्याला शक्य असेल त्या प्रमाणात मंदिर-उभारणीची परंपरा कायम ठेवली. अशाच एका सदाशिव नायक नावाच्या सेनापतीनं शिमोगा जिल्ह्यात सागरजवळ स्वतःचं स्वतंत्र छोटं राज्य स्थापन केलं. सागर शहरापासून फक्त आठ किलोमीटवर असलेलं केळदी हे आजचं एक छोटं गाव या नायक राजवंशाच्या राजधानीचं ठिकाण होतं.

आज हे गाव ओळखलं जातं ते इथल्या रामेश्वर मंदिरसमूहामुळे. नायक राजवंशाचा राजा चौडप्पा ऊर्फ चंद्रप्पा नायक यानं सोळाव्या शतकात इथं एकाच प्राकारात तीन मंदिरं बांधली. कदंब, होयसळ आणि विजयनगर अशा तीन मिश्र द्रविड स्थापत्यशैलींचा वापर करून बांधण्यात आलेली ही तीन मंदिरं आजही डौलात उभी आहेत. मंदिरप्राकारातली तीन मंदिरं ही अनुक्रमे पार्वती, रामेश्वर आणि वीरभद्र अशा तीन देवतांची असली तरी मुख्य देवता श्रीशिवरामेश्वर असल्यानं या मंदिरसमूहाला रामेश्वरमंदिर म्हणूनच ओळखलं जातं. 

आजचं केळदी हे माडा-पोफळींच्या बागांनी नटलेलं एक छोटेसं गाव आहे. अगदी कोकणातल्या किंवा गोव्यातल्या एखाद्या सुंदर खेड्याची आठवण करून देणारं. रामेश्वरमंदिरही बाहेरून थेट एखाद्या मोठ्या कोकणी घरासारखं वाटतं. मोठमोठ्या लाकडी खांबांनी तोलून धरलेली कौलारू छपराची भलीमोठी लांबच लांब ओवरी आणि तीत असलेलं मंदिराचं छोटंसं प्रवेशद्वार बघून आपल्याला कल्पनाही येत नाही की आतमध्ये केवढं प्रचंड शिल्पवैभव दडलेलं आहे. मात्र, दरवाजातून आत प्रवेश केल्यावर मात्र फरसबंदीच्या एका प्रशस्त प्रांगणात बाजूबाजूला उभी असलेली तीन सुंदर दगडी मंदिरं लक्ष वेधून घेतात.

‘लेडीज फर्स्ट’या नियमानुसार त्यातलं पहिलं मंदिर देवी पार्वतीचं! या मंदिराची खासियत म्हणजे, रक्तचंदनाच्या लाकडातून अतिशय कुशलतेनं कोरून काढलेलं या मंदिराच्या सभामंडपाचं वितान म्हणजेच छत. अगदी कसबी सुवर्णकारानं घडवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर जितकी बारीक आणि नाजूक कलाकुसर असू शकेल तितकी सूक्ष्म कलाकुसर इथल्या छतावर आहे. देखणे अष्टदिक्पाल, देवीची विविध रूपं, गंधर्व, अप्सरा, पुराणातली दृश्यं, पाना-फुलांची नक्षी...सगळंच इतकं सुरेख आहे की, काय पाहू आणि काय नको असं होऊन जातं. अठरा हस्त असलेल्या शिव अघोरेश्वराची एक मूर्ती इथल्या छतावर कोरलेली आहे. ही मूर्ती इतकी देखणी आहे की बघताना अंगावर रोमांच उभे राहतात. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पार्वतीमंदिराला लगटूनच रामेश्वराचं मंदिर आहे. होयसळ आणि द्राविड अशा मिश्र शैलीत राखाडी रंगाच्या ग्रॅनाईटच्या दगडात बांधलेलं हे मंदिर आटोपशीर व्यासाचं; पण अत्यंत सुरेख आहे. प्रदक्षिणापथ असलेलं गर्भगृह, महामंडप आणि मुखमंडप अशी या मंदिराची रचना आहे. गर्भगृहात रामेश्वराचं लिंग आहे, तर समोरच त्याचं वाहन असलेला नंदी गुडघे टेकून बसलेला आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर देखणा व्याळ आहे. या मंदिराच्या सभामंडपाचे स्तंभ अत्यंत सुंदर आहेत. छतावर सुंदर ब्रह्मकमळ कोरलेलं आहे.

या मंदिरप्राकारातलं सर्वात शेवटचे मंदिर म्हणजे वीरभद्राचं. या मंदिराच्या भिंतीवर आणि वितानावर काही अप्रतिम शिल्पं आहेत. त्यांपैकी सगळ्यात महत्त्वाचं शिल्प म्हणजे गंडभेरुंडाचं. गंडभेरुंड म्हणजे दोन तोंडांचा गरुड. एक शरीर, दोन डोकी व दोन पंख असलेला हा काल्पनिक पक्षी म्हणजे श्रीविष्णूचं एक रौद्र स्वरूप. गंडभेरुंड हे प्रतीक कर्नाटकात अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. 

विजयनगरच्या सम्राटांच्या नाण्यावर गंडभेरुंडाचं अंकन असायचं. पुढं म्हैसूरच्या राजघराण्याचं राजचिन्ह आणि सध्या कर्नाटक राज्याचं राजचिन्ह म्हणून गंडभेरुंड सुविख्यात आहे. वीरभद्रमंदिराच्या छतावर कोरलेल्या गंडभेरुंडानं त्याच्या दोन्ही चोचींत दोन सिंह, तर दोन्ही पंजांमध्ये विशाल हत्ती पकडलेले आहेत! हा गंडभेरुंड म्हणजे शक्ती, शौर्य आणि सामर्थ्य यांचं प्रतीक आहे. इथलं दुसरं सुंदर वितानशिल्प म्हणजे नागबंध. एकमेकांत गुंतलेले नागबंध हे अनंताचं प्रतीक आहे. याच छतावर देखणा नवग्रहसमूहही कोरलेला आहे. मंदिरातलं सर्वच कोरीवकाम दृष्टी दिपवणारं आहे.

गाभाऱ्याच्या भिंतीवर अजाचं, म्हणजेच बोकडाचं तोंड असलेल्या दक्ष राजाची हात जोडून उभी असलेली सुरेख आणि दुर्मिळ अशी मूर्ती आहे, तर गाभाऱ्याच्या मागं बाह्य भिंतीवर वास्तुपुरुषाचं अंकन आहे. मंदिराच्या आवारात एक देखणा सप्तमातृकापट आहे. 

वीरभद्रमंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, या मंदिराबाहेर असलेला दगडी विजयस्तंभ. या स्तंभाशी मराठी इतिहासाचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांचे सुपुत्र, हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराममहाराज यांचं चित्र या विजयस्तंभावर कोरलेलं आहे. 

आता तुम्ही विचाराल, छत्रपती राजाराममहाराजांचा आणि केळदीचा काय संबंध? तर शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड ही कपटी औरंगजेबाच्या ताब्यात गेली. औरंगजेबानं संभाजीमहाराजांचा अनन्वित छळ करून त्यांची हत्या केली. महाराणी येसूबाई आणि युवराज शाहू हे औरंगजेबाच्या कैदेत होते. प्रसंग मोठा बाका होता. अशा वेळी छत्रपती राजाराममहाराज आजच्या तामिळनाडूत असलेल्या जिंजी किल्ल्याकडे निघाले. त्यांच्या मागावर औरंगजेबाची फौज होती. अशा वेळी छत्रपती राजाराममहाराजांनी केळदीच्या चेन्नम्मा राणीकडे मदत मागितली. 

कुंदापूरचा एक व्यापारी सिद्दप्पा शेट्टी याची मुलगी चेन्नम्मा ही सन १६६७ मध्ये केळदीचा राजा सोमेश्वर नायक याच्याशी विवाह करून केळदीची राणी झाली होती. सोमेश्वर नायकाच्या मृत्यूनंतर राणी चेन्नम्मानं तब्बल २६ वर्षं केळदीचा राज्यकारभार चालवला. विजयनगरच्या साम्राज्याच्या सेनापतीचा वंशज असलेला तिम्मण्णा नायक हा राणीचा मुख्य प्रधान होता. त्याच्या सल्ल्यानं राणी चेन्नम्मानं धाडसानं राजाराममहाराजांना आश्रय दिला आणि औरंगजेबासारख्या बलाढ्य, क्रूरकर्मा मुघल बादशहाला आव्हान दिलं. 

मुघलांची फौज केळदीवर चालून आली. राणी चेन्नम्मानं स्वतः लढाईचं नेतृत्व करून मुघल सैन्याचा पाडाव तर केलाच; पण मुघलांना तिच्याशी तह करायला भाग पाडून तिनं राजाराममहाराजांना जिंजीपर्यंत सुखरूप पोहोचवलं. या विजयाचं प्रतीक म्हणून राणीनं वीरभद्रमंदिराच्या समोर एका जोत्यावर विजयस्तंभ उभारला. त्या स्तंभाच्या पायथ्याशी एक सुरेख श्रीगणेश कोरलेला आहे आणि त्याखाली राणी चेन्नम्मा, छत्रपती राजाराममहाराज आणि त्यांच्या दोन राण्यांच्या आकृती कोरलेल्या आहेत. 

केवळ हिंदवी स्वराज्यावरच नव्हे, तर संपूर्ण भारत देशावर केळदीच्या या राणी चेन्नम्माचे किती उपकार आहेत! या लढवय्या राणीचं कर्तृत्व स्मरण्यासाठी आणि रामेश्वर मंदिरसमूहातलं अपूर्व शिल्पवैभव अनुभवण्यासाठी केळदीला जायलाच हवं.
(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com