प्रतिसाद : असे आणि तसे! (विजय तरवडे)

vijay tarawade
vijay tarawade

संगणक, इंटरनेट वगैरे गोष्टी शास्त्रज्ञांखेरीज कोणाला ठाऊक नसतील, तेव्हा आवडत्या लेखकांवर प्रेम करण्याचा एकच मार्ग वाचकांकडे होता. तो म्हणजे खुशीपत्रं. वाचकांकडून आलेल्या स्तुतीपर पत्रांना "खुशीपत्रं' असं संबोधलं जाई. अशा पत्रांना लेखकांच्या सहीनिशी उत्तर आलं, की वाचकांना स्वर्ग ठेंगणा वाटे.

कोणे एके काळी संगणक, इंटरनेट वगैरे गोष्टी शास्त्रज्ञांखेरीज कोणाला ठाऊक नसतील, तेव्हा आवडत्या लेखकांवर प्रेम करण्याचा एकच मार्ग वाचकांकडे होता. तो म्हणजे खुशीपत्रं. वाचकांकडून आलेल्या स्तुतीपर पत्रांना "खुशीपत्रं' असं संबोधलं जाई. अशा पत्रांना लेखकांच्या सहीनिशी उत्तर आलं, की वाचकांना स्वर्ग ठेंगणा वाटे. मात्र, सगळेच लेखक वाचकांच्या पत्रांना उत्तर देत असं नव्हे. काही लेखक शिष्ट होते. काही लेखक नको इतके "रसिक' होते. ते फक्त "ठराविक' वाचकांच्या पत्रांना उत्तरं देत- तीही गुलाबी नोटपेपरवर आणि अत्तराचा वगैरे शिडकावा करून. साठ-सत्तरच्या दशकात बेळगावात रहाणाऱ्या कोणा इरसाल वाचकानं अशा अनेक लेखकांना "मोहिनी' या नावानं आधी खुशीपत्रं पाठवून आणि नंतर प्रेमपत्रं लिहून भलत्याच संकटात आणलं होतं. मात्र, त्यानं या पत्रांचा गैरवापर केला नाही. त्यानं फक्त या लेखकांची फजिती केली. ठणठणपाळ (जयवंत दळवी) यांनीदेखील "ललित'च्या अंकात त्यांची खास लेख लिहून दखल घेतली. पु. शि. रेगे यांनाही एका कवीनं अशी "ग्रेसफुल' पत्रं लिहून गुंगारा दिला होता. ऐंशीच्या दशकात एक लोकप्रिय लघुकथाकार या धर्तीचे रसिक पत्रलेखक म्हणून गाजू लागले. रमेश मंत्री यांनी त्यांच्यावर चक्क विनोदी कादंबरी लिहिली. मीदेखील गंमत म्हणून त्या लघुकथाकारांना मुलीचं एक काल्पनिक नाव वापरून खुशीपत्र लिहिलं. त्या पत्राचे रंगीबेरंगी आणि लाडिक उत्तर आल्यावर एका दैनिकाच्या दिवाळी अंकात त्यावर विनोदी कथा लिहिली. ती कथा गाजल्यावर ते काल्पनिक नाव मला इतकं आवडलं, की तेच टोपणनाव घेऊन एका दैनिकात सलग चार वर्षं साहित्यिक गप्पांचं सदर लिहिलं. हे सदर लिहिताना एक अनवस्था प्रसंग ओढवला. सदर चालू असताना स्टेफी ग्राफ या खेळाडूनं निवृत्ती घेतली. त्याच आठवड्यात एका ज्येष्ठतम लेखिकेनं अनेक सरकारी समित्यांवरच्या जागा अडवल्याची बातमी आली. उतारवयामुळं लेखिका सतत आजारी असल्यानं सर्व सरकारी समित्यांचं काम कित्येक महिन्यांपासून ठप्प झाल्याचं बातमीत म्हटलं होतं. बातमीवर माझ्या सदरात मल्लीनाथी करताना मी म्हटलं, की या ज्येष्ठतम लेखिकाबाईंनी स्टेफी ग्राफपासून आदर्श घ्यावा आणि राजीनामा देऊन सर्व समित्यांवरची अडवून ठेवलेली जागा तरुणांसाठी मोकळी करावी. हा लेख छापून आल्यावर दैनिकाच्या आणि माझ्या नावानं अब्रूनुकसानी झाल्याची नोटीस आली. नोटिशीला उत्तर देण्यापूर्वी मी शंकर सारडा यांना सल्ला विचारला. त्यांनी योग्य तो सल्ला दिला. त्या वेळी सारडादेखील एका दैनिकात सदर लिहीत होते. त्यात त्यांनी या प्रकरणावर रंगवून लिहिलं आणि ठळक अक्षरात लेखाचा शेवट केला ः "पूर्वी खाडिलकरांनी लिहिलेल्या लेखाची लोकमान्य टिळकांनी जबाबदारी घेऊन शिक्षा भोगली होती. आता या लेखाची जबाबदारी संपादक घेतील काय?' त्या नोटिशीचं पुढं काय झालं ते समजलं नाही. कालांतरानं संपादक अरविंद गोखले दुसऱ्या दैनिकात गेले.

रशियामध्ये अनेक वर्षं स्थायिक झालेले आणि अनेक रशियन पुस्तकांचे मराठी अनुवाद करणारे अनिल हवालदार उत्तरायुष्यात पुण्याला स्थायिक झाले होते. त्यांनी "मुलखावेगळा' हे आत्मचरित्र लिहिलं. आत्मचरित्राचा नायक रशियात तीन दशकं स्थायिक झाल्यानं आणि जीवनात अनेक अद्भुत घेतल्यानं "मुलखावेगळा' हे आत्मचरित्राचं शीर्षक अतिशय कल्पक आणि समर्पक होतं. हवालदार यांना मी तसं पत्र लिहिलं आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी एका रविवारी सकाळी ठीक 11 वाजता पुण्यातल्या आनंदनगर इथल्या घरी बोलावलं. माझ्या एका मित्रासह मी वेळेवर पोचलो. माझ्या पिशवीत त्यांनी अनुवादित केलेली पुस्तके होती. त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. मात्र, त्यांना लिहिताना बराच त्रास होत होता. त्यांचं अतिशय पारदर्शक आत्मचरित्र संपूर्ण वाचलं असल्यानं त्यांना कोणताही वैयक्तिक प्रश्न विचारण्याची गरज नव्हती. आत्मचरित्राची वर्तमानपत्रांनी अपेक्षित दखल घेतली नसल्यानं अनिल थोडे नाराज होते. पुलंचे नातलग दिनेश ठाकूर हे हवालदारांचे जवळचे मित्र होते. "तुम्ही पुलंना या पुस्तकावर लिहिण्याची विनंती का करत नाही?' असा मी प्रश्न केल्यावर त्यांनी खांदे आणि माझा प्रश्न हवेत उडवला.

यानंतर मी त्यांना दोनच प्रश्न विचारले ः "टॉल्स्टॉय आणि तल्स्तोय यातला कोणता उच्चार बरोबर आहे? उत्तर धृवावर सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस असतात तर त्यांच्या संधिकाली आकाश कसं दिसतं?' आता या प्रश्नांची उत्तरं नेटवर उपलब्ध आहेत; पण अनिल हवालदार यांच्या तोंडून ती ऐकणं हा खास अनुभव होता. अनिल मनापासून गप्पा मारत होते.

स्वतःबद्दल मोकळेपणानं बोलले. त्यांच्या मनात कोणाहीबद्दल कटुता नव्हती. नोकरीत असताना प्रतिस्पर्धी अनुवादकांनी दिलेला त्रास असो, की कौटुंबिक जीवनात वादळ येण्यास निमित्तमात्र झालेले विजय तेंडुलकर असोत - कोणाहीबद्दल त्यांनी कटू उद्‌गार काढले नाहीत. पुण्यात आल्यावर त्यांना जडलेल्या आजारांमुळं मात्र अनिल त्रस्त झालेले होते. त्यांना थोडी आर्थिक चणचणदेखील भासत होती. काही दिवसांनी ते वृद्धाश्रमात दाखल झाल्याचं समजलं. त्यांच्या निधनाची अगदी छोटी बातमी छाप्यात आली. इंग्रजीत "He went unsung` म्हणतात तसे ते गेले. त्यांच्याशी माझी कोणती खास मैत्री नव्हती. आमची अवघी एकच भेट झाली; पण त्यांनी केलेलं रशियातल्या तत्कालीन सामाजिक-राजकीय वातावरणाचं दस्तावेजीकरण दखल न घेताच विस्मरणात विरघळून गेलं, याची हळहळ वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com