आता वेळ मोदींना पर्याय शोधण्याची..! कोण असेल शर्यतीत?

आता वेळ मोदींना पर्याय शोधण्याची..! कोण असेल शर्यतीत?

देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकाल काल (ता.11) लागले. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला. पाचही राज्यात भाजपचा सपशेल पराभव झाला. त्यापैकी 3 राज्यात तर भाजपच्या हातची सत्ताही गेली. या तीन राज्यात काँग्रेसने चांगले यश मिळवल्याने पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. तर आतापर्यंत मोदी-शहा या जोडगोळीचा चाललेला विजयरथ थांबल्याने त्यांच्यासाठी हा धोक्याचा इशारा आहे, असेच म्हणावे लागेल.

या निकालाने केवळ भाजपचा पराभव झाला नाहीतर आता मोदींच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उभे रहायला सुरवात झाली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेल्या मोठमोठ्या घोषणा या फक्त दिशाभूल करणाऱ्या ठरल्या आहेत, असे आता जनतेला वाटायला लागले आहे. तर जनतेने दिलेला हा त्यांच्यासाठी एक धडा आहे असेही काहींचे म्हणणे आहे. 2014 नंतर साधारणतः भाजप कार्यकर्त्यांना सातत्याने वाटत राहायचे की, मोदींना पर्याय नाही. त्यामुळे देशात पंतप्रधानपदासाठी निर्विवादपणे मोदी नावाचा एकच चेहरा समोर असेल. परंतु, ही परिस्थिती बदलत असल्याची चिन्हे आता दिसत आहेत. मोदींविषयी नकारात्मकतेची भावना निर्माण होत आहे. मागे एकवेळेस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मोदींना पर्याय कोण याविषयी प्रश्न विचारला असता, त्यांनी उत्तर दिले होते की, मोदींना आता जरी पर्याय नसला तरी निवडणुका जवळ आल्या की पर्याय तयार होत असतात. 2014 पूर्वी केवळ 8 महिने आधी मोदी पंतप्रधान पदासाठी चर्चेत आले होते. त्याचप्रमाणे आताही 2019 च्या निवडणुकापूर्वी थोडेच दिवस आधी मोदींना सक्षम पर्याय म्हणून नवीन चेहरा देशाच्या समोर असेल आणि कालच्या पाच राज्यात भाजपच्या झालेल्या सपशेल पराभवाने आता मोदींना सक्षम पर्याय कोण ? या चर्चेला उधाण आले.

नितीन गडकरी- 2019 मध्ये काँग्रेस जरी जिंकली नाही तरी भाजपालाही सहजासहजी विजय मिळणार नाही हे कालच्या निकालावरून तरी स्पष्ट झाले आहे. अशा वेळी 2014 मध्ये मोदी लाटेत ज्याप्रमाणे भाजपला बहुमत मिळाले त्या पद्धतीने बहुमत मिळणे कठीण दिसत आहे आणि म्हणूनच मोदींना पक्षातूनच नितीन गडकरींचे कडवे आव्हान मिळू शकते. 2019 च्या लोकसभा निवडणुकामध्ये जर समजा भाजप 220-225  जागांपर्यंत अडकल्यानंतर सर्वसमावेशक, धर्मनिरपेक्ष, सर्व मित्रपक्षांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असलेला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा लाडका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विकासाच्या मार्गावर स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे असे लोकांना वाटणारा चेहरा म्हणून नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी समोर येऊ शकते. तेच 2019 मध्ये पंतप्रधान बनले तर आश्चर्य वाटायला नको. कारण बहुमतासाठी जागा कमी पडल्यास मित्रपक्ष मोदींना पंतप्रधान म्हणून परत कितपत पसंती देतील यावर मात्र शंका आहे. 2014 पासूनची परिस्थिती पाहिल्यास पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या जोडगोळीचे तसे पहायला गेल्यास मित्रपक्षांसोबत खास असे काही जुळलेले नाही.

राहुल गांधी- पंतप्रधान मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या चौखुर उधळलेल्या विजयाच्या वारूला लगाम घालण्याचे काम काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास आता वाढला आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपने सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून राहुल गांधींची यथेच्छ टिंगल केली. त्यांना "पप्पू' ठरवून राहुल गांधी हे पंतप्रधान पदाच्या लायक नाहीत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु आतापर्यंतच्या गुजरात आणि कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांनी राहुल गांधीची राष्ट्रीय पातळीवर लोकप्रियता वाढवण्यास मदत केली तर, कालच्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकाच्या निकालाने राहुल गांधीच्या राष्ट्रीय नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जरी त्यांच्यासमोर भाजपचे मोठे आव्हान असले तरी कालच्या निकालाने त्यांचा आत्मविश्वास दुणावण्याबरोरच पक्षालाही नवसंजिवनी मिळाली आहे. तसेच, अनेक मित्रपक्षांनाही सोबत घेण्याची क्षमता त्यांच्यात असल्याने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाल्यास राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान झाले तर नवल वाटायला नको !

शरद पवार- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे नाव तसे पहायला गेल्यास गेल्या अनेक वर्षापासून पंतप्रधान पदासाठी चर्चेत राहिलेले नाव आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांचे सर्वच पक्षाच्या नेत्यांसोबत सख्य आहे. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कुठलाच प्रमुख पक्ष जर बहुमताच्या जादुई आकड्यापर्यंत पोहोचला नाही तर काँग्रेस किंवा भाजप शरद पवांरासारख्या नेतृत्वाला बाहेरून पाठींबा देऊ शकते. यापूर्वी 1995-1996 मध्येही आपल्या हे पहायला मिळाले आहे. त्यावेळी कर्नाटकचे देवेगौडा हे पंतप्रधान झाले होते. सध्या मोदी आणि शहा या जोडगोळीची वागणूक पाहता त्यांना पक्षातला दुसरा चेहरा पंतप्रधान झालेला फारसा रुचेल असे तरी वाटत नाही. मग अशा वेळी मोदीसुद्धा दुसऱ्या पर्यायाचा विचार करू शकतात हेच खरे !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com