माउलींना सातारा जिल्‍ह्याचा भावपूर्ण निरोप

वारकऱ्यांकडून हरिनामाचा अखंड गजर; पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश
A heartfelt farewell to Mauli from Satara district
A heartfelt farewell to Mauli from Satara district

फलटण - सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती।

          रखुमाईच्या पती सोयरिया।।१।।

   गोड तुझे रूप गोड तुझे नाम।

          देई मज प्रेम सर्वकाळ।।धृ।।

   विठो माऊलीये हाची वर देई।

          संचरोनी राही हृदयामाजी।।२।।

   तुका म्हणे काही न मागे आणिक।

         तुझे पायी सुख सर्व आहे।।३।।

या भावनेने विठ्ठल दर्शनाच्या ओढीने ‘ज्ञानोबा माउली तुकारामऽऽऽतुकाराम’सह विठ्ठलनामाच्या जयघोषात व टाळ- मृदुंगाच्या गजरात पंढरपुराकडे वाटचाल करणारा लाखो वैष्णवांचा मेळा आज (सोमवारी) सातारा जिल्हावासीयांचा भावपूर्ण निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी नातेपुते येथे विसावला.

पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी विठ्ठल दर्शनाच्या ओढीने आळंदीतून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने हरिनामाच्या गजरात आज पुणे व सातारा जिल्ह्यानंतर सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. कारुंडे येथील धर्मपुरी बंगला येथे माउलींचे आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माउलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले.

यावेळी माजी आमदार रामहरी रूपनवर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक दिलीप स्वामी, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर, अकलूजचे उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे, माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, सरपंच अमोल पाटील आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी माउलींच्या पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. माउलींच्या पालखीचे आगमन सकाळी ११.३० च्या सुमारास धर्मपुरी बंगला येथे झाले. तत्पूर्वी, सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विनय गौडा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजय बोराडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी तथा प्रशासक डॉ. अमिता गावडे- पवार, जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी माउलींच्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप दिला.

‘चला पंढरीसी जाऊं। रखुमा देवीवरा पाहू॥ डोळे निवतील कान। मना तेथे समाधान॥ संतां महंता होतील भेटी। आनंदे नाचो वाळवंटी॥’ या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाने हरिनामाच्या गजरात पालखीचा सोलापूर जिल्हा प्रवेश झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com