केशरी कार्डधारकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न; धान्य नसल्याने अनेकांचे हाल

केशरी कार्डधारकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न; धान्य नसल्याने अनेकांचे हाल

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोना संकटकाळात अनेकांचे रोजगार बुडाले. मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गेल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यांना आधार देण्यासाठी शासनाने रेशनिंग कार्डधारकांना धान्य देण्याची घोषणा केली. त्यानुसार मे व जूनचे धान्य मिळाले. मात्र, केशरी कार्डधारकांतील एपीएल लाभार्थींना जुलै व ऑगस्टचे धान्यच मिळालेले नाही. त्यामुळे धान्यही नाही आणि अपेक्षित रोजगारही नाही, त्यामुळे अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

कोरोनामुळे मोठे संकट उभे राहिले. त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सुरवातीच्या काळात लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय बंद ठेवावे लागले. त्याचबरोबर अनेकांचा रोजगार बुडाला. कंपन्या बंद राहिल्याने अनेकांना नोकऱ्यास मुकावे लागले. त्यामुळे लाखो कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्याचा विचार करून केंद्र शासनाने रेशनिंग कार्डधारकांना धान्य वाटण्याची घोषणा केली. त्यानुसार कार्डनिहाय प्रकार करण्यात आले. त्यामध्ये बीपीएल कार्डधारकांना धान्य फुकट देण्यात आले. तर केशरी कार्डधारकांत प्राधान्य कुटुंब लाभार्थींना अन्नसुरक्षा योजनेत घेतले असल्याने त्यांनाही धान्य देण्यात आले. मात्र, केशरी कार्डातील अप्राधान्य गट म्हणजेच एपीएल कार्डधारकांना 12 रुपये किलोने तांदूळ तर आठ रुपये किलोने गहू देण्यात आला. त्याचे मे व जून महिन्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर शासनाकडून पुन्हा जुलै व ऑगस्ट महिन्यातही धान्य देण्याचे जाहीर करण्यात आले. 

मात्र, एपीएलच्या लाभार्थ्यांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे धान्यच वाटण्यासाठी सरकारकडून आलेले नाही. कोरोनातील लॉकडाउनमुळे अनेकांच्या हाताचे काम गेले. काहींच्या नोकऱ्याही गेल्या. सध्या लॉकडाउन शिथिल होत आहे. मात्र, तरीही पहिल्यासारखी परिस्थिती अजूनही रुळावर आलेली नाही. त्यामुळे लोकांच्यापुढे मोठे आर्थिक संकट आहे. त्यातच रेशनिंगचे धान्यही मिळत नसल्याने अनेक एपीएल कुटुंबांतील लाभार्थींचे आर्थिक गणितच कोलमडलेलेच आहे. यातील अनेकांची आर्थिक स्थिती पूर्वी बरी होती. मात्र, लॉकडाउनंतर ती कोलमडलेली आहे. त्यामुळे त्यांना सद्य:स्थितीत तरी धान्याची मोठी आवश्‍यकता आहे. त्यांची अवस्था सांगताही येईना आणि सहनही होईना, अशीच झाली आहे. 

कऱ्हाडचे एक पाऊल पुढे 

तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने त्यांच्याकडे वाटण्यासाठी आलेल्या धान्यापैकी केशरी कार्डातील प्राधान्य कुटुंब लाभार्थींना वाटण्यासाठी कऱ्हाड तालुक्‍यातील 20 ते 25 दुकानदारांना धान्य पुरवठा केला आहे. त्यामुळे काही लाभार्थींना त्याचा लाभ झाला आहे. त्यामुळे कऱ्हाडचे एक पाऊल पुढे आहे. मात्र, उर्वरित कुटुंबांना मात्र प्रतीक्षाच करावी लागणार आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com