पावसाने हिरावला शेतकऱ्याच्या तोंडचा घास, पिके जमीनदोस्त

पावसाने हिरावला शेतकऱ्याच्या तोंडचा घास, पिके जमीनदोस्त

कऱ्हाड (जि. सातारा) : समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने घेतलेली पिके काढणीच्या शेवटच्या टप्प्यात असतानाच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन, भात, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली खरीप हंगामातील पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. 

जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतकरी घेतात. त्यामध्ये भात, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, मका, बाजरी पिकांसह कडधान्य व तृणधान्यांचा समावेश आहे. यंदा खरीप हंगामातील पिकांसाठी पोषक असा मॉन्सूनचा पाऊस झाला. त्यामुळे पिकेही चांगली उगवून आली होती. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना चांगले उत्पादन होईल, अशी आशा होती. मागील महिन्यापासून खरिपातील पिके काढणीस आली. त्यामुळे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांनी भात, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, मका, बाजरी आदी पिकांची काढणी सुरू केली. तर काही शेतकरी अजूनही काढणीच्या प्रतीक्षेत आहेत.

काही शेतकऱ्यांनी काढणी झालेली पिके मळणीसाठी रचून ठेवली आहेत तर काहींनी काढून वाळत घातली होती. अशातच समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला. त्यातच सध्या मॉन्सूनचा परतीच्याही पावसाचा हंगाम सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून सोयाबीन कुजण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी भात जमीनदोस्त झाले आहेत. भुईमुगाच्या शिवारात पाणी असल्याने ते पुन्हा उगवण्याच्या स्थितीत आहेत. तर शेतकऱ्यांनी वाळत घातलेली पिके भिजूनही मोठे नुकसान झाले आहे. ऐन पिके काढणीच्या हंगामातच पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी दिवसरात्र मेहनत करून घेतलेली पिके काढणीच्या शेवटच्या टप्प्यात असतानाच पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

हातातोंडाशी आलेली खरीप हंगामातील पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, साखर कारखान्यांच्या हंगामाअगोदरच जिल्ह्यात गेल्या महिन्यात गुऱ्हाळघरे सुरू झाली आहेत. गुळालाही चांगला दर मिळत असल्याने शेतकरीही उसाचे गुऱ्हाळ करत आहेत. मात्र, दोन दिवसांतील पावसाने शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे ऊसतोडणी थांबली आहे. त्याचबरोबर पावसाने गुऱ्हाळेही बंद ठेवावी लागली आहेत. त्यामुळे त्यांचेही नुकसान झाले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com