मायणीत स्वच्छतेचा बोजवारा, घंटागाडी ठरतेय कुचकामी

मायणीत स्वच्छतेचा बोजवारा, घंटागाडी ठरतेय कुचकामी

मायणी (जि. सातारा) : ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष व बेफिकीर नागरिकांमुळे येथे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, घंटागाडी कुचकामी ठरत आहे. किमान दिवसाआड घंटागाडी प्रत्येक भागात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

गावात स्वच्छता राहावी, या उद्देशाने येथील ग्रामपंचायतीने कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी घेतली आहे. घंटागाडीद्वारे कचरा गोळा करून तो अनफळे रोडनजीकच्या कचरा डेपोत टाकला जातो. त्याशिवाय वडूज रस्त्यावरील नाल्याजवळ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ व बस स्थानक परिसरात अशा तीन ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यात साचलेला कचरा उचलून नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी दोन महिला कामगार नेमण्यात आले आहेत. मात्र, योग्य नियोजन, दुर्लक्ष व व्यवस्थापनाअभावी कचराकुंड्या व घंटागाडीचा उपक्रम निरुपयोगी ठरत आहे. काही कचराकुंड्या भरून वाहू लागल्या आहेत, तर काही कचराकुंड्या पाहिल्यास कचराकुंडीत, की कचराकुंडी कचऱ्यात? असा प्रश्न निर्माण होतो आहे. वडूज रोडला नाल्याजवळ ठेवलेल्या कचराकुंडीची अवस्था तशीच झाली आहे. ओला व सुका कचरा वेगळा केला जात नसल्याने व वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने कचराकुंडी ठेवलेल्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्याचा त्रास तेथील रहिवाशांना होत आहे. त्याशिवाय वाऱ्याने उडून कचरा परिसरात पसरत आहे. घंटागाडी वेळेवर येत नसल्याने कचरा टाकायचा कुठे असा प्रश्न नागरिक करीत आहेत, तर प्रत्येक भागात दिवसाआड घंटागाडी जात असल्याचा दावा घंटागाडी चालकांकडून केला जात आहे. 

दरम्यान, मुख्य बाजारपेठेतील रस्ता दर्जोन्नतीच्या कामामुळे आधी सर्वत्र राडारोडा पडलेला आहे. मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने गावात सर्वत्र घंटागाडी जात नाही. परिणामी, बाजारपेठेसह गावभागात राहणाऱ्या नागरिकांपुढे कचरा टाकण्याची समस्या निर्माण झाली आहे. नागरिक इतरत्र कुठेही कचरा टाकत असल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग निर्माण होत आहेत. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर तरी सर्व कचराकुंड्या व इतरत्र साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट ग्रामपंचायतीने लावावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. चालक बाबू माने यांच्या म्हणण्यानुसार, चांदणी चौकाच्या वरील भागात एक दिवस व गाव भागात एक दिवस अशी दिवसाआड घंटागाडी फिरवली जाते. काही नागरिक घंटागाडीत कचरा न टाकता इतरत्र टाकत असतात. आठवड्यातून केवळ एक-दोन दिवसच घंटागाडी येत असते. अशी तक्रार नदाफ कॉलनी भागात राहणाऱ्या ग्रामपंचायत सदस्या अर्चना जाधव यांनी "सकाळ'शी बोलताना केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com