Udayanraje Bhosale Satara - सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले यांचा पुढाकार आणि संकल्पनेतून आयोजित महारोजगार मेळाव्यात पहिल्याच दिवशी ७६२ जणांना ऑन दि स्पॉट नोकरीचे नियुक्तिपत्र देण्यात आले. दोन दिवसीय मेळाव्यात ५ हजार ६०० जणांची नोंदणी झाली असून, त्यापैकी ३ हजार ९०० जणांच्या पहिल्याच दिवशी मुलाखती झाल्या.
साताऱ्याच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून इनोव्हेटिव्ह सातारा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आठ दिवसांपूर्वी केंद्रीय सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत साताऱ्यात उद्योग परिषद झाली. यानंतर खासदार उदयनराजे भोसले आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे दोन दिवसीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख, माजी आमदार आनंदराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील युवकांनीही मोठी गर्दी केली होती. युवकांच्या नावनोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला होता. यात दिवसभरात ५ हजार ६०० युवक-युवतींची नोंदणी झाली.
यानंतर मुलाखतीसाठी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींकडे नोंदणी केलेल्या उमेदवारांना पाठविण्यात येत होते. पहिल्याच दिवशी ३ हजार ९०० जणांच्या मुलाखती पार पडल्या. यापैकी ७६२ जणांना विविध कंपन्यांच्या वतीने ऑन दि स्पॉट नियुक्तिपत्रे देण्यात आली. उद्या (सोमवारी) मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा पाच हजार युवक-युवतींची नोंदणी होण्याची अपेक्षा संयोजकांनी व्यक्त केली आहे. यातील जास्तीत जास्त निवडपात्र युवक-युवतींना ऑन दि स्पॉट नियुक्तिपत्रे देण्याचा त्यांचा मानस आहे.
मेळाव्यासाठी आलेल्या उमेदवारांसाठी अल्पोपाहार, चहा, पिण्याच्या पाण्याची सोय करणात आली असून, परगावाहून येणाऱ्या उमेदवारांसाठी विशेष बससेवेची सोय करण्यात आली आहे. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी खासदार उदयनराजे मित्र समूह, यशोदा शिक्षण संस्था आणि जिल्हा उद्योग केंद्र विशेष परिश्रम घेत आहे.
नोकरीच्या पुढे जाऊन आवश्यक असणारी कौशल्ये आत्मसात करत युवकांनी रोजगार देणारे बनणे आवश्यक आहे. युवकांनी उद्योजक बनावे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना शासन राबवत असून, आगामी काळात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढवणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सातारा येथील महारोजगार मेळाव्यात दिली. दरम्यान, दहा महिन्यांत उद्योग विभागाने १३ हजार उद्योजक निर्माण करत त्यांना ५५० कोटींचे अनुदान दिल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा उद्योग केंद्र आणि खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने येथील यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये दोन दिवसीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,
मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ, माजी सभापती सुनील काटकर, धैर्यशील कदम, राजेंद्र यादव, यशोदाचे संस्थापक प्रा. दशरथ सगरे, काका धुमाळ, माजी आमदार आनंदराव पाटील, डॉ. दिलीप येळगावकर, सुशांत निंबाळकर, संग्राम बर्गे आदी उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले, ‘तरुणाईच्या हाताला रोजगार देणे ही सर्वांची जबाबदारी असून, त्यासाठी शासनाने जास्तीत जास्त रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यंदा २५ हजार नवउद्योजक निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट असून, त्यासाठीच्या उपाययोजना राबविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यरत आहेत.’ यानंतर शंभूराज देसाई यांनी, दुर्गम व डोंगरी भागातही अशा प्रकारचे मेळावे घेणे आवश्यक असून, त्यासाठी जिल्हा प्रशासन पुढाकार घेईल, असे सांगितले.
उदयनराजे भोसले म्हणाले, ‘युवकांनी उद्दिष्ट आणि ध्येय ठेवून काम करणे आवश्यक असून, धाडस करत मिळेल त्या संधीचे सोने युवकांनी केले पाहिजे. युवकांनी नोकरी करणारे होण्यापेक्षा देणारे व्हावे, ही माझी इच्छा असून, त्यासाठी मी सदैव सहकार्य करण्यास तयार आहे. विकासासाठी सरकारी जागा मिळाली नाही तर माझी जागा मी देण्यास तयार आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
यानंतर उदय सामंत यांच् याहस्ते साताऱ्यातील स्पॅव्ही फिटनेस इक्विपमेंट, तासवडे येथील आनंद इंडस्ट्रीज, नायट्रोऑक्सिजन प्रायव्हेट लिमिटेड, व्यंकटेश ॲग्रो प्रोसेसिंग कंपनीला पुरस्कार देण्यात आला. यावेळी मेळाव्यात नोकरी मिळवलेल्या युवक-युवतींना नियुक्तिपत्रे तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातील लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे धनादेश हस्ते देण्यात आले. मेळावा आयोजनामागील भूमिका संग्राम बर्गे यांनी मांडली तर आभार सदाशिव सुरवसे यांनी मानले.
राज्यातील सरकार हे युवकांच्या हाताला काम देणारे असून, त्यासाठीचे उपक्रम सरकार राबवत आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प कोणामुळे बाहेर गेला, याची कल्पना राज्यातील जनतेला आहे. या प्रश्नावर आरोप करत राज्याची बदनामी करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येत महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावणे गरजेचे आहे. वेदांता प्रकरणाची श्वेतपत्रिका लवकरच जनतेसमोर मांडण्यात येणार असून, राज्यातील सत्तांतरामुळे राजकीय रोजगार हिरावलेल्यांसाठी देखील लवकरच राजकीय रोजगार मेळावा घेणार असल्याची टिप्पणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सातारा येथे केली.
महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटनासाठी उदय सामंत सातारा येथे आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख, माजी आमदार आनंदराव पाटील, डॉ. दिलीप येळगावकर, सुशांत निंबाळकर आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर पत्रकार परिषदेत त्यांना राज्यातील सत्तांतरामुळे अनेकांचा राजकीय रोजगार हिरावला गेलाय का, या विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी वरील उत्तर दिले.
उदय सामंत म्हणाले, साताऱ्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळावी, यासाठी उदयनराजे भोसले यांचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी मी इथे आलो आहे. याठिकाणी त्यांनी उद्योग विभागाचे विभागीय कार्यालय, युवकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठीचे केंद्र आणि कामगारांसाठी रुग्णालय असावे, अशी मागणी केली आहे. राज्यात सत्तेत असणाऱ्या सरकारने अनेक लोकोपयोगी कामे केली असून, योग्य वेळी मंत्रिमंडळाचादेखील विस्तार करण्यात येईल.
भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकमेकांच्या साथीने व्यवस्थित काम करत असल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार किंवा इतरांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. त्यांनी आम्हाला सल्ले देण्याऐवजी महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल आहे का?, याची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी मांडले. गत एक वर्षात राज्यातील उद्योगांची संख्या १३ हजारांनी वाढल्याची माहितीही सामंत यांनी दिली.
साताऱ्याच्या विकासासाठी उदयनराजे आग्रही आहेत. त्यांनी आयटी पार्क, कामगार रुग्णालय, उद्योग मंत्रालयाचे विभागीय कार्यालय, अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र, कामगार रुग्णालयाची मागणी केली आहे. त्या आम्ही मान्य केल्या असून, पंधरा दिवसांत उद्योग विभागाचे विभागीय कार्यालय सुरू करणार आहे.
जमिनीचा सातबारा हा माझ्यासाठी कागदी तुकडा आहे. खरा सातबारा हा समोर बसलेला युवक आणि युवती आहेत. माझी धडपड आणि माझ्या हृदयातील धडधड ही फक्त सातारकरांसाठी, युवकांसाठी आणि विकासासाठी सुरू आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.