सातारा : आला पावसाळा शेतीपंप सांभाळा

नदीकाठच्‍या गावांतील शेतकऱ्यांना केल्‍या सूचना
शेतीपंप सांभाळा
शेतीपंप सांभाळाsakal

सातारा : कोकण किनारपट्टीवर मॉन्‍सून थडकला असून येत्‍या काही दिवसांत साताऱ्यासह इतर भूभाग व्‍यापण्‍याची शक्‍यता वेधशाळेने वर्तवली आहे. या शक्‍यतेच्‍या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभाग सक्रिय झाला असून धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करण्‍याबरोबरच अतिवृष्‍टीच्‍या काळात अचानक पाणी सोडावे लागल्‍यास नदीकाठच्‍या गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्‍यासाठी त्‍यांनी आत्तापासूनच शेतीपंप सुरक्षित ठिकाणी हलविण्‍याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्याच्या विविध भागांतून वाहणाऱ्या नद्या आणि त्‍यातील पाण्‍यामुळे नदीकाठ सुजलाम-सुफलाम झाला आहे. साताऱ्यासह सांगली व दुष्‍काळी टप्‍प्‍यातील काही भागांची पाण्‍याची गरज भागविण्‍याचे काम गेली अनेक वर्षे कोयना, तारळी, उत्तरमांड, उरमोडी, धोम, कण्‍हेर यांसह इतर धरणे करत आहेत. या धरणांतून शेती व इतर कारणांसाठी मागणीनुसार नदीपात्रात पाणी सोडण्‍यात येते. तोंडावर असणाऱ्या पावसाळ्याची गृहीतके लक्षात घेत धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन धरण व्‍यवस्‍थापन, जिल्‍हा प्रशासन व पाटबंधारे विभागाकडून सध्‍या सुरू आहे. जून तसेच जुलै महिन्‍यांत जिल्‍ह्‍याच्‍या डोंगरी भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्‍टी होते. अतिवृष्‍टीवेळी जिल्ह्यातील धरणांची आवक वाढते. पाण्‍याची आवक वाढल्‍याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्‍यासाठी अनेक वेळा पाणी नदीपात्रात सोडावे लागते.

धरणांतून सोडण्‍यात येणारे पाणी, ओढे, नाले व इतर स्‍त्रोतांतून नदीपात्रात येणाऱ्या पाण्‍यामुळे अतिवृष्‍टीच्‍या काळात कोयना, कृष्‍णा, वेण्‍णा, उरमोडी, तारळी व इतर सर्वच नद्या धोकापातळी ओलांडतात. संततधार पाऊस, चिखल यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना शेतीपंप पडत्‍या पावसात हलविणे शक्‍य होत नाही. यामुळे पुराच्‍या पाण्‍यात पंप व उपसा योजनेसाठीचे आवश्‍‍यक साहित्‍य पूर ओसरेपर्यंत पाण्‍यात बुडून राहतात किंवा पुराच्‍या पाण्‍यात वाहून जातात. गतवर्षी झालेल्‍या अतिवृष्‍टीच्‍या काळात जिल्‍ह्‍यातील सर्वच नद्यांनी धोकापातळी ओलांडली होती. यामुळे नदीकाठावरील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्‍या पंपांचे व इतर साहित्‍याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

यंदाच्‍या संभाव्‍य अतिवृष्‍टी काळाचा विचार करत नदीकाठावरील गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्‍यासाठी पाटबंधारे विभाग सक्रिय झाला आहे. त्‍यांनी बहुतांश नदीकाठावरील गावांतील शेतकऱ्यांना पावसाळा सुरू होण्‍यापूर्वीच शेतीपंप व इतर साहित्‍य सुरक्षित हलविण्‍याचे आवाहन केले आहे. आवाहनानुसार शेतीपंप व इतर साहित्‍य सुरक्षित न हलविल्‍यास पुरामुळे होणाऱ्या नुकसानीस शेतकरीच जबाबदार राहतील, असेही पाटबंधारे विभागाने जाहीर केले आहे. या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्‍यासाठी पंप व इतर साहित्‍य संततधार पाऊस सुरू होण्‍यापूर्वीच तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात सुरक्षित ठिकाणी हलविणे आवश्‍‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com