सातारा (ढेबेवाडी) : भाताच्या शिवारात घुसलेल्या गव्यांच्या दोन कळपांमध्ये जोरदार झुंज लागल्याने चोरगेवाडी (काळगाव, ता. पाटण) येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. गव्यांनी भात काढणीपूर्वीच मळणी केल्याने वनविभागाने तातडीने नुकसान भरपाई देऊन दिलासा देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
चोरगेवाडी शिवारात भगवान चोरगे, अरविंद चोरगे, मारुती चोरगे, रामचंद्र चोरगे, सीताराम चोरगे, संपत चोरगे, आनंदा चोरगे, तानाजी चोरगे, सुभाष चोरगे, किसन चोरगे, हणमंत डाकवे, शिवाजी चोरगे, बाबूराव चोरगे, विष्णू चोरगे, लक्ष्मण चोरगे आदी शेतकऱ्यांच्या भातशेतीचे गव्यांनी नुकसान केल्याचे सांगण्यात आले. त्यात कहर म्हणजे गव्यांच्या दोन कळपांतील नरांमध्ये भाताच्या शिवारात जोरदार झुंज लागल्याचीही घटना नुकतीच तेथे घडल्याने आधीच हैराण असलेल्या शेतकऱ्यांचा पाय आणखीनच खोलात गेला आहे. झुंजीमळे काढणीपूर्वीच भात पिकाची शेतात मळणी झाल्याचे दिसून येत आहे.
या घटनेनंतर वनक्षेत्रपाल एल. व्ही. पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुभाष राऊत, वनरक्षक जयवंत बेंद्रे, मुबारक मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केली. गव्यांचे कळप समोरासमोर आल्यावर अनेकदा त्यातील नरांमध्ये वर्चस्व वादातून झुंजीचे प्रकार घडतात. या झुंजी एवढ्या जबरदस्त असतात की जिथे त्या सुरू असतात तेथील गवत, पीक, झुडपे भुईसपाट होतात. काहीवेळा गव्यांचा झुंजीत मृत्यूही होतो. तसे प्रकार यापूर्वीही ढेबेवाडी खोऱ्यात घडलेले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.