
पहिल्याच पावसात कोयनेतील पाऊस माेजण्याची यंत्रणा ठरली फेल
कोयनानगर (जि. सातारा) : कोयना धरण (koyna dam) पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस (rain) पडायला सुरुवात झाली आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वरला पाऊसधारा कोसळत आहेत. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली असून आज (रविवार) सकाळी आठच्या माहितीनूसार दाेन हजार 814 क्युसेक पाण्याची आवक झाली. धरणात आज (रविवार) 28.45 टीएमसी पाणीसाठा आहे. (satara-marathi-news-koyna-region-rain-gauge-satellite-system-shambhuraj-desai)
मुसळधार पावसाचे आगार असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन झाले आहे. पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 23 (एकत्रित 111) मिलिमीटर, तर महाबळेश्वर येथे 36 (282) तसेच नवजा येथे 43 (196) मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाणलोट क्षेत्रातील नवजा या ठिकाणी जोरदार पाऊस पडत असला, तरी पाणलोट क्षेत्रात अचूक पर्जन्यमापक करणारी यंत्रणा सदोष असल्याने या ठिकाणचा पाऊस उपलब्ध झाला नाही.
कोयना परिसरातील बीएसएनएलची दूरध्वनी सेवा बंद असल्याने कोयना धरण व्यवस्थापनाची इंटरनेट सेवेत व्यत्यय आला आहे. कोयना धरण व्यवस्थापनाने पर्जन्यमापक करणारी सॅटेलाइट यंत्रणा सदोष असल्याने त्या ठिकाणी लवकरच पर्यायी यंत्रणा उभी करणार असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी स्पष्ट केले.
कोयना पाणलोट क्षेत्रातील नवजा या ठिकाणी पडणारा पाऊस सॅटेलाइट यंत्रणा बंद असल्याने मिळत नाही. कोयना धरण व्यवस्थापनाने या ठिकाणी पर्यायी यंत्रणा उभी केली आहे. परिणामी दर २४ तासाला या ठिकाणी पडणारा पाऊस ऊपलब्ध होऊ लागला आहे. नवजा येथे 43 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

वर्ष झाले पर्जन्यमापकाची 33 पदे रिक्त
कोयना प्रकल्पात पर्जन्यमापकाची 33 पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरावी, अशी मागणी कोयना प्रकल्पाने शासनाकडे केली आहे. गेली अनेक वर्ष कोयना प्रकल्पाचे अधिकारी वर्गाने "ठेकेदार धार्जिणे धोरण ठेवल्याने ही पदे भरली गेली नाहीत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना प्रकल्पाच्या अधिकारी वर्गाने हे धोरण बदलून पर्जन्यमापक ही पदे भरून कोयनेचे पूर नियंत्रण उत्कृष्ट करावे, असे आदेश दिले हाेते.
ही पदे कशी भरायची याबाबत कोयना धरण व्यवस्थापनाने वरिष्ठ कार्यालयास मार्गदर्शन मागविले. त्यानंतर सातारा सिंचन महामंडळाने नकारात्मक अहवाल दिले आहे. पाऊस माेजण्याची यंत्रणा सदाेष नसल्याने सध्या याबाबत मंत्रालयीन स्तरावर निर्णय व्हावी अशी अपेक्षा या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. परिणमी ही पर्जन्यमापकाची पदे आजही रिक्त आहेत. सध्या सुरक्षा रक्षकच पर्जन्यमापकाचे कामकाज करीत आहेत.