सातारा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यात सहा दिवस विसावा आहे. या कालावधीत पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना जलद आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय मदत पथके व फिरत्या पथकांसह ५२ पथके कार्यरत आहेत. याचबरोबर साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून त्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.
कोरोनाचे संकट मावळल्यानंतर यंदा प्रथमच दोन वर्षांनंतर पालखी सोहळा होणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २८ जूनला जिल्ह्यात येणार असून लोणंदला दोन दिवस, तरडगाव, फलटणला दोन दिवस व बरड असा सहा दिवस विसावा आहे. यंदाच्या वर्षी वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक पध्दतीने देण्यात येत असलेल्या आरोग्यसेवांसाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांवर जबाबदाऱ्या व कर्तव्ये निश्चित करण्यात आली आहेत. बीड, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांतून येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेऊन डेंगी, चिकुन गुनिया या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेऊन पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. वैद्यकीय अधीक्षक, औषधनिर्माता, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, शिपाई, वाहनचालक यांचे जिल्हास्तरीय वैद्यकीय पथक कार्यरत राहणार आहे. महाबळेश्वर, वाई, खंडाळा, फलटण व माण या तालुक्यांमध्ये हेल्थ वेलनेस सेंटर योजना राबविण्यात येत आहे. उपकेंद्रांवर कार्यरत असलेले सुमारे ६८ समुदाय आरोग्य अधिकारी पालखी सोहळ्यात सेवा देणार येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी सांगितले.
आरोग्यदूतांची मदत
पालखी सोहळ्यासाठी आरोग्यदूत ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येणार आहे. वारकऱ्यांना आरोग्यदूतांमार्फत आरोग्यसेवा देण्यात येणार आहे. यासाठी दुचाकी वाहनांचा वापर करण्यात येणार असून, दोन आरोग्य कर्मचाऱ्यांकडे मेडिसीन किट उपलब्ध राहणार आहे. या आरोग्यदूतांसाठी विशिष्ट गणवेश व ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
पालखी मार्गावरील पाण्याचे स्त्रोत व पाणीसाठ्यातील पाण्याच्या नमुन्यांची अनुजैविक व रासायनिक तपासणी केली जात आहे. तसेच आरोग्यविषयक सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून, वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.