क्वारंटाइन चाकरमान्यांना हवा मायेचा ओलावा! गावकरी, नातेवाईक करताहेत टाळाटाळ

Satara
Satara

मायणी (जि. सातारा) : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी चाकरमान्यांना होम वा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात येत आहे. त्यांपैकी काहींना आपुलकीची वागणूक मिळत आहे. घासातला घास दिला जात आहे, तर गैरसोयींमुळे अनेकांना नुसताच त्रास होत आहे. त्यामुळे ठिकठिकाणचे क्वारंटाइन चाकरमाने नाराजी व्यक्त करत चांगल्या वागणुकीची मागणी करत आहेत. 

भाकरीचा चंद्र शोधत दुष्काळी खटाव तालुक्‍यातील हजारो लोक पुण्या-मुंबईला गेले. काहीजण सोने- चांदी गलई व्यवसायानिमित्त परराज्यांत स्थिरावले. माथाडी कामगार, रंगारी यांसह विविध कंपन्यांमध्ये नोकरी-धंद्यानिमित्ताने बहुतांश लोक गाव सोडून शहरांकडे गेले. यंदा यात्रा-जत्रा, लग्नकार्य, उन्हाळी सुटीसाठी गावाकडे येण्याच्या दिवसांत कोरोनाचे संकट आले. टाळेबंदी जाहीर झाली. अनेकजण ठिकठिकाणी अडकून पडले. टाळेबंदीच्या मुदतवाढीने सर्वजण घायकुतीला आले. पोटात कोरोनाच्या भीतीचा गोळा येऊ लागला. गावाकडच्या आठवणींनी व कुटुंबीयांच्या ओढीने अस्वस्थ झालेले पुणे-मुंबईकर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत अखेर आपल्या आईपांढरीच्या कुशीत पोचले.

आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमानुसार त्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून होम क्वारंटाइन करण्यात आले. काहींना गावातील शाळेतच संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले. मात्र, सर्व ठिकाणी आवश्‍यक सोयी-सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहेत. काहींना कुटुंबीयांकडून सर्वतोपरी सहकार्य, मदत होत आहे. तर अनेकांना गावकऱ्यांसह नातेवाईकांनीही जवळ केलेले नाही. सर्वजण त्यांच्याशी फटकून वागत आहेत. त्यांना आपुलकीने हवं नको असं कोणीही विचारताना दिसत नाही. एखाद्या आरोपी वा गुन्हेगाराप्रमाणे त्यांना वागणूक देण्यात येताना दिसत आहे. त्यामुळे वारंवार गावकऱ्यांना आर्थिक साह्य करणाऱ्या, गावकऱ्यांनी हाक देताच प्रतिसाद देणाऱ्या पुणे-मुंबईकरांना कमालीच्या यातना होत आहेत. गावाच्या विकासकामांत मोलाची मदत करूनही ग्रामस्थांनी आपल्याकडे पाठ फिरवल्याचे वैषम्य त्यांना सलत आहे.

एका बाजूला काही कुटुंबिय घासातील घास पोचता करीत आहेत, मायेची ऊब देत आहेत. त्यांना समजून घेत आहेत, दिलासा देत आहेत. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन स्थिर राहण्यास मदत होत आहे. तर, दुसऱ्या बाजूला तिटकारा, द्वेष, परकेपणाचे चटके सहन करावे लागत आहेत. स्थानिकांनी सर्वच चाकरमान्यांची परिस्थिती समजून घ्यावी. त्यांना सामावून घ्यावे. सर्वतोपरी सहकार्य करावे. मानसिक आधार द्यावा, अशी आर्त मागणी चाकरमाने करीत आहेत. त्या मागणीचा स्थानिक ग्रामस्थांनी सहानुभूतीने विचार करण्याची आवश्‍यकता आहे. अन्यथा चाकरमान्यांचा माणुसकीवरचा विश्वासच उडून जाईल. पुन्हा गावासाठी काही करण्याची त्यांची इच्छा मरून जाईल. याचीही खबरदारी गावकऱ्यांनी घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आवश्‍यक ती काळजी घेऊन क्वारंटाइन करण्यात आलेल्या सर्वांनाच सर्वतोपरी मदतीचा हात देण्याची गरज आहे. 


""खरे तर केलेली मदत, सहकार्य या हाताचे त्या हाताला कळू नये म्हणतात. पण, आता बोलायची वेळ आली आहे. आम्ही गावासाठी आजवर खूप काही केले आहे. अडचणीच्या काळात गावकऱ्यांना मदत केली आहे. तीच माणसं आज आमची साधी चौकशीही करत नाहीत. खुप यातना होताहेत.'' 

-एक क्वारंटाइन नागरिक, मायणी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com