सातारा : बोंडारवाडीतील बाधितांचे पुनर्वसन करा

डॉ. भारत पाटणकर; धरण हे श्रमिक मुक्ती दलाचे मोठे यश
Bondarwadi
Bondarwadi sakal

मेढा : केळघर विभागातील ५४ गावांसाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प महत्त्वाचा असून, या प्रकल्पात जी गावे बाधित होत आहेत. त्यांचे अगोदर पुनर्वसन आणि मगच धरणाच्या दगडाला हात लावला जाईल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी मेढा येथे पत्रकार परिषदेत दिला.

ते म्हणाले, ‘‘शेती व पिण्याच्या पाण्यासाठी होणाऱ्या एक टीएमसी बोंडारवाडी धरणाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतिम मंजुरी दिली असून, या धरणाचे काम लवकर होण्यासाठी आम्ही अधिक प्रयत्नशील राहू. मात्र, धरणाला अंतिम मंजुरी मिळाली म्हणून ५४ गावांतील ग्रामस्थांनी आता शांत झोपू नये. जोपर्यंत पाणी शेतात येत नाही, तोपर्यंत सर्वजण संघटित राहा. श्रमिक मुक्ती दलाने दिलेल्या पत्रामुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्याबरोबर ही बैठक झाली असून, त्यामध्येच बोंडारवाडी धरणाला अंतिम कायमस्वरूपी मान्यता मिळाली. लवकरच यासाठी आर्थिक निधीची तरतूद होणार आहे.’’

बोंडारवाडी धरणामुळे ५४ गावांतील विस्थापित झालेला शेतकरी, कष्टकरी पुन्हा आपल्या गावात शेती करेल. या प्रकल्पात ज्यांची जमीन जाणार आहे, त्यांना पुनर्वसन कायद्याप्रमाणे त्याचा लाभ मिळणारच आहे. जोपर्यंत आपल्या शेतात पाणी येत नाही, तोपर्यंत आपली ही लढाई सुरू राहणार आहे, असेही डॉ. पाटणकर यांनी सांगितले. बोंडारवाडी धरण हे श्रमिक मुक्ती दलाचे मोठे यश असून, यात कोणी श्रेय घेण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले. या वेळी विजयराव मोकाशी, उषा उंबरकर, आदिनाथ ओंबळे, विलासबाबा जवळ, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com