नदीपात्र कोरडे... बंधाऱ्यातच फक्त पाणी; या तालुक्‍यात दुष्काळी स्थितीची भिती

khatav
khatav

वडूज (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यात अद्यापही पावसाने ओढ दिल्याने ऐन पावसाळ्यातही तालुक्‍याची प्रमुख जलवाहिनी येरळा नदीचे पात्र पुरेशा पाण्याअभावी रिकामेच दिसत आहे. नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांतच केवळ पाणीसाठा दिसत आहे. खटाव तालुक्‍यात अद्यापही पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील काही भागांतील शेतकऱ्यांना शेती पिकांना पाणी देण्यासाठी ऐन पावसाळ्यातही ठिबक सिंचनचा वापर करावा लागत आहे. 

येरळा ही तालुक्‍याची प्रमुख जलवाहिनी आहे. तालुक्‍याच्या उत्तरेस म्हस्कोबाच्या डोंगरात उगम पावून दक्षिणेस चितळीच्या सांगली जिल्ह्याच्या हद्दीकडील भागांतून वाहणाऱ्या या नदीचा फायदा तालुक्‍यातील बहुतांशी भागाला होतो. नदीवर नेर येथे ब्रिटिशकालीन तलाव व येरळवाडी मध्यम प्रकल्प हे दोन प्रमुख जलसाठे आहेत. त्याशिवाय नदीपात्रात ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. 

सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू असला, तरी तालुक्‍यात अद्याप पुरेशा प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली नाही. त्यामुळे येरळा नदीदेखील पुरेशा क्षमतेने प्रवाहित झाली नाही. नदीचा बहुतांश भाग पाण्याविना रिकामाच दिसत आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांतच सध्या काही प्रमाणात पाणीसाठा झाल्याचे दिसत आहे. ज्या ठिकाणी सिमेंट बंधारे आहेत. त्या ठिकाणी हा पाणीसाठा झाला आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांत अजूनही पुरेसा पाणीसाठा नसल्याने त्या ठिकाणी पाणीपातळी बंधाऱ्यांच्या तळाशीच आहे. येरळा नदी अद्यापपर्यंत तरी पुरेशा प्रमाणात प्रवाहित न झाल्याने येरळवाडी मध्यम प्रकल्पातही पुरेसा पाणीसाठा होऊ शकला नाही. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com