चिंताजनक! साताऱ्यात पाणीटंचाईच्या झळा; माण, खटावात टॅंकरने पाणीपुरवठा

प्रत्येक वर्षी एप्रिल, मे व जून महिन्यांत जिल्ह्यात टंचाईच्या झळांना नागरिकांना तोंड द्यावे लागते.
Water Supply
Water Supplyesakal

सातारा : कोरोनाच्या संसर्गाने उच्चांक गाठलेला असताना दुसरीकडे पाणीटंचाईच्या झळांनाही नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. माण, खटाव, फलटण तालुक्‍यांत नेहमीच एप्रिल, मेमध्ये टॅंकरची मागणी होते. मात्र, यावर्षी जिल्ह्यात वाई, कऱ्हाड तालुक्‍यांतील दुर्गम भागात पाणीटंचाई जाणवत असून आतापर्यंत या दोन तालुक्‍यांत चार टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आता जावळी, पाटण तालुक्‍यांतील दुर्गम भागातही पाणीटंचाईच्या झळा जाणवणार आहेत. तरीही, माण तालुक्‍यातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना पाणी कमी झाल्याने तब्बल 14 गावांनी टॅंकर मागणीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दिले आहेत.

प्रत्येक वर्षी एप्रिल, मे व जून महिन्यांत जिल्ह्यात टंचाईच्या झळांना नागरिकांना तोंड द्यावे लागते. त्यामध्ये सर्वाधिक फटका माण, खटाव व फलटण तालुक्‍यांना बसतो. मात्र, यावर्षी परिस्थिती नेमकी उलटी आहे. यावेळेस सधन तालुक्‍यांतील दुर्गम वाड्या-वस्त्यांवरील गावात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. माण, खटाव तालुक्‍यांत अवकाळी पाऊस होत असल्याने येथील काही बंधाऱ्यांत अद्यापही पाणी आहे. सध्या वाई, कऱ्हाड तालुक्‍यांत दोन टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. ही गावे दुर्गम भागातील आहेत. त्यासोबतच सातारा, जावळी व पाटण तालुक्‍यांतील काही दुर्गम भागातील गावांनाही टंचाईच्या झळा बसणार आहेत. या गावांतूनही टॅंकर मागणीचे प्रस्ताव येत आहेत. त्यामुळे कोरोनाशी मुकाबला करताना जिल्हा प्रशासनाला आता पाणीटंचाईच्या समस्येलाही तोंड द्यावे लागणार आहे.

माण तालुक्‍यातील काही बंधारे पाण्याने भरलेले असले तरी काही गावांच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे पाणी कमी झाले आहेत. त्यामुळे अशा गावांत पाणीटंचाई जाणवणार आहे. परिणामी, 14 गावे व वाड्यावस्त्यांवर टॅंकर सुरू करण्याचे प्रस्ताव तहसील कार्यालयात दाखल झाले आहेत. खटाव तालुक्‍यातून केवळ एकच प्रस्ताव आहे. आगामी महिनाभरात काही गावे व वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई जाणवू शकते. वाई तालुक्‍यातून टॅंकरचा एकच प्रस्ताव असून यामध्ये मांढरदेव परिसरातील गावाचा समावेश आहे. सातारा, जावळी व पाटण तालुक्‍यांतील दुर्गम वाड्या-वस्त्यांवर आगामी काळात पाणीटंचाई जाणवू शकते.

कोरोनात आता पाणीटंचाईचेही संकट

सध्या कोरोनाचा उद्रेक सुरू असून गेल्या वर्षभरात प्रथमच 1,300 रुग्ण बाधित सापडले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन कोरोनाशी दोन हात करत आहे. अशातच आता काही गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने प्रशासनाला आता पाणीटंचाईचे नियोजन करावे लागणार आहे. एकीकडे कोरोना, दुसरीकडे टंचाई अशा दोन पातळ्यांवरील लढाई प्रशासनाला लढावी लागणार आहे.

Edited By : Balkrishna Madhale

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com