मालेगाव - शहरासह तालुक्यात आंदोलनाची धग आजही कायम आहे. सोयगावचे माजी सरपंच ताराचंद बच्छाव, नगरसेवक जयप्रकाश बच्छाव आदींसह सहा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी टेहरे चौफुलीजवळील एकलव्य पुलाजवळ गिरणा नदीपात्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी संजय पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून या कार्यकर्त्यांना तातडीने नदीपात्रातून बाहेर काढले.
आज सकाळी बच्छाव व सहकाऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाला सुरवात केली. दहा दिवसांपूर्वीच त्यांनी तशी घोषणा केली होती. या वेळी एकलव्य पुलावर मोठा जलसमुदाय जमला होता. आंदोलनकर्त्यांना नदीपात्रातून बाहेर काढल्यानंतर नायब तहसीलदार एम. एस. कारंडे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.