शेततळी होणार आणखीनच पाणीदार! 'मनरेगा'कडून शेततळे निधीत २४ टक्के वाढ

shettale.jpg
shettale.jpg

येवला (नाशिक) : ‘मागेल त्याला शेततळे’ योजना ५० हजारांच्या निधीच्या अटींमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना अडगळीची ठरली आहे. यावर पर्याय ठरत मनरेगातून शेतकऱ्यांना शेततळे करण्यासाठी निधीची मर्यादा सुमारे २४ टक्के वाढवल्याने भरमसाठ निधी मिळणार असून, यामुळे शेततळे पाणीदार होऊ शकणार आहे. विशेष म्हणजे, मंजूर व यंत्राद्वारे शेततळे खोदण्याला परवानगी असून, शेतकऱ्यांना २७ हजारांपासून ते चार लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य होणार आहे. 

गरजू व गरीब शेतकऱ्यांना पर्याय मिळणार 

कृषी विभागाकडून शेततळ्याला अवघा ५० हजारांचा निधी मिळत असल्याने ही योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांना मृगजळच ठरली आहे. जोडीलाच रोजगार हमी योजनेतून शेततळ्याला २०१४ पासून निधी दिला जातो. त्यातच यापूर्वीच्या निधीत लाखाने वाढ करण्यात येऊन नवीन निकष लावत निधीचे मापदंड ही सुधारल्याने आता शेतकऱ्यांना तब्बल चार लाख नऊ हजारांपर्यंत अर्थसहाय्य शेततळे खोदण्यासाठी करता येऊ शकेल. केंद्र शासनाने रोहयोची मजुरी २३८ रुपये केल्याने आता शेततळ्याच्या निधीत वाढ झाली आहे. त्यामुळे गरजू व गरीब शेतकऱ्यांना पर्याय मिळणार आहे. यासाठी इनलेट-आउटलेटसह व याविरहित शेततळ्याची कामे घेतली जाणार आहे. दोन्हीतही सहा पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यानुसार निधी मिळणार आहे. डोंगराळ व इतर क्षेत्र या दोन प्रकारानुसार व शेततळ्याच्या नऊ आकारमानानुसार रक्कम निश्‍चित केली आहे. 

...असा मिळेल निधी 

शेतकऱ्यांनी मजुरांच्या सहाय्याने इनलेट-आउटलेटसह पूर्ण शेततळे खोदण्यास दहा बाय दहाच्या शेततळ्याला २७ हजार, तर सर्वांत मोठ्या ३० बाय ३० च्या शेततळ्याला चार लाख नऊ हजार रुपये मिळणार आहेत. यात एक मीटर काम मजुरांद्वारे व दोन मीटर साहित्याद्वारे खोदल्यास १७ हजार ते दोन लाखांचा निधी मिळेल. शेतकऱ्यांनी १.२५ मीटर मजुराद्वारे व १.७५ मीटर साहित्याद्वारे खोदल्यास १९ हजार ते दोन लाख १९ हजाराचा निधी मिळू शकेल. १.५० मीटर मजूर व तितक्याच साहित्याद्वारे खोदल्यास २० हजार ते दोन लाख ३४ हजार निधी मिळेल. १.७५ मीटर मजुराद्वारे व १.२५ मीटर साहित्याद्वारे खोदल्यास २१ हजार ते दोन लाख ६० हजार व दोन मीटर मजुरांद्वारे आणि एक मीटर साहित्याद्वारे शेततळे खोदल्यास २२ हजार ते दोन लाख ८५ हजारांवर निधी मिळणार आहे. 

पाणीटंचाईची मोठी समस्या शेतीला भेडसावत असल्याने शेततळ्याचा उत्तम पर्याय बागायती शेतीला मिळाला आहे. दुष्काळी तालुक्यातही हजारो हेक्टर क्षेत्र यामुळे ओलिताखाली आले आहे. या तळ्यासाठी मनरेगातून निधी वाढवल्याने नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कृषीच्या शेततळ्यांना निधी वाढवण्यासह अवर्षणप्रवण असल्याने नाशिक जिल्ह्याला कृषी व मनरेगाच्या तळ्यांचे उद्दिष्ट वाढवण्याची मागणी करणार आहोत. - किशोर दराडे, आमदार तथा संचालक, जिल्हा बँक 

पूर्ण शेततळे मजुरांमार्फत केल्यास मिळणारा निधी 
आकारमान - डोंगराळ क्षेत्र - इतर क्षेत्र 

१०*१०*३ - ३१३७५ - २७२७६ 
१५*१०*३ - ४८१०७ - ४१७४५ 
१५*१५*३ - ८३८२२ - ७२८६५ 
२०*१५*३ - ११४१८२-१०१८६३ 
२०*२०*३ - १६४८६२ – १४३३०८ 
२५*२०*३ - २१२१६६ - १८४४२८ 
२५*२५*३ - २७२७६८ – २३७१०७ 
३०*२५*३ - ३३३३७० - २८९७८७ 
३०*३०*३ - ४०९१३१ - ३५५६४६  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com